Tuesday, September 30, 2008

दहशतवाद : मुस्लिम आणि सतर्कता

आझमगड आणि मुजफ्फरपूर हे उत्तरप्रदेशातील दोन जिल्हे आयएसआयच्या रडारवर आहेत. तसेच वाराणसी, सहारणपूर, कानपूर जिल्ह्यांमध्ये सिमीने मोठ्या प्रमाणावर जाळे पसरवले असून आझमगडमध्ये देशी पिस्तुले, बंदुका, कट्टे निर्मितीचे बेकायदेशीर कारखाने आहेत. कुविख्यात अबू सालेम आझमगडमधला आहे. दिल्लीत 13 सप्टेंबरला झालेल्या 4 भीषण बॉम्बस्फोटांत 20 ठार तर 100 हून अधिक जखमी झाले. या बॉम्बस्फोटातील पाचही सूत्रधार आझमगडचेच आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांनी पकडलेले अफजल मुतालिख उस्मानी, मोहम्मद सादिक शेख, मोहम्मद अरिफ शेख, मो. झकीर शेख, मो. अन्सार शेख या सर्वांचा आझमगडशी संबंध आहे. सादिक शेख हा इंडियन मुजाहिद्दीनचा एक संस्थापक आहे. 2000 पासून घडलेल्या 54 मोठ्या घटनांपैकी 45 घटनांमधील दहशतवादी हे उत्तर प्रदेशशी संबंधित आहेत. 93च्या मुंंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार करीम तुंडा, अझीम अहंमद हे प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. लाल किल्ल्यावर हल्ला चढवणारे लष्कर-ए-तोयबाचे 2 अतिरेकी मारले गेले. ते सुद्धा फैजाबादचे होते. 25 सप्टेंबर 2002 रोजी अक्षरधाम मंदिरावर हल्ला चढवणाऱ्यांना शस्त्रसाठा पुरवला बरेलीच्या चांद खानने तर 29 जुलै 2003 रोजी मुंबईतील घाटकोपर येथे बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी पैसे व शस्त्रसाठा पुरवला कानपूरच्या शकील अहमदने. 13 मे 2008 रोजी जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे लखनौच्या शाबाज हुसैन व मथुराच्या हकिनुद्दिनचा हात होता. 25 जुलै अहमदाबादमधील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अबू बशीर हा सुद्धा आझमगडचा. सराईमीर येथील मदरशातील अबू बशीर हा विद्यार्थी. आझमगडमध्ये जवळपास 250 मदरशे आहेत. मात्र असे असतानाही राज्य सरकार व केंद्र सरकार कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. आईच्या निधनानंतर अबू सालेम आझमगडला आला असताना दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी लोकांनी रस्त्यावर उतरून खाकी वर्दीच्या गराड्यातून अबूला बाहेर काढण्याचे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. तर दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मुस्लिमांना त्रास होता कामा नये असे मुख्यमंत्री मायावती यांनी पोलीस खात्याला बजावले होते. दहशतवाद्यांना शिक्षा द्या, पण आझमगडची बदनामी करू नका असा ढोल शबाना आझमी यांनी बडवला, आजवर झालेल्या सर्व बांग्लादेशींना भारताचे नागरिकत्त्व द्यावे अशी मागणी करण्यापर्यंतची मजल राम विलास पासवान यांची गेली. तर मुंबईतील राज ठाकरे यांच्या आंदोलनाला विरोध करताना आझमगडहून 20 हजार लोक मुंबईत आणू अशी धमकी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खा. अबू आझमी यांनी दिली होती.या संपूर्ण घटनांचा आणि नावांचा विचार केल्यास उत्तर प्रदेशातून (विशेषत: मुस्लिम) मुंबईत येणाऱ्यांपैकी बरेच जण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्यासाठीच येत असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे या लोकांशी मुंबईकरांनी कसे वागायचे आणि त्यांना कसे वागवायचे याचा निर्णय सतर्कपणे घेतलाच पाहिजे.
मुंबईच्या कोणत्याही भागात गेलो तरी कोणी कोणाला ओळखत नाही, कोणी हटकत नाही. त्यामुळे बिहार उत्तर प्रदेशातील अनेक तडीपार गुंडांनी मुंबईत आश्रय घेतला आहे. त्यांच्या आश्रयाने आजही अनेकजण मुंबईत बिनबोभाटपणे येतच आहेत. मुंबईच्या निरनिराळ्या भागात राहत आहेत आणि देशद्रोही कामे बिनधास्तपणे करीत आहेत. गेल्या काही वर्षांतील देशभरातील हिंसाचारात पकडलेले बहुतेकजण मुस्लिम समाजातील तरुण आहेत. अनेक मुसलमान या देशाशी एकनिष्ठ असले तरी त्यांचे काही धर्मगुरु व नेते मंडळी स्वत:चे स्थान व वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांच्याच मुस्लिम तरुणांना सतत भडकवत असतात. खोटे-नाटे सांगून त्यांची दिशाभूल करतात, आपला समाज अशिक्षित व गरीबी, दारिद्रयात खितपत पडावा यासाठी प्रयत्नशील असतात. विविध कारणांनी मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांना हिंसाचार करण्यास भाग पाडायचे, वरून आमच्या धर्माचा हिंसाचारावर विश्वासच नाही, त्यामुळे मुसलमानांच्या हातून कधी हिंसाचार होणारच नाही अशा आरोळ्या ठोकायच्या. या आरोळ्या ठोकणारे वर उल्लेख केलेल्या सर्व घटनांमधील गुन्हेगार, आरोपी हे मुसलमानच आहेत, त्याचबरोबर खुद्द पाकिस्तानातील कराची येथील मेरिएट पंचरातांकित हॉटेल कोणी उडवले, त्यातील स्फोटात 100 माणसे मारली गेली, त्याला जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तरे देतील काय? देशभरातील प्रमुख शहरांमधून "सिमी, इंडियन मुजाहिद्दीन व लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी इस्लामिक संघटना बॉम्बस्फोट घडवून त्याची जबाबदारीही जाहिररित्या स्वीकारत आहेत. शंभर कडव्या इस्लामी तरुणांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण "तौकिरने' दिले. हेच तरुण आता देशभरात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या दहशतवादी संघटना व आरोपी, गुन्हेगारांचा देशातील इस्लामिक संघटनांनीच जाहीर निषेध नोंदवून त्यांचा विरोध करायला हवा. देशातील सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना उधळून लावण्यासाठी पोलिसांना सहाय्य केल्यास या दहशतवादावर नक्कीच अंकूश बसेल. आतापर्यंत पकडलेले सर्व दहशतवादी मुसलमान असल्याने राष्ट्रप्रेमी मुसलमानांनी कुठल्याही देशद्रोही शक्तींना थारा न देता त्यांची मिळालेली माहिती पोलिसांना द्यायला हवी.
त्याचबरोबर चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेशाकडून देशाला धोका आहे. देशात सध्या सुमारे 5 कोटी घुसखोर रहात असून दररोज सुमारे 6 हजार घुसखोर भारतात प्रवेश करतात. असाममधील 11, पं. बंगालमधील 9, बिहारमधील 6 आणि झारखंडामधील3 जिल्हे बांग्लादेशीय घुसखोरांमुळे मुस्लिमबहुल झाले आहेत. बिहारमधील पसरलेल्या भीषण पुरसदृष्य परिस्थितीनंतर तेथील पुरग्रस्तांसह घुसखोर मुंबईत दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर येतही आहेत. परंतु विविध कारणास्तव, उत्सव, बंदोबस्तासाठी गुंतलेल्या पोलिसांना त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. भारत-पाकिस्तान, भारत-बांग्लादेश सीमेवर दहशतवाद्यांचे शेकडो प्रशिक्षण कॅम्पस आहेत. या कॅम्पसमधून प्रशिक्षण घेतलेले भारतात खुलेआम घुसखोरी करीत आहेत. या घुसखोरांच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे, खोट्या नोटा, मादक पदार्थांची तस्करी चालू आहे. त्यामुळे आतंकवाद, घुसखोरी, दहशतवाद संपवायचा असेल तर मुस्लिम संघटनांनीच पुढे येण्याची आज खरी गरज आहे. त्याचबरोबर दहशतवादाला आळा घालणे हे केवळ पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेचेच काम आहे, असे नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने त्या दृष्टीने सावध राहणे आवश्यक आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना पकडून उधळून लावला. या 5 अतिरेक्यांना अटक केल्यामुळे मुंबईवरचे संकट तात्पुरते टळेल असले तरीही गाफील राहून चालणार नाही. मुंबई शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या धमाक्यावर उभी आहे. हा धमाका कोणत्याही क्षणी व कोठेही होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क रहाणे अत्यावश्यक आहे.

बेजबाबदार नेते आणि पोलीस

आज मुंबईत, कोणत्याही क्षणी बॉम्बचा धडाका होईल अशा भीतीने नागरिक कसे बसे जगत आहेत. त्यांना दिलासा वाटावा असे चित्र काही निर्माण होत नाही. बातम्या येतात त्या फक्त, विविध पातळींवर होणाऱ्या बैठकांच्या. अनेक अधिकारी कामापेक्षा या बैठकांना हजेरी लावण्यात अधिक वेळ जातो, अशी तक्रार करत आहेत. मग कधीतरी गृहमंत्र्यांनी रेल्वेमधून प्रवास करून सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रवाशांशी चर्चा केल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे झळकतात. पण हे सर्वच उपाय तात्पूरते आणि प्रसिद्धीसाठी असतात. यातून नेमके काय साध्य होते हे कळत नाही.
गुप्तचर विभागाने देशविरोधी कारवायांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा असते. दोन वर्षांपूर्वी मुंबईत लोकलमध्ये स्फोट झाले, तेव्हा अशी माहिती मिळवण्यात पोलीस कमी पडले, अशी टीका झाली. त्याची म्हणे दखल घेऊन गृहमंत्र्यांनी, या विभागाकडे फक्त गुप्त माहिती मिळवण्याची जबाबदारी सोपवली जाईल, अशी तेव्हाच घोषणा केली. पण आजतागायत याची अंमलबजावणी करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही. केवळ हेच एक उदाहरण नव्हे, तर ठाण्याच्या चेक नाक्यावर सीसी टीव्ही दोन महिने बंद आहेत याचीही फिकीर कोणाला नव्हती. सुरत, अहमदाबादमध्ये स्फोट झाले नसते तर आणखीही अनेक महिने हीच स्थिती राहिली असती. याबाबत संबंधित एकाही पोलिस अधिकाऱ्याला वर कळवावे असे का वाटले नाही, हा चिंतेचा विषय आहे.पोलिसांविषयी आणि दलाबाबत अशा अनेक बातम्या गेली काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. पूर्वी पोलीस गुन्हेगारांना पकडायचे, आता पोलीस अधिकारी तुरुंगात जाताना दिसतात. काही जामिनावर बाहेर असतात. कोणत्या अधिकाऱ्याकडे दोनपाचशे कोटींची संपती असल्याची चौकशी सुरू होते. कोणीतरी सुपारी घेऊन बिल्डरला गजाआड करून काही लाखांची मागणी करतो. कोणीतरी अनेकांशी भागीदारी करून कमाई करत असतो. आणखी एखादा एन्काऊंटर करण्याच्या धमक्या देऊन वसुली करत असतो. पण मुंबई पोलीस स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे आहे अशा बढाया मात्र अधिकारी ते मंत्री असे सर्व मारत असतात, असे विदारक चित्र सध्या दिसते आहे.
ही स्थिती एका रात्रीत निर्माण झालेली नाही. गेली अनेक वर्षे ही प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपायापासून वरपर्यंत आपल्या मजीर्तील लोकांची वर्णी लावण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासापायी हे घडते आहे. असे करताना मग संबंधिताची जात, त्याचा प्रांत अशा बाबींना फक्त महत्त्व दिले जाते आहे. मग एखाद्या लफड्यात असा अधिकारी किंवा पोलीस सापडला तर त्याला वाचवण्यासाठी मंत्री धडपड करतात. अशाही परिस्थितीत, काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी आणि कर्मचारी ताठपणेे काम करत असतात. पण दलाकडे ना धड अत्याधुनिक यंत्रणा, ना शस्त्रसामुग्री, ना जागतिक स्तरावर घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करणारी यंत्रणा.
अशातच कायदे कालबाह्य झाल्यामुळे खटले वर्षानुवर्षे रेंगाळतात, गुन्हेगार जामिनावर बाहेर राहतात, अशी तक्रार गृहमंत्री करतात. पण इतक्या वर्षांत कायदे बदलणे ज्यांच्या हाती असते, तेच ही भाषा कशी काय बोलू शकतात याचे आश्चर्य वाटते. एकीकडे कायदेमंडळांमध्ये चालणाऱ्या गोंधळामुळे काम पूर्ण होत नाही अशी तक्रार करायची आणि दुसरीकडे कायद्यातील त्रुटी कायम राहतात असा गळा काढायचा, हा दुट्टपीपणा आहे. मध्येच एखाद्या राजकारण्याला खूमखूमी येते ती लोकांनी जागरूक राहावे असा उपदेश करण्याची. इथे रोजच्या जगण्याची लढाई लढताना बहुतेकांना घाम फुटतो. अशा वेळी जागरूक राहायचे म्हणजे नेमके काय करायचे? अतिरेक्यांशी, गुन्हेगारांशी लढण्यासाठी पुरेसे पोलीस नेमायचे नाहीत, त्यांना शस्त्रे द्यायची नाहीत. आहेत त्या पोलिसांना नीट पगार आणि भत्ते द्यायचे नाहीत. सरकारी खात्यातील शिपाई आणि पोलीस शिपाई यांना एका पातळीवर जोखायचे आणि पोलीस शिपायाकडून अपेक्षा मात्र करायची अतिरेकी, गुन्हेगार यांच्याशी लढायची. अनेकजण व्हीआयपी आणि संशयास्पद वर्तमान असणाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊन फिरत असतात. त्यांच्यावर असली बिनकामाची जबाबदारी सोपवताना राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा. पण पोलीस हे आपले गुलाम आहेत असे ठरवूनच राजकारणी वागत असतात आणि त्यांचे लांगुलचालन करणारे अधिकारीही मग खालच्या पोलिसांना तसेच वागवतात.
हे चित्र बदलायला हवे. सरकारी यंत्रणा आणि विशेषत: राजकीय नेतृत्व यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी थोडा अधिक विचार करण्याची आणि योजना अंमलात आणण्याची गरज आहे. अतिरेक्यांना धडा शिकवू, गुन्हेगारांना अद्दल घडवू अशा फुकाच्या गर्जना करण्यापेक्षा, ते प्रत्यक्षात आणले तर लोक अधिक सुखाने श्वास घेऊ शकतील. नाहीतर मुंबई नेहमीप्रमाणे असुरक्षित राहील. अतिरेकी कोणत्याही क्षणी धमाका उडवतील. बळी जातील सामान्य माणसांचे. मग त्यांचे नातेवाईक असहायपणे मदतीसाठी सरकारदरबारी खेटे घालत राहतील. दरम्यान सत्ताधारी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भाषणे करतील. हे चित्र बदलण्याची सध्यातरी शक्यता नाही. कारण गुप्तचर विभाग असो की चेकनाक्यावरचे सीसी टीव्ही कॅमेरे असोत; त्यामुळे सरकारी ढिलाईची अशी असंख्य उदाहरणे सतत डोळ्यासमोर दिसतात. सरकार कोणाचेही आले तरी यात बदल होणार नाही, हेच खरे कटुसत्य आहे.

Sunday, September 14, 2008

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !

"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !' म्हणत लाखो मुंबईकरांनी आणि इतर सर्व ठिकाणच्या भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. बॉम्बस्फोटांपासून मोर्चे-आंदोलनांपर्यंत कायदा-सुव्यवस्थेतील गलथानाबद्दल वेळोवेळी पोलिसांवर आणि खुद्द गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर खापर फोडले गेले आहे. मात्र दिल्लीत बॉम्बस्फोट मालिका घडल्यानंतरही मुंबईसह महाराष्ट्रात हेच पोलीस आणि दस्तुरखुद्द "आबा' यांची यंदाचा गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडल्याबद्दल पाठही थोपटायला हवी. तसे न करणे हे कृतघ्नपणा ठरेल. मुंबईत पोलिसांचेही बळ अपुरे असल्याचा त्यांचा बचाव एरवी फारसा पटण्यासारखा नसला किंवा एकविसाव्या शतकातही सामान्य माणसाला कुणाचे तरी हात ओले केल्याखेरीज कामच होत नसल्याचा अनुभव घ्यावा लागत असला, तरी गणेशोत्सवाच्या दोन आठवड्यांत पोलीस जे अथक परिश्रम घेतात, ते कोणत्याही स्वरूपाच्या "लाभा'साठी नव्हे, तर श्रींच्या कृपेने हे सामाजिक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या कर्तव्यभावनेतूनच ते अहोरात्र राबतात. सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनीही हे भान ठेवायला हवे आणि त्याची योग्य ती पावती द्यायला हवी. आज सकाळी गुलालाने माखलेल्या रस्त्यांवरून आपापल्या कामावर जाणाऱ्यांना बहुधा 10 दिवसांनंतर प्रथमच मोकळा श्वास घेता येईल, एवढा अफाट गर्दीचा पूर पुऱ्या मुंबईतील रस्त्यांवर गेले दहा दिवस लोटला होता. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यांवर येऊनही वर्षानुवर्षे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडतो, हेही कौतुकास्पदच. खुद्द भाविक या प्रशंसेस पात्र ठरतातच, पण यंदाही हा उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार पडला, याचे श्रेय कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांना द्यायला हवे. यादी करायची तर बस-रेल्वे आदी वाहतुक यंत्रणेपासून अनेकांचा समावेश त्यात करता येईल. मुद्दा हा की, लाखोंच्या संख्येत माणसे एकत्र येतात, ते ठिकाण एखाद्या निवडणूक-सभेचे असो अथवा तीर्थक्षेत्र, तिथे खुट्ट झाले तरी चेंगराचेंगरी होऊ शकते आणि अनेकांचे जीव घेणारी दुर्घटना घडू शकते. कुतुबमिनारपासून कुंभमेळ्यापर्यंत अशी अनेक उदाहरणे त्यासाठी देता येतील. मुंबईतील लालबागचा राजा किंवा पुण्यातील फुले मंडई, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने उत्सवाच्या काळात प्रत्यक्ष तिथे जाणाऱ्यांना, असा क्षण केव्हाही येऊ शकतो, याची जाणीवही असते. किंबहुना महाभारतातील युद्धात कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहाची आठवण व्हावी, असे अरुंद गल्ली-बोळ आणि पाईप-दोरखंडांमधल्या रांगांतून पुढे सरकताना अनेकदा गुरमरून टाकणारा अनुभवही आलेला असतो. त्यातून तासनतास तिष्ठत-सरकत, दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मोकळा श्वास घ्यायला मिळतो, तो क्षण पुनर्जन्मासारखाच भासतो. आज गणरायाला निरोप दिल्यानंतरचा दिवस लाखो भाविकांना, नोकरदारांना आणि पोलीस, स्वयंसेवी कार्यकर्त्यांना त्यापेक्षा वेगळी अनुभूती देणारा नसेल. याच दहा दिवसांत आणि एरवीही जरा कुठे वाहतुकीची कोंडी झाली, चोरी-मारी झाली तर पोलिसांच्या नावाने समाज बोटे मोडतो आणि मीडियाही टीकेचे आसूड उडवीत त्यात आपले हात धुऊन घेतो. गणेशोत्सवासारखे कसोटीचे दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर मात्र याच पोलिसांची आठवणही सहसा कुणाला राहात नाही.
पाकिटमारांपासून अफवा पिकवणाऱ्या समाजकंटक आणि दहशतवाद्यांपर्यंत सर्वच "संकटां'ना तोंड देत उत्सव पार पाडणे हे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्याही आवाक्यापलीकडे जाऊ लागले आहे. लालबागचा राजा गिरणगावातील अगदी मध्यवर्ती भागात असतो. त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून ती दिवसेंदिवस वाढतच आहे. पण त्यामुळे या परिसरातील रहिवासी, विविध संस्था-आस्थापनांचे कर्मचारी आणि व्यावसायिक यांना जी गैरसोय सहन करावी लागते, तिचीही दखल वेळीच घ्यायला हवी. हे फक्त लालबाग किंवा पुण्याच्या कसबा-शुक्रवार पेठेतीलच चित्र आहे, असे नाही. पण उत्सवाच्या वाढत्या प्रमाणामुळे गैरव्यवस्था वाढू लागली तर दैनंदिन व्यवहारांना खीळ बसेल आणि बेदिली माजेल. भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करताना आणि दहा दिवसांत दोनशे चाळीस तासांहून अधिक काळ अखंड ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरताना मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घशांचे तीनतेरा वाजतात, पिण्याच्या पाण्यापासून रुग्णांपचारापर्यंत हरतऱ्हेच्या सुविधा पुरविताना कार्यकर्त्यांचे रक्त आटते, हे खरे. तरीही गाव-गाडा चालू राहण्यासाठी परिसरातील इतरांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, अशा व्यवस्थेची खबरदारी घ्यायलाच हवी. अमुक गणपती नवसाला पावतो, या श्रद्धेपोटी असेल किंवा निव्वळ विरंगुळा म्हणून असेल, कारणे काहीही असली तरी उत्सवांचे स्वरूप काही वर्षांत बदलले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यांना येणाऱ्या गर्दीचे पूर, बकालपणा, अनारोग्य हेही दरवर्षी वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे, हे आव्हान बनले असून याचा विचार गांभीर्याने करायलाच हवा.

Wednesday, September 10, 2008

बधीर समाजात जागृती कशी होणार?

संपूर्ण देशात सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच पशूलाही लाजवेल असे भयानक कृत्य माणसाच्या हातून वारंवार घडते आहे. नांदेड येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर दरोडेखोरांनी हल्ला चढवून तिचे दागिने तर लुटलेच शिवाय तिला मारहाण करीत फासावर लटकवून ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी दरोडेखोरांनी हा अघोरी मार्ग अवलंबला. नांदेडच्या ग्रामीण भागातील ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काठोडा येथील दरोड्याची घटना कोठेवाडीप्रमाणेच राज्यभर गाजली. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या एकाला ठार मारले तर अल्पवयीन मुली व महिलांना जबर मारहाण करुन त्यांच्यावर माणूसकीला काळिमा फासणारे अत्याचार केले. ही घृणास्पद आणि संतापजनक घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी काठोड्याला धावती भेट देऊन पोलिसांना दरोडेखोर दिसताक्षणी गोळ्या घाला असे फर्मान सोडले होते. त्यातील एकही गोळी कुठे सुटलेली दिसत नाही. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांचे राज्यभरात थैमान सुरुच आहे. परवा ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत परभणी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर परभणी-पाथरी मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या दत्तात्रय कदम यांच्या आखाड्यावर दरोडेखोरांनी हल्ला चढवून कुंडलिक वाकळे, मुलगा त्र्यंबक, जावई मारोतराव गुहाडे, कुंडलिक यांची वयोवृद्ध सासु अनुसया व 4 मुलांना बळजबरीने एका खोलीत डांबले. आणि एकाच घरातील घरधनीण, तरुण विवाहीत मुलगी व सून अशा तिघांचीही अमानुषपणे विटंबना केली.
पाच दरोडेखोरांनी तिन्ही सवाष्ण महिलांवर त्या करुण आक्रोश करीत असताना बळजबरीने बलात्कार केला. यापैकी एका महिलेस तर या पाचही दरोडेखोरांच्या अत्याचाराला बळी पडावे लागले. हा घृणास्पद आणि लांछनास्पद प्रकार जवळजवळ दोन तास म्हणजे पहाटे तीनपर्यंत चालला. त्यांच्या या कृत्यावरुन ते विकृत आहेत हे सिद्ध होतेच शिवाय अंगावर काटा आणणारे असे कृत्य करताना त्यांना कायद्याची भिती अजिबात वाटलेली नाही. माणूसकीचा गळा घोटताना त्या दरोडेखोरांना काहीही वाटलेले नाही.
एकीकडे राज्यातील अशा घटनांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे मुंबईसारख्या महानगरातही एका महिलेला महिलेनेच जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. रस्त्यात चालताना धक्का लागल्याचे किरकोळ निमित्त होऊन हा प्रकार घडला, घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडी परिसरात शेजारी-शेजारी रहाणाऱ्या अनिता दत्ताराम शिवगण या 35 वर्षीय महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आशा दिपक गायकवाड या 35 वर्षीय महिलेला चालत जात असताना धक्का लागला. त्यामुळे चिडलेल्या आशाने घरातून चाकू आणून अनिताच्या डोक्यावर वार केला. भररस्त्यात एका तरुणीने दुसरीवर चाकूने हल्ला केला. ते कमी पडले म्हणून की काय तिने घरातून रॉकेलचा डबा आणून त्या तरुणीला अक्षरश: पेटवून दिले. यात अनिता 90 टक्के भाजली असून ती अखेरच्या घटका मोजत आहे. क्षुल्लक कारणावरून महिलाही किती हिंस्त्र बनू शकते याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदी चित्रपटांना लाजवेल अशी ही क्रूर घटना आहे. येथेही कायद्याचे भय दिसत नाही. शिवाय घाटकोपर सारख्या गजबजलेल्या भागात दिवसाउजेडी घडूनही एकानेही ही घटना रोखण्याचा प्रयत्न केला नाही की धाडस दाखवले नाही. हे त्या महिलेचे दुर्दैव. संवेदनहीन झालेल्या समाजाचे आणखी वेगळे चित्र काय असू शकते. देशाला सभ्यतेची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक कुणाला उरलेला नाही हेच या घटना दाखवून देताता. स्त्रियांवर अत्याचार ही वाढती विकृती आहे. तिचे तात्काळ परिपत्य केलेच पाहिजे. बऱ्याचदा प्रतिष्ठा अभंग ठेवण्यासाठी दुर्दैवी भगिनींना स्वत:चे ओठ शिवून घ्यावे लागतात; मात्र त्यामुळे पोलिसांना जबाबदारीतून सुटता येणार नाही. तीन वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील गावकऱ्यांनी स्त्रियांवर हात टाकणाऱ्या दरोडेखोरांना चेचून मारून आत्मरक्षण केले. त्याचे अनुकरण व्हावे असे पोलिसांना वाटते कां?
आज समाजातील प्रत्येकजण डोळे असूनही आंधळ्याप्रमाणे वर्तन करतो आहे. दिवसाच्या रहाटगाड्यात माणसाने स्वत:ला इतके जुंपून घेतले आहे की, माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. केवळ आपल्यापुरते पहायचे आणि बाजूला व्हायचे या वृत्तीने समाजाची दिवसेंदिवस अधोगतीच होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्या पातळीवरुन गांभीर्याने विचार करायला हवा त्या राजकीय व्यवस्थेने टोकाचा हीनपणा गाठला आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध दाद मागणेदेखील मुश्किल झाले आहे. अपघातात किंवा दुर्घटनेत एखाद्याला मदत करताना देखील विचार करावा लागतो आहे. अशा स्थितीमुळे संपूर्ण समाज व्यवस्थेवरच मरगळ आली आहे. मुंबई, काठोडा, परभणी, बीड, नांदेडमधील झालेल्या दुर्दैवी परंतु माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी आमचेच नव्हेतर साऱ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत! पण बधीर झालेल्या समाजाला कोण समजवणार? झोपलेल्याला उठवू शकतो पण झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला कसे काय जागवणार? या साऱ्या गंभीर घटनांकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाईल याची शंकाच आहे. शेवटी प्रशासन, राजकारणी हे त्या बधीर झालेल्या समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकरणात पुढाकार घेऊन हालचाली झाल्या नाहीत तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही.

गणेशोत्सवाचे उद्दीष्ट आणि मंडळे

गण म्हणजे जमाव, संख्या, समुदाय, मेळा, समूह, शब्दकोशात पाहिले तर "गण' या शब्दाचे एकवीस प्रकारचे निरनिराळे अर्थ सापडतात. पण गणेश किंवा गणपती ही संकल्पना ज्या गणाशी रूढार्थाने संबंधित आहे ती "सकळ जनांचा ईश्वर किंवा अधिपती' या अर्थाने आहे. आज केवळ महाराष्ट्रातील दहा कोटी नव्हे तर त्याखेरीज पंचखंडांत विखुरलेल्या लक्षावधी मराठी माणसांच्या घराघरांत परवा गणरायाचे आगमन होत आहे. गणेश बुद्धीचा अधिष्ठाता म्हणूनच हिंदू धर्मात तब्बल 33 कोटी देव असले तरी गणेशाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या रुपाने सर्वत्र गणेशाचे आगमन होते, तेव्हा उत्साह ओसंडून वाहू लागतो, त्या उत्साहाला वयाचे बंधन नसते, लक्ष्मीचे परिमाण नसते आणि धर्माची मर्यादा नसते. साक्षात्‌ परमेश्वराचेच आगमन होणार म्हटल्यावर घरातल्या प्रत्येकजण अत्यंत आनंदात, उत्साहाता आपला खारीचा वाटा उचलत असतो. गणपतीच्या पूजेची तयारी, वस्त्रालंकारांची मांडणी, पुष्परचना व सजावट यामध्ये अहोरात्र खर्चा घातले जातात आणि आतुरतेने गणेशाच्या आगमनाची सर्वजण वाट पाहू लागतात. ती ओढ विलक्षण असते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस पुण्या-मुंबईबरोबर सर्वत्र साजरा होणारा गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव बनले आहे. पण लंडनपासून नैरोबीपर्यंत आणि टोरांटो-सॅनहोजेपासून सिडनीपर्यंतच्या बृहन्ममहाराष्ट्र मंडळात ते ज्या उत्साहाने साजरे केले जातात, त्यावरूनही गणेशाचे विश्वव्यापकत्व समजू शकते. श्रीलंकेपासून इंडोनेशियापर्यंत शेकडो वर्षांच्या प्राचीन मंदिरांमध्येही गणेशाची विविध रूपे आढळतात. किंबहुना हे केवळ विशिष्ट भागाचे, धर्माचे, समाजाचे दैवत नसून उपखंडाबाहेरील "गणा' च्या अधिपत्याचे दीर्घकाळापासूनचे प्रतीक आहे, हेही त्यावरून स्पष्ट होते. पुण्या-मुंबईतील गणेशोत्सावात रस्त्यांना पुराचे स्वरुप येते. त्यात विशिष्ट धर्माची माणसे नसतात, तर भारत ज्या सर्वधर्मसमभावाचा, धर्मनिरपेक्षतेचा आदर राखतो त्याची साक्षच हा समुदाय देत असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भेदभाव बाजूला ठेऊन एकत्र येणारा असा समुदाय हे साठ वर्षे अभंग राहिलेल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचेच प्रतीक आहे. अशा गणांचा हा अधिपती. दैवतांमध्येही बुद्धिदाता, विघ्नहर्ता म्हणून गणेशाचे स्थानमाहात्म्य आहे.
मंगलमूर्ती घरी आल्यावर त्याचे कौतुक घरातील प्रत्येकजण आपल्यापरीने करत असतो. गणपतीचे डोळे कसे सुंदर आहेत, हात कसे गोजिरवाणे आहेत आणि पूजा झाल्यावर मूर्तीस कसे विलक्षण तेज प्राप्त झाले आहे, याची सुरस कहाणी प्रत्येकजण ऐकवत असतो. पुढचे दीड-पाच-सात-दहा दिवस घराच्या चार भिंतींनाही जिवंतपणा येतो. तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्या मंगलमूर्तीची "काळजी' प्रत्येकजण घेत असतो. विसर्जनापर्यंतचे दिवस वाऱ्याच्या मंद सुखद झुळुकेप्रमाणे निघून जातात. विसर्जनास मंडळी निघाली, की मात्र नकळत अश्रू ओघळू लागतात. जवळच्या विहीर-तलाव वा समुद्रकिनाऱ्यावर मूर्ती पाण्यात बुडवताना मग डोळ्यांच्याही कडा अश्रूंनी हळूच ओलसर होतात. गळा दाटून येतो. जड पावलांनी मंडळी घरी परततात. ती "पुनरागमना'च्या खात्रीनेच!
मातीतून तयार होणारी आणि पुन्हा मातीतच सामावणारी ती एक साधी मूर्ती जणू माणसाच्या क्षणभंगुर जीवनाचेच प्रतीक. मातीची दर्पोक्ती सार्थ ठरविणारी. भक्ती आणि प्रेमाचा विलक्षण संगम तिथे झालेला असतो. म्हणून मूर्तिपूजा योग्य की अयोग्य, परमेश्वर आहे की नाही हे वाद इथे गौण आहेत. माणसाच्या मनातला आंतरअग्नी फुलविण्याचे सामर्थ्य गणेशोत्सवात असल्याने तो सर्वव्यापी झाला आहे. धर्म, जात, वर्ण, पंथ आणि देशाच्या सीमा त्याने केव्हाच ओलांडल्या आहेत. माणसाच्या अस्तित्वाचा हा उत्सव आहे. त्याच्या सामाजिकतेचे आधुनिक रूप आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा हा सामाजिक आशय ओळखला व त्याला सार्वजनिक रूप दिले. जे कौटुंबिक मन आपल्या घरच्या गणपतीसाठी तन-मन-धन अर्पण करते, त्यास जर व्यापक स्वरूप दिले, तर जनमानसात आवश्यक असलेली एकी साधता येईल, हा त्यामागचा हेतू होता. एकातून अनेकापर्यंत पोहोचणारा उत्सवाचा हा आशय लोकमान्यांतल्या तत्त्वज्ञाने अचूक ओळखला. लोकमान्यांसमोर होते स्वातंत्र्यलढ्याचे उद्दिष्ट. ते काम अर्थातच सोपे नव्हते. त्या काळी संपर्काची साधनेसुद्धा अत्यंत मर्यादित होती. लोकांमधील संवाद दृढ करण्यास गणेशोत्सव मदत करू लागला.
छत्रपती शिवाजी आणि श्रीगणेश ही दोनच श्रद्धेय स्थाने समर्थ आहेत, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव यांची परंपरा सुरू केली. पुढे अर्धशतकाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आणि आपले धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र उदयाला आले. त्यानंतरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, वाढत्या कलेने साजरा होत आहे.
आज इतक्या वर्षानंतरसुध्दा गणेशोत्सवाचे हे रूप बऱ्याच प्रमाणात अबाधित आहे, परंतु त्याच्या प्रकटीकरणात मात्र आता मुलभूत फरक पडलेला आहे. स्वातंत्र्य मिळवूनही ते लोकांमध्ये रुजवण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळेच निर्माण झालेला दहशतवाद हे त्या रोगट सामाजिकतेचेच रूप आहे. या आनंदोत्सवास आता भीतीचे व असुरक्षिततेचे गालबोट आहे. आजूबाजूच्या अत्यंत विमनस्क व दोलायमान परिस्थितीत गणेशाची मूर्ती हे आशा, आकांक्षा व अपेक्षांचे प्रतीक बनले आहे. अनंतु चतुर्दशीच्या दिवशी करोडोंच्या संख्येने जमणारा प्रवाह तेच दर्शवितो. खरे तर त्यास वारीचेच स्वरूप येते. आपल्या देशातील बहुसंख्य चाकरमान्यांचे, कष्टकरी जनतेचं आकर्षण असलेली महानगरी मुंबई आणि त्याच मुंबईतील अनंत चतुर्दशीची उत्स्फूर्त वारी यातच खोल अर्थ दडलेला आहे. कोणताही आनंद हा सामुहिकतेच्या पातळीवर गेला, आणि त्यास तात्त्विक अधिष्ठान नसेल, तर त्यास मर्यादा पडतात व अपप्रवृत्ती डोकावू लागतात. गणेशोत्सवाचे सध्या तेच झाले आहे. संपत्तीच्या हिडीस प्रदर्शनाबरोबरच जुगार, दारू, धिंगाणा या प्रवृत्तींनी त्यात प्रवेश केला आहे. भक्तीगीते, भजन, किर्तनाची जागा आता डी.जे. हिंग्लीश गाण्यांनी घेतली आहे. स्टेजवरुन अर्धनग्न मुली गणरायाच्या साक्षीने अश्लिल हावभाव करीत ऑर्केस्ट्रामधून नाचक आहेत. याचा अर्थ "उत्सव' वाईट आहे, असे नव्हे, परंतु तो भरकटला आहे एवढे मात्र खरे. वास्तविक उत्सवाच्या माध्यमाद्वारेच त्याला आळा घालता येऊ शकेल. पण अपवाद वगळता सगळीकडे उन्मादच आढळतो. मात्र आजही काही ठिकाणी उत्सवाद्वारे सामाजिक उद्दिष्ट जपणारी अनेक मंडळे कार्यरत आहेत.
ओंकाराचे नादब्रह्म माणसाच्या हृदयस्पंदनांना, पृथ्वीच्या वेगाला आणि विश्वाच्या आत्मगतीला सुरांचे कोंदणे देते. म्हणूनच तर्कातून तर्काच्या पलीकडे जाण्याची मानवी जाणिवेची क्षमता त्यास विज्ञानाचे अधिष्ठान देते. तो निर्माणकर्ता आहे, तो असा. त्याचे आधुनिक काळातील मूर्त रूप म्हणजे "संगणक'.त्याचे एकूण स्वरूपच श्रीगणेशाचे स्वरूप सांगते, हा योगायोग नसावा! म्हणूनच गणपती मनाचेच रूप आहे. त्यास आकार नाही, व्याख्येत बसविण्याइतके निश्चित स्वरूप नाही. तरी प्रचंड सामर्थ्य, वेग आणि अतिसूक्ष्मापासून महाकायतेपर्यंत असणारी मनाची अनंत जाणीव मूर्त करणारे असे हे गणेशाचे स्वरूप.
व्यासांनी सांगितलेले महाभारत गणेशाने लिहून काढले, असे मानले जाते. यातील ऐतिहासिकता-अनैतिहासिकता हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाटीवर "गमभन' गिरवण्यास सुरुवात करणाऱ्या बालवाडीतील मुलापासून परम संगणक बनविणाऱ्या तंत्रज्ञ-वैज्ञानिकांपर्यंत सर्व पातळ्यांवर बुद्धीचा संबंध जेथे जेथे येतो, तेथे-तेथे गणेशाला श्रद्धेय स्थान आहे, हे अमान्य करता येत नाही. त्या गणेशास व माणसाच्या अस्तित्वासाठी लो. टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवास प्रणाम!

मराठा समाजाची अवस्था

"मराठा' समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. स्वराज्यात भाषा कोणती असावी यावरील चर्चांना उत आले आहे. पालिकेत मराठी भाषा सक्तीची केली असता विरोधक तुटून पडताहेत. मुंबईत मराठी भाषेत पाट्या लटकवाव्या यावरून राजकारण सुरू आहे तर मुंबईचे मराठीपण पुसले जात असताना या मुंबईच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसने कृपाशंकर सिंग यांची नेमणूक करून हिंदी भाषिकांना डोक्यावर घेऊन नाचताना मराठी भाषिकांना मात्र तोंडघशी पाडल्याचे दिसते. "मराठा' आणि "मराठी' च्या राजकारणात राज्यातील नेतेमंडळींनी योग्य व ठोस भूमिका न घेतल्याने मराठी माणूस मुंबईतून केव्हाच हद्दपार झाला. उरलासुरला मराठी माणूसही संपेल की काय अशी अवस्था संपूर्ण मुंबईत निर्माण झालेली आहे.
ज्ञानेश्वरांनी 700 वर्षोंपूर्वी अमृतातेही पैजा जिंके अशी मराठीची विजय पताका फडकवली. त्यानंतर अनेक परकीय आक्रमणे होवूनही ही भाषा आणि हा समाज टिकला आहे. त्यामुळे तो आणखी हजार वर्षे टिकेल यात शंका नाही. मात्र , मराठी माणूस म्हटला की , फेटे , नऊवारी साड्‌या , तुतारी , लेझीम , तमाशा इतकेच जर कोणी डोळ्यापुढे ठेवले तर हा समाज संपल्यासारखा वाटेल. मराठी माणूसही बदलत्या काळानुसार आपले रूप , पेहराव , भाषा आणि विचार हे सारे काही बदलत आहे. मराठी समाजाला स्वीकारायचे तर या बदलत्या स्वरूपातच स्वीकारायला हवे. म्हणूनच मंगळागौरी सजल्या नाहीत , तमाशाचे फड रंगले नाहीत किंवा पुरण पोळ्या शिजल्या नाहीत. मराठी समाज संपला असे मानण्याचे काहीच कारण नाही. पायाला ठेच लागली तर आई गं असा उच्चार ज्याच्या तोंडून आभावितपणे निघतो असा एक माणूस हयात असेपर्यंत मराठी समाज टिकलेलाच आहे.
मराठी समाज म्हणजे नक्की काय ? महाराष्ठ्रात राहणारा तो मराठी माणूस का ? मराठी बोलणारा तो मराठी माणूस का ? काही वर्षांपूर्वी श्वास चित्रपटाला राष्ठ्रपतींचे सुवर्णकमळ मिळाले आणि एका समाजात आनंदाची लाट उसळली. हा समाज मराठी भाषिकांचा होता. अभिजीत सावंत इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा खर्च करून एसएमएसचा धडाका लावणारे आणि तो विजेता ठरल्यावर नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करणारे मराठी भाषिकच होते. विंदांना ज्ञानपीठ मिळाला तेव्हा या समाजाला अतीव आनंद झाला. सचिन तेंडुलकरच्या 15 हजार धावा पूर्ण झाल्या तेव्हा हाच मराठी भाषिक आनंदातिशयाने वेडा झाला. प्रतिभा पाटील राष्ठ्रपती झाल्या तो त्यांच्या आनंदाचा परमोच्चबिंदू होता. 21 वर्षांपूर्वी स्मिता पाटीलचं अकाली निधन झालं तेव्हा हा समाज सुन्न झाला. मराठी माणूस समाज म्हणून वावरतो तो केवळ अशा आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगीच. एरवी हा समाज दुभंगलेला आणि शेकडो तुकडे झालेल्या काचेसारखा असतो. त्याला सांधणं आणि एकोप्याने वागायला लावणं ही गोष्ठ खूप कठीण किंवा अशक्यच. मराठी माणूस समाज म्हणून एकोप्याने राहत नाही , हा आरोप गेली अनेक वर्षं याच समाजातील राजकीय , सांस्कृतिक आणि सामाजिक नेते करत आले आहेत. तरीही हा समाज एक काही होत नाही.
आपापल्या भूमिकांवर ठाम असलेली माणसे एकत्र येऊ शकत नाहीत आणि अनेकदा त्यांच्यात विचारांची आणि त्यामुळे व्यक्तींची दुही आढळते. मराठी समाजात बौद्धिक कुवत अधिक असल्याने जो इतरांशी फटकून वागतो आणि तो ते करताना स्वकियांच्या बाबतीतही फारसा भेदभाव करत नाही. त्यामुळेच अनेकदा असे चित्र दिसते की , नोकरीत वा अन्यत्र अन्य समाजात त्या एका माणसाचा शिरकाव झाला की तो आपल्याच भाऊबंदांना तिथे आणतो. दुर्दैवाने मराठी माणसाच्या बाबतीत असे घडत नाही. अर्थात समाज म्हणून मराठी माणूस एकत्र आल्याचीही उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत मतभेद आणि फुटाफूट यामुळे शिवसेना विकलांग अवस्थेत होती आणि या पक्षाची मुंबईतील सत्ता जाणार हे जणू अटळ होते. पण मुंबई कोणाची , हा सवाल ऐरणीवर आला आणि वातावरण बघता बघता पालटले. मराठी माणसाची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली. याचे एक कारण आपली एकजूट कॉलनीपासून-ऑफिसपर्यंत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मपासून-मॉलपर्यंत दाखवून देण्याची मराठी समाजाची मानसिक गरज. चित्रपट , संगीत , नाटक , क्रिकेट या आणि अशा अनेक कलांमध्ये मराठी माणूस पारंगत आहे. त्याचे हे प्रभुत्व वारंवार सिद्ध होत आले. शिवाय सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या क्षेत्रातही मराठी नेत्यांनी देशाला नेतृत्त्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज , पेशवे , स्वातंत्र्य समरातील झाशीची राणी , तात्या टोपे हे योद्धे आणि राज्यकर्त्यांनी इतिहास घडविला शिवाय लोकमान्य टिळकांनी भारतीय असंतोषाचा पाया रचला. त्याच वेळी आगरकर , चिपळूणकर , नामदार गोखले आदिंनी समाजसुधारणाचा नवा मंत्र दिला. महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , धोंडो केशव कर्वे , प्रभुतिंनी समाज प्रबोधनाचा वसा घेतला या आणि अशा अनेक सुपुत्रांनी मराठी समाजाला अभिमानास्पद चेहरा मिळवून दिला. सचिन तेंडुलकर , सुनील गावस्कर , माधुरी दीक्षित , आशुतोष गोवारीकर यांनी आधुनिक महाराष्ठ्राची ओळख घडवली तर दिनेश केसकर यांच्या सारख्यांनी महाराष्ठ्राची ध्वजा सातासमुद्रापार नेली.
आता मराठा समाजाने काय करायला हवे , हे सांगण्याची गरज नाही. कारण या समाजात प्रचंड टॅलेंट आहे पण पुरेशी संधी नाही. लहानशी संधी मिळाली तरी त्याचे सोने करण्याची त्यासाठी अपार कष्ठ करण्याची तयारी आहे. पण मोठी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची. पुढे गेलेल्यांनी आपण आता मूळ प्रवाहापासून वेगळे झाले आहोत आणि आपल्या भाईबंदांना आहे तिथेच राहू घावे , ही मानसिकता सोडली पाहिजे. तसेच, प्रगती केलेल्या , चांगले उत्पन्न् मिळवणा-या आपल्या भाऊबंदांच्या मागे उभे राहून त्यांच्या प्रगतीला जमेल तेवढा हातभार लावावा आणि अहंगंड सोडून आपली प्रगती करून घ्यावी , ही मानसिकता मागे असणारांनी बाळगणे आवश्यक आहे. खोटी प्रतिष्टा आणि स्वभावातील ताठरपणा सोडून प्रगत लोकांकडे अधिक डोळसपणे पाहिले तर मराठा समाज आहे त्या स्थितीतून लवकर बाहेर पडेल. आपल्या समाजाच्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालून जरा त्यांना सरळ करण्याची गरज आहे , आपण स्वत:च वैफल्यग्रस्त होऊन भरकटत जाण्याची नव्हे , हे आजची पिढी जितके लवकर ओळखेल तितके फायघाचे ठरणार आहे.
भलेही काही मराठा तरूण आयटी ,, सरकारी नोक-यांतील उच्च पदांवर असतील पण त्यांच्यापेक्षा कैकपटीने अधिक तरूण अंधारात चाचपडत आहेत हे नक्की. पश्चिम महाराष्ठ्रातील मराठा तरूण शेती वा अन्य संलंग्न व्यवसायात आहेत. त्यांचे काही भाऊबंद ज्यांची शेतीत मदतीसाठी गरज नाही ते शिकून मुंबई , पुणे येथे नोकरीत आहेत.कोकण आणि मराठवाड्‌यातील बहुतेक मराठा तरूण बीएड, डीएड करून ओपनची जागा निघाली तर शेती विकून वाट्टेल तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवित आहेत. ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत गावोगाव शाळा , कॉलेजांमध्ये मराठवाड्‌यातील तरुण आवर्जून आढळतात हे यामुळेच. ज्यांना हेही शक्य नाही आणि घरी परिस्थिती बिकट आहे ते मोठ्‌या शहरांमध्ये बहुसंख्येने हॉटेलमध्ये नोकरी करण्यात मग्न आहेत. शेती सोडावी तर चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही आणि गावात अथवा आजूबाजूला कमी प्रतिष्टा असलेली नोकरी करवत नाही. कारण सामाजिक प्रतिष्टा आड येते , असा विचार असतो. अडचणीच्या प्रसंगी आपल्या समाजाचे मदत करण्यासाठी कोणी वेळेवर पुढे येत नाही पण नाव ठेवण्यासाठी निमंत्रण देण्याची मुळीच गरज नाही , अशी स्थिती आहे. मराठा समाजातील बहुतेक घरी थोड्‌याफार फरकाने हेच वातावरण आहे. ही मराठा समाजाची दुर्दशा आपल्याच नेतेमंडळींनी करुन ठेवली आहे. आजचा तरुण शिकलेला आहे. या तरुण वर्गानेच आता ठाम विचार करून फक्त मराठा-मराठा करण्याऐवजी आपल्या समाजाचा पर्यायाने स्वत:चा आणि नंतर गावाचा, शहराचा विकास कसा होईल त्यासाठी कोणाला डोक्यावर उचलून धरायचे हे ठरवावे, अन्यथा समाजाची अधोगती होतच राहिल.

राज्यकर्तेच नवे दहशतवादी?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी अमावस्या होती. मध्यरात्री बरोबर 12 च्या ठोक्याला केलेल्या भाषणात पंडीत नेहरुंनी नियतीशी केलेल्या कराराचा उल्लेख केला व सारे जग झोपलेले असताना आता भारत जागा झाला आहे, असे टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. त्याचबरोबर दारिद्रय, गलिच्छपणा, ओंगळपणा, उपासमारी, रोगराई वैगेरेचा आता नाश केला जाईल असे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद म्हणाले होते. परंतू आज काय परिस्थिती आहे....
"भारतीय सैनिक लढवय्ये आहेत. पण तेथील राजकीय नेते वाळलेल्या गवताच्या काडीसारखे आहेत. त्यांच्यात ताठरपणा बिलकूल नाही. भारताला आज स्वातंत्र्य दिले तर तिथे काही वर्षांनी हरामखोर व बदमाश सत्तेवर येतील', असे विन्स्टन चर्चिल म्हणाले होते. स्वातंत्र्याच्या 61 व्या वर्षांत त्यांच्या दुरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मागील साठ वर्षांचे सिंहावलोकन केल्यास देशाने अनेक गोष्टींमध्ये अगदी डोळ्यात भरणारी प्रगती केली असली तरी त्याचा फायदा देशात रहाणाऱ्या शेवटच्या घटकाला अजुनही मिळालेला नाही.
देशाला योग्य दिशा देऊन त्याला ठराविक उद्दिष्टांपर्यंत नेऊन ठेवणे हा सत्ताधाऱ्यांचा अजेंडा असायला हवा. मात्र दुर्दैवाने भेदभावाला खतपाणी घालून सत्तेची चूल कायम पेटती ठेवणे हा एकमेव कार्यक्रम आज राज्यकर्त्यांपुढे आहे. सत्ताधारी व विरोधक दोन्हीही एकाच माळेचे मणी असून त्यांच्या या दृष्टीकोनामुळेच देशाच्या अनेक भागात अराजकाचे वातावरण तयार झाले आहे. आपले राज्यकर्तेच याला कारणीभूत आहेत. कायदे करायचे नंतर एखाद्या धर्माच्या मतासाठी ते कायदे कचरा पेटीत फेकून द्यायचे, असे उद्योग राज्यकर्ते करीत असतात. त्याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे
61 वा स्वातंत्र्यदिन काश्मिरमध्ये दुर्दैवाने अत्यंत केविलवाण्या अवस्थेत साजरा झाला. हुरियत कॉन्फरन्सच्या हरताळ आणि बहिष्कारामुळे काश्मिर खोऱ्यातल्या बक्षी स्टेडियममध्ये झेंडावंदनाला सुरक्षा दलांशिवाय कोणी नव्हते. जम्मू अशांत आहे आणि गेल्या 60 वर्षात नव्हती त्याहून भयानक भारतविरोधी भावना काश्मिर खोऱ्यात सध्या भडकली आहे. काश्मिर खोऱ्यातले अस्तित्त्व टिकविण्यासाठी पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती उघडपणे दहशतवादी फुटीर आंदोलनाच्या पाठीशी उभ्या आहेत तर जम्मूत भाजप व संघ परिवाराने काश्मिरची नाकेबंदी करून हिंसक आंदोलनाचा आधार घेतला आहे. यामध्ये भारताचे नुकसान होत असले तरी कोणालाही याचे भान नाही. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान असहायपणे म्हणाले, धार्मिक संघर्ष आणि विभाजनाचे राजकारण देशाला विनाशाकडे नेईल. वर्षानुवर्षे चाललेली अमरनाथची यात्रा सांप्रदायिक सौहार्दाचे आदर्श उदाहरण आहे. परस्परांचा विश्वास, संवाद आणि समजूतदारपणानेच यातून मार्ग काढावा लागेल, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र आपल्या भाषणात सांत्वनवर शब्दांखेरीज कोणतेही ठोस आश्वासन ते देऊन शकले नाहीत. पूर्वी पंतप्रधान, राष्ट्रपती काय बोलतात याचे औत्सुक्य असायचे. भाषणावर चर्चा व्हायच्या. पण आता? नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा झाला. ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले! परंतु कचऱ्यासारख्या टि.व्ही असूनही किती लोकांनी हे भाषण ऐकले? लागोपाठ सुट्या असल्याने बऱ्याच जणांनी पिकनिक काढल्या. श्रावण न पाळणाऱ्यांनी पार्ट्या झोडल्या. माळशेज घाट, आंबोली घाट पर्यटकांनी फुलून गेले. जे कुणी घरी होेते ते एकतर साखर झोपत होते किंवा गाण्याचे, सासू-सुनांच्या भांडणाचे, तोकड्या वस्त्रातील नट-नट्यांचे कार्यक्रम पहाण्यात मग्न होते. कसले समारंभ नि कसले भाषण कशाला वाया घालवा आपला वेळ? अशीच सर्वांची भावना! पंतप्रधान नेहमीप्रमाणेच रडगाणे गाणार! ते कशाला ऐकायचे? सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काम करायला हवे, असे सांगून समृद्ध भारत घडवू या, असे आवाहन करणार! गेल्या 60 वर्षांतील तेच-तेच मुद्दे! आतंकवाद्यांना इशारा देणार! पण या आतंकवाद्यांना यांनीच माजवले. राज्यकर्तेच दहशतवादी बनले आहेत. त्यामुळेच तर यांच्यावर बुलेटप्रूफ काचेच्या चौकटीत उभे राहून भाषण करण्याची पाळी आली! "जम्मू-काश्मिर' प्रकरणी मतैक्य घडायला हवे हे खरे आहे. पण घडणार कधी? आजवर का घडले नाही? आज काश्मिर पेटले आहे ते कोणामुळे? कॉंग्रेसच्या दळभद्रीपणामुळे नाही का? अफजल गुरूची फाशी कशासाठी रोखली? याबाबत राज्यकर्त्यांनी आत्मपरिक्षण करावे? देशात सातत्याने वाढणारी महागाई व दहशतवाद हे आपल्या पुढील मोठे आव्हान असल्याचे पंतप्रधानांनी कबूल केले. पण त्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही? साधे घुसखोर आपण रोखू शकत नाही. उलट मतांच्या लाचारीसाठी या घुसखोरांनाच अधिकृत नागरिकत्त्व बहाल केले जात आहे.
घुसखोरांचे लोण एका भागापुरते मर्यादित नाही. देशाच्या पार दुसऱ्या टोकालाही या किडीने ग्रासले आहे. इतक्या वर्षात कुपोषणाचा प्रश्न सरकार सोडवू शकलेले नाही. माणसाला माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी ज्या काही प्राथमिक मुलभूत सुविधा आहेत. त्या पूर्णपणे बहाल झालेल्या नाहीत. भूकबळी, उपासमार या गोष्टी देशातील अनेक भागांच्या पाचवीला पूजल्या गेल्या आहेत. दारिद्रयरेषेख ाहूनही परिस्थितीमुळे आलेले पारतंत्र्य स्वीकारणेच त्यांच्या नशिबी आले आहे. तरीही आम्ही 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरे करतो. या देशाचे नागरिक असल्याचे ऊर बडवून सांगतो. हाच का आपला "सुजलाम्‌-सुफलाम्‌' देश!

महिला प्रगतीपथावर तर पुरुषांमध्ये स्वैराचार

सध्याचा काळ हा अतिशय वेगवान आहे. वाहनांचा वेग, टेक्नॉलॉजीचा वेग, सायबरचे वाढते प्रमाण, दूरसंचार क्षेत्रातील क्रांती, टेलिकम्युनिकेशन आणि अणुक्षेेत्रातील भव्य शोध, मिडीयाला आलेला वेग याबरोबरच हे शतक संगणकाचे व आयटीचे शतक म्हणून ओळखले जाते या शतकात सर्वच क्षेत्रात वेगवान घडामोडी घडत असताना जगभरातच तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असून प्रत्येक ठिकाणी महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. कोणताही विभाग असो, क्षेत्र असो, बैठे काम असू द्या किंवा मेहनतीचे काम असू द्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांनीच आघाडी घेतल्याचे दिसते.
मागील 8-10 वर्षांतील भारताचे आणि जागतिक अहवाल पाहिले असता, देशभरातील शाळा-कॉलेज, एसएससी, एचएससी बोर्डाचे रिझल्ट पाहिले असता प्रत्येक क्षेत्रात मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसते. 19 वे शतक हे संपूर्ण जगभर प्रचंड अलथापालथीचे गेले. रशिया आणि फ्रान्स या देशात रक्ताचे पाट वाहिले गेले. भारतात स्वतंत्रता चळवळ तर अमेरिकेत निग्रोंनी रणशिंग फुंकले. या सर्वांमध्येही महिलांचा सहभाग होता. झाशीच्या राणीपासून ते गोल्डा मायर (इस्त्रायल) अनेक बहादूर युवतींनी आपली नावे समररणांत प्रत्यक्ष बहादूरी गाजवून इतिहासात अजरामर केली. तर सध्याच्या 20 व्या शतकात फ्लॉरेन्स नाइटिंगेलसारख्या युवतीने नर्सिंग क्षेत्रातून आपल्या सेवेचा संपूर्ण जगाला परिचय देऊन नर्सिंग क्षेत्राला मानाचे स्थान मिळवून दिले. मदर तेरेसा सारख्या जगविख्यात महिला झाल्या. त्याचबरोबर मागील 10 ते 15 वर्षांत महिला वर्गाने जोरदार मुसंडी मारत प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन केले आहे.
भारतात रमाबाई रानडे, शाहू महाराज, आगरकर, म. जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर आणि सावित्रीबाई फुलेंसारख्यांनी स्त्री-शिक्षणाचे बिज 19 व्या शतकात पेरले. त्याची आज गोमटी फळे आली आहेत. भारतात 30,000 हून अधिक असलेल्या महाविद्यालयांमधून आज शिक्षण घेणाऱ्या युवतींचे प्रमाण तीन कोटींहून जास्त आहे. विद्यापीठांच्या निकालावर नुसती नजर टाकली तरी हे लक्षात येते की युवतींचे हे यश ग्रामीण विभागात 60 टक्के आहे. तर शहरी विभागात ते जवळजवळ 100 टक्के इतके आहे. प्रचंड हाल, अपेष्टा, अजूनही घरी होणारा अपमान, दारू पिऊन घरी येणारे निर्लज्ज नवरे, भाऊ, बाप आणि पत्नीला मारहाण करणारे नराधम पती, चौका-चौकातून होणारी मवाली पोरांची टिंगलटवाळी या सर्वांना तोंड देत हा प्रवास सुरूच आहे. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे असे मानून तिचा सेक्स-सिंबॉल म्हणून वापर करणाऱ्या शहरी भागातही युवती आपले गुण-कष्ट-कौशल्य व काम करण्याची वृत्ती, मेहनत व प्रचंड बुद्धिमत्ता यामुळे पुरुषांपेक्षा कित्येक पटीने पुढे गेली आहे.
शाळा-कॉलेजचे वार्षिक रिझल्टस्‌ पाहिल्यास महाराष्ट्रातील सर्वच बोर्डात दरवर्षी पहिले येण्यात तर मुलींनी कहर केला आहे. त्यामुळे या शिकलेल्या मुलींना ताबडतोब नोकऱ्याही मिळतात. याचा अर्थ असा नाही की युवक मेहनत घेत नाहीत, करीअर करीत नाहीत. पण सध्याचे वास्तव चित्र पाहिले असता तरुण मंडळी चित्रपट बघणे, सिगारेट ओढणे, नाक्यावर उभे रहाणे, टवाळकी करणे, टी.व्ही. बघणे, दारूच्या पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात. नोकरी मिळाली तरी वेळेवर जात नाही. दांड्या मारण्याचे प्रमाण जास्त असते, उद्धटपणे वागतात. त्यामुळे प्रत्येकजण मुलांपेक्षा मुलींना प्राधान्य देतात. याचाच विपरीत परिणाम झाला असून आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कब्जा केला आहे. टेलिकम्युनिकेशन, आयटी, बीपीओ सेंटर्स, कॉल सेंटर्स, पत्रकारिता, रेडिओ, विमान कंपन्यांमधून नोकरीच्या जागा जेव्हा भरल्या जातात तेव्हा 100 पैकी 80 जागा या युवती पटकावतात. देशाच्या राष्ट्रपती महिला, कॉंग्रेसच्या अध्यक्षा महिला, मुुंबईच्या महापौर महिल्या अशी बरीच मोठी यादी तयार होईल. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये महिला आघाडीवर आहेत. शिक्षण क्षेत्रातही युवतींनी बाजी मारल्याचे दिसते. कॉल सेंटर, सर्व्हिस सेंटर, बीपीओ, शिक्षण, संगणक या क्षेत्रात युवतींना मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तर क्लार्क, शिपाई, प्यून, ड्रायव्हर या नोकऱ्या मिळवण्यातही युवतींचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर दुकानांमधून सर्व्हिसेस, हॉटेल, बार, पेट्रोल पंप, बस कंडक्टर, पायलट, नर्स, हवाई सुंदरी, रेल्वेपासून ते थेट टॅक्सी ड्रायव्हरपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतल्याने पुरुषांना नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. आता तर रिक्षा ड्रायव्हर म्हणून 40 महिला येत्या महिनाभरात रस्त्यावर उतरणार आहेत. मग पुरुषांनी करायचे काय?
दिवस असो की रात्र महिला नोकरी-धंद्याच्या निमित्ताने फिरतात. त्यांना ने-आण करण्यासाठी कंपनीने गाड्यांची सोय केलेली असली तरी याच गाड्यांचे ड्रायव्हर रात्री-अपरात्री बेसावध महिलांवर अत्याचार करीत आहेत. परवा पुण्यातील आयबीएम कॉल सेंटरच्या एका 22 वर्षीय तरुणीवर तुकाई टेकडीवर 10 ते 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.
मुंबईतही असे प्रकार अधूनमधून घडत असतात. स्वैराचार वाढला आहे. बेकार तरुण वाममार्गाला लागत आहेत. चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळत असताना तरुण वर्ग मात्र वाममार्गाकडे वळत आहे. हे कोठेतरी रोखायलाच हवे, अन्यथा सर्वत्र हा:हाकार माजेल.

गांधीगिरीने काय होणार...5000 दया नायक पाहिजेत

बन्गळूर, अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. यापूर्वी मुंबईतही झाले. अतिरेक्यांनी संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. भारतात कोठेही, केव्हाही अतिरेक्यांच्या मर्जीनुसार बॉम्बस्फोट मालिका घडवल्या जाताहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात अतिरेकी पोहचले आहेत. सर्वत्र दहशत माजवली जात आहे. निष्पाप लोकांचा जीव घेताहेत. परंतु आपले राजकारणी मात्र मस्तवालपणे आपल्याच मस्तीत जगताहेत. देशाची फिकीर त्यांना अजिबात दिसत नाही. रोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होतो, जिवंत बॉम्ब सापडतो. "आज ......... शहरात भीषण बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ......... लोक मृत्युमुखी पडले तर ......... जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.' अशाप्रकारे बातम्या रोजच प्रसिद्ध होताहेत. या घटनेनंतरच्या प्रतिक्रियासुद्धा ठरलेल्या असतात... 1) पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 2) राष्ट्रपती व गृहमंत्र्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. 3) विविध नेत्यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. 4) देशातील प्रमुख शहरांमध्ये "रेड अलर्ट' चा इशारा व नाकाबंदी, तपासणी सुरू. बॉम्बस्फोटानंतर 8-10 तासांनी... 5) गृहमंत्र्यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. लवकरच आम्ही अतिरेक्यांना अटक करू. या स्फोटात विदेशी शक्तीचा हात आहे. 6) तोपर्यंत विदेशातून शोक संदेश येण्यास सुरुवात होते. मग गृहमंत्री गर्जना करतात, अतिरेक्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अतिरेक्यांना सजा ठोठावणारच (अफजल गुरू, अबू सालेम सारखी) किंवा अतिरेक्यांना आम्ही शोधून काढूच. (कशाला, तर नंतर सोडून देण्यासाठी) अशाप्रकारे जनतेला भुलविले जाते. 7) बॉम्बस्फोट कॉंग्रेस राजवटीत झालेला असेल तर भाजपा म्हणेल, "हे केंद्राचे अपयश आहे, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा.' आणि जर त्या राज्यात भाजपाची सत्ता असेल तर कॉंग्रेसवाले म्हणतील, "राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आमच्या सुचनांची योग्य अंमलबजावणी न केल्यानेच ही दुर्घटना घडली.' 8) त्यानंतर सोनिया गांधी, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते घटनास्थळी भेटी देतात. फोटो काढतात, जखमींना मदतीचे आश्वासन देतात, पुन्हा काहीतरी वार्ताहर परिषदेत घोषणा करतात, श्रद्धांजली वाहतात, पण पुढे काय? 9) पोलिसही "रेड ऍलर्ट' घोषित केल्यावर दोन दिवस कडक तपासणी करतात. तिसऱ्या दिवशी मेलेल्यांच्या अंत्ययात्रा संपतात, श्रद्धांजली कार्यक्रम होतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या... पुढच्या बॉम्बस्फोटापर्यंत...
इतके सगळे रोज घडत असूनही आम्ही मात्र स्वत:ला "गांधीवादी' म्हणत टेंभा मिरवित असतो. आतंकवादाच्या कॅन्सरने संपूर्ण देशाला पोखरून काढलेले असताना आम्ही मात्र गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे स्वस्थ बसलो आहोत. मात्र आतातरी सावध पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. (तसे पाहिले तर ती वेळ केव्हाच आली आहे.) शरीराचा एखादा अवयव खराब झाला तर तो काढून टाकला जातो. त्यासाठी ऑपरेशन करावे लागते. याप्रमाणेच कडक कारवाई केली नाही तर आपण आतंकवाद्यांशी लढूच शकत नाही. लाचार कायदे, वेळकाढू न्यायालये, कायम सत्य-अहिंसेचे धडे शिकवणारे थकलेले निधर्मीवादी, भ्रष्ट पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी असल्यावर आपण अतिरेक्यांशी कसा सामना करणार? यासाठी आता कमीत कमी 5 हजार "दया नायक' सारख्या पोलीस अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे जो देशभक्त आणि ईमानदार आहे परंतु "भारतीय सिस्टम'मुळे तो मजबूर असून काहीच करू शकत नाही. भारत देशाशी एकनिष्ठ राहून मनापासून प्रेम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुपचूप आपली एक यंत्रणा विकसित करून अतिरेक्यांना शोधून काढून त्यांचा जागच्या जागी "एन्काऊंटर' केला पाहिजे. जर आम्ही गिलानी, अफजल, मसूद, उमर सारख्या अतिरेक्यांना पकडले नसते तर आम्हाला त्यांना जावई म्हणून ठेवावे लागले नसते. कंधारसारखे प्रकरणही घडले नसते. कोणी सांगू शकेल का, "अब्दुल करीम तेलगी, अफजल, अबू सालेम इत्यादींना आम्ही आजही जिवंत कशासाठी ठेवले आहे? का त्यांना गोळ्या घालून ठार मारू नये? त्यांच्यासारखे कुख्यात अपराधी सुधारण्याची तिळमात्र शक्यता आहे का?'
आतंकवाद देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचला आहे. तो ठेचून काढण्याऐवजी राज्यकर्ते त्यांचे वोट बॅंकेसाठी पोषणच करीत आहेत, भ्रष्टाचाराने देशाचे पार वाटोळे होत आहे. या देशात पेन्शन घेणाऱ्या देशभक्त सैनिकांकडून, स्मशानातील लाकडांसाठी, रूग्णालयातील औषधांमध्ये, अपंगांच्या सायकल, गरीबांचा गहू, देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या शस्त्रांमध्ये, शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे. दलाली, लाच घेतली जाते. देशभक्ती, त्याग, शासन या सगळ्या गोष्टी पुस्तकातच राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण अतिरेक्यांशी कसे लढणार? या सडलेल्या अधिकाऱ्यांच्या जोरावर! का या "सिस्टम'च्या जोरावर जे एका चिरकूट पाकिटमाराला 10 वर्षे तुरुंगात डांबते परंतु वीजचोरी करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बड्या उद्योगपतीला मात्र सलाम ठोकते.
नाही, आतातरी हे सगळे संपवायला हवे. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 5000 दया नायक पाहिजेत. जे अतिरेक्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना कोणताही गाजावाजा न करता शोधून काढतील आणि तेथेच गोळ्या घालून ठार मारतील. हे काम आजही काही ईमानदार पोलीस अधिकारी करू शकतात. असे म्हटले जाते की, "असा कोणताही अपराध घडत नाही जो पोलिसांना माहित नाही' आणि हे बऱ्याच अंशी खरे आहे. फक्त अतिरेक्यांनाच नव्हे तर त्याचे पाठीराखे, हितचिंतक, नातेवाईक, संपूर्ण परिवार नेस्तनाबूत व्हायला हवे, सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, तरच ते शक्य आहे.
इकडे आमचा संजूबाबा नावाचा महान व्यक्ती घरात विना परवाना शस्त्रे ठेवून लोकांना "गांधीगिरी' शिकवत आहे. या मूर्खाच्या "गांधीगिरीला' लोकांनी चांगलेच स्वीकारले. पण प्रत्यक्षात काय घडते आहे? वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या सुंदर पोरींना पोलीस हवालदार फुले देऊन "बायांनो लायसन्स काढा' अशी आळवणी करताहेत. 18 वर्षाखालील मुलांकडून शे-दोनशे रुपये घेऊन सोडले जात आहे. काय, मुर्खपणाचा हा कळसच गाठला. अशा प्रकारांनी कसल्या सुधारणा होणार? या "भडवेगिरी'पेक्षा अर्जुनाची "गांडीवगिरी' दाखवायला हवी. नियम तोडणाऱ्याची फक्त एकदा गाडी जप्त करून बघा. चौकात मोटर सायकलची हवा काढून त्या इरसाल कार्ट्याच्या बापाला बोलावून घ्या, बघा कसे सुधारतात ते. पण नाही, लाच खाऊन "गांधीगिरी' करायची, मग कशा सुधारणा होणार? फक्त पोकळ घोषणा करण्यात आम्ही धन्यता मानतो. "भारत विश्वाचा गुरू आहे... भारताने जगाला अहिंसेचा धडा शिकवला... इत्यादी.' परंतु या महान देशात कधी कोणाला शाळा-कॉलेजमध्ये कमीत कमी सैनिकी शिक्षण देण्याचे जरूरीचे वाटले नाही. (लैंगिक शिक्षण मात्र जोरात सुरू आहे.) जेव्हा संपूर्ण "सिस्टम' सडलेली असेल तर कोण काय करणार? अशावेळी केपीएस गिल, रिबेरोसारखे हिम्मतवान अधिकारीच देशाला वाचवू शकतात. अतिरेक्यांशी "मरा किंवा मारा' अशी लढाई व्हायला हवी. अतिरेकी हल्ले करून, बॉम्बस्फोटांद्वारे आम्हाला मारत आहेतच आता आम्ही त्यांना कधी मारणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. त्यासाठीच या देशाला अशा "दया नायकांची' नितांत आवश्यकता आहे.

ऱक्षक बनले भक्षक

समाजामध्ये अधिकाधिक सुरक्षिततेची भावना वाढीस लावून त्याद्वारे जनतेच्या राहणीमानाची व जीवनाची प्रत सुधारण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी साहाय्य करण्याचे काम पोलिसांचे आहे. वाढती गुन्हेगारी हा अतिशय गुंतागुंतीचा सामाजिक प्रश्न आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी समाज, राजकीय व सामाजिक नेते, लोकप्रतिनिधी, पोलीस, न्यायव्यवस्था व तुरुंग हे घटक जबाबदार आहेत. पण या सर्वांनाच वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयश आले असून याची झळ मात्र फक्त सर्वसामान्य गोरगरीब जनतेलाच बसते, याचे सोयरसुतक आहे कोणाला?
सर्वत्रच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर्षी तर गुन्हेगारीच्या क्षेत्रात भारताने पहिला क्रमंाक पटकाविला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌ ब्युरो (एनसीआरबी)ने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2007-08 या वर्षात बलात्कार, खून व अंमली पदार्थांबाबत 50 लाख गुन्हे घडले. पोलिसांच्या नोंदीनुसार भारतात गेल्या वर्षात 32 हजार 719 खून झाले, 18 हजार 359 बलात्कार झाले, 44 हजार 159 लैंगिक गुन्हे घडले, 2 लाख 70 हजार 861मारहाणीचे प्रकार तर चोरी आणि दरोड्यांची संख्या 22 हजार 814 इतकी आहे. या गुन्ह्यांची संख्याच वाढत आहे असे नव्हे तर त्यांचे स्वरूपही दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. खून करून मृतदेहाचे 300 तुकडे करणाऱ्या उलट्या काळजाचे नराधम, वासनांध प्रियकर-प्रेयसी, एकतर्फी प्रेमातून की वासनेतून मुलीच्या शरीरावर ऍसिड टाकून तिचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारे नराधम, संपत्तीसाठी गळा घोटणारे, शरीरसुखासाठी कोणत्याही थराला जाऊन जीव घेणाऱ्या या नराधमांची कायद्याच्या पळवाटा शोधून मुक्तता होत असल्याने कुठलाही संवेदनक्षम माणूस अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. अशावेळी त्याची भिस्त असते ती पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर. या यंत्रणा कायद्याची अंमलबजावणी करतील आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल, अशी त्यांची किमान अपेक्षा असते. परंतु गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घसरत असल्याचे वाचून सर्वांचीच तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनते. सर्वार्थाने पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राच्या बाबतीत तरी अशी चिंता करावी लागणे हे आणखीनच दुर्दैवाची बाब आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घसरतच आहे. 1994 नंतर सातत्याने हा घसरता आलेख असून 2006मध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त 11 टक्के आढळले आहे. यामध्ये सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांचीच आहे. तपास आणि पुरावे गोळा करणे, गुन्हेगारांविरूद्ध न्यायालयात पुरावा योग्य रितीने सादर करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवरच गुन्हेगाराला शिक्षा होणे किंवा न होणे अवलंबून असते. महाराष्ट्रात 2006 मध्ये 11 लाख 98 हजार 700 खटले प्रलंबित होते. त्यापैकी फक्त 7 हजार 500 प्रकरणांत आरोपींना शिक्षा झाल्या. 58 हजार खटल्यांतील आरोपी निर्दोष सुटले. तर बाकीचे 11 लाख 33 हजार 200 खटले तुंबलेलेच राहिले. आजमितीस राज्यातील दुय्यम न्यायालयांत 40 लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबतीत न्यायाधीशांची संख्या वाढविणे आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळांच्या अपुऱ्या संख्येविषयी आजवर अनेकदा चर्चा झाल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2007 मध्ये घेतलेल्या परीक्षेतून निवड झालेल्या 155 उमदेवारांची दिवाणी न्यायाधीश व दंडाधिकारी, प्रथम वर्ग या पदांसाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली. मात्र त्यापैकी 66 उमेदवारांची शासनाने निवड केली. त्याची अधिसूचना 31 मे व 10 जून 2008 रोजी निर्गमित केली. अशाप्रकारे प्रशासनाचे सुस्त कारभार चालल्यावर आणखी काय होणार? मराठीतून न्यायदान व्हावे म्हणून बोंबा मारल्या; पण कृती काहीच होत नाही. शिवाय जे न्यायाधीश आहेत त्यांना न्यायदानासाठी मदत करणाऱ्या पोलिसांनीच बनवाबनवीचे प्रकार केल्यावर न्याय तरी कसा मिळणार? आणि कोणाला मिळणार? यामध्ये श्रीमंतांचे चोचले पुरविले जात असले तरी सर्वसामान्य जनताच भरडली जात आहे, याचे भान कोणालाच नाही. नेतेमंडळी जनतेच्या जीवावर राज्य करीत आहेत. आपल्या स्वार्थासाठी हीच नेतेमंडळी पोलिसांना आपल्या तालावर नाचवते. साध्या हवालदारापासून ते पोलीस महासंचालकापर्यंतचे सगळेच अधिकारी कोणत्या ना कोणत्या पुढाऱ्याच्या दावणीला कायम बांधलेले! एखाद्याने आदेश झुगारण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची तडकाफडकी बदली झालीच समजा. मग मागे राहिले तर पोलीस कसले? नेत्यांना खूश करून स्वत:च्या तुंबड्या भरताना बळी दिला जातो तो मात्र सर्वसामान्य जनतेचा. या जनतेचा वाली कोण? रक्षकच भक्षक बनल्यावर जनतेवर अन्याय, अत्याचार होणारच, गुन्ह्यांचे प्रमाण वाढणारच. भ्रष्टाचारात गुंतलेले पोलीस हे कसे काय रोखणार? कसे थांबवणार? प्रत्येक पोलीस हा आपल्याला पदोन्नती मिळावी हिच अपेक्षा ठेवून नेत्यांच्या मागेपुढे फिरत असतो आणि स्वत:ची घरे भरण्यासाठी श्रीमंतांचे चोचले पुरवित असतो. एखाद्या गरीबाने तक्रार नोंदवायची म्हटल्यास त्याला पोलीस चौकीत कोणीही धड उत्तरे देत नाही. शेवटी गयावया केल्यावर एन.सी.नोंद केली जाते. मात्र त्याचीसुद्धा ड्युप्लीकेट पावती न देता पूर्वीप्रमाणे कागदावर स्टॅम्प मारून एनसी क्रमांक दिला जातो. एखाद्या गुन्ह्याची नोंद झालीच तरी त्याची पुढे चौकशीच केली जात नाही. याची रोजच्या वर्तमानपत्रातून आपल्याला अनेक उदाहरणे मिळू शकतील. लग्नास नकार देणाऱ्या मुलीला सुडभावनेने पळवून नेऊन तिच्यावर तिघांनी तब्बल 10 दिवस पाशवी बलात्कार करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव गावातील नवविवाहितेला पोलीस दखल घेत नसल्याचे पाहून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेची मदत घ्यावी लागली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजधानीत बोरीवलीतील मंडपेश्वर रोडवरील शिवाजी नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एस.व्ही.यादव यांच्या अल्पवयीन मुलीला विजय उर्फ बिरजू नावाच्या मुलाने तुझ्या बापाचा अपघात झाला असल्याचे सांगून तिला फसवून पळवून नेऊन तिच्यावर सतत 2 दिवस 4 नराधमांना? बलात्कार केला. मात्र वारंवार पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जाऊनही एमएचबी पोलिसांनी महिना उलटल्यानंतरही याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचे दिसते. अशाप्रकारे गोरगरीबांना हिन दर्जाची वागणूक पोलिसांकडून मिळते.
मात्र त्याच पोलीस ठाण्यात श्रीमंत, भपकेबाज, रूबाबदार माणूस गेल्यास त्याची उठबस करण्यास, चहापाण्याची सोय करण्यास पोलीस स्वत:हून पुढे येतात, मग तो मोठा गुन्हेगार, आरोपी असला तरी पोलीस हस्तांदोलन करण्यासाठी, मिठ्या मारण्यासाठी धडपडत असतात.
पोलिसांना "वर्दीतला गुंडा' असे आजही समजले जाते. इंग्रजांच्या काळात पोलिसांना निर्दयी मानले जायचे. त्यामध्ये फारसा फरक पडल्याचे कोठेही जाणवत नाही. युपी, बिहार, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र असो की दिल्ली, पोलीस हे सगळे एकाच माळेचे मणी! पोलीस अत्याचाराचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केलेल्या पाहणीनुसार 2004- 05मध्ये पोलीस कोठडीत 136 जणांचा मृत्यू झाला. तर न्यायालयीन कोठडीत 1357 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे 1493 जणांना अटकेत असताना जीव गमवावा लागला, हे कशाचे द्योतक आहे. एकीकडे पोलीस हे जनतेचे मित्र आहेत असा संदेश दिला जात असताना दुसरीकडे हेच पोलीस जनतेचा छळ करताना दिसतात. नेते, बिल्डर आणि श्रीमंत व्यापाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी गरीब कामगार वर्गाला खोट्या केसेसमध्ये गुंतविण्याची धमकी देतात. पैसे घेऊन आरोपींना सोडतात. पोलीस येथेच थांबत नाहीत तर रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांकडून, व्यापाऱ्यांकडून खुलेआम हफ्तेवसुली करतात. अनैतिक धंदेवाल्यांना रोखण्याऐवजी दरमहा हफ्ते खाऊन त्यांना प्रोत्साहनच देतात. इतकेच नव्हेतर वेश्या आणि तृतीय पंथीयांकडूनही पोलीस हफ्ते घेतात. हफ्ते न दिल्यास त्यांच्यावर अत्याचार केला जातो. धंदा करण्यास मनाई केली जाते. प्रसंगी पोलीस ठाण्यात आणून त्यांची पिटाई करण्यात येते.
वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची छेड काढणारे पंजाबचे पोलीस प्रमुख गिल असोत, हत्याप्रकरणात गुंतलेले दिल्ली पोलीस आयुक्त जसपाल सिंह असोत किंवा मुंबईतील बांधकाम व्यावसायिक चतुर्वेदी यांचे फसवणूक प्रकरण असो, खालपासून वरपर्यंत सर्वच काही ना काही कारणाने या अत्याचारात गुंतलेले आढळतात. भारत देश स्वतंत्र झाला असला तरी 150 वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांचे प्रभूत्व मात्र कायम राहिले. आपली न्यायव्यवस्था इंग्लंडच्या न्यायव्यवस्थेशी मिळती जुळती आहे. परंतु कायद्यातील पळवाटा शोधण्यात भारतीय अतिशय हुशार! इंग्रजांचीच पुढे नक्कल करीत असताना त्यांचे चांगलेपण सोडून दिले आणि दुर्गुण तेवढे आम्ही घेतले. इंग्रजांच्या काळात पोलीस व न्याय प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत नव्हता. एखादा पोलीस दोषी आढळल्यास त्याला त्वरित नोकरीवरून काढले जायचे. शिवाय त्याची सर्व संपत्ती जप्त केली जात असे. मात्र स्वतंत्र भारतात कलम 322 द्वारे पोलिसांना मोकळे चरण्यासाठी चांगले रानच सापडले. देशातील राजकारणीही पोलिसांना वाटेल तसे वापरून घेत आहेत. जाती-पातीचे राजकारण करून, मतदारांवर दबाव आणून निवडणुका लढवल्या जातात. यावेळी मदत नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून त्याठिकाणी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावतात. त्यामुळे पोलिसही या राजकारण्यांना घाबरूनच रहातात, मग योग्य न्याय-निवाडा होणार कसा? यांच्याकडून गोर-गरिबाला कधीतरी न्याय मिळेल याची अपेक्षा बाळगावी कां?

तर पुढाऱ्यांवर हल्ले करा ...

छत्रपती शिवाजीराजे हे जगातील अलौकिक राजे होते. सरंजामशाहीत परस्त्रीला माता मानणारा आणि परधर्माचे कुराण डोक्याला लावणारा आमचा "श्रीमंत योगी' महान राजा! त्या जाणता राजाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. छत्रपतींचे भव्यदिव्य स्मारक प्रत्यक्षात अवतरले तर महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावेल. मुंबईच्या देखण्या क्वीन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारपट्टीवर महाराजांचा पुतळा होतो आहे ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येक मराठी माणसाला नितांत अभिमान आहे. तसाच तो कुमार केतकरांनाही आहे हे त्यांच्या लेखावरुन लक्षात येते. कारण एरव्ही कॉंग्रेस सरकारचे गोडवे गाणाऱ्या केतकरांनी सरकारच्या निर्णयाविरोधात असे लिहिले नसते. पण त्यांनी हा उपरोधिक लेख लिहिला तो तथाकथित राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन टाकण्याकरिता. पुतळ्याचा अनादर व्हावा असे त्यांनी काहीच लिहिलेले नाही. परंतू गुडघ्यात अक्कल असलेल्या आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या राजकारण्यांच्या बगलबच्यांनी कोणताही विचार न करता केतकरांच्या घरावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा निषेधच करावा लागेल. शिवरायांच्या प्रेमापोटी लोकशाही मार्गाने तुम्हाला निषेध नोंदविता आला असता. स्वत:चे लेख पाठवून, संपादकांना पत्र पाठवून, इतर वृत्तपत्रांमधून आपली मते प्रकट करुन केतकरांचा निषेध करणे व त्यांचे मत खोडून काढणे शक्य होते. लोकशाहीचा चौथ स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचे विचारस्वातंत्र्य अबाधित रहायला हवे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जावी. मुद्‌दयाला मुद्‌दयाऐवजी गुद्‌याने प्रहार करण्याचा अतिशय वाईट पायंडा पडत असून तो रोखायला हवा.
शिवरायांचा इतिहास विसरून चालणार नाही. नव्या पिढीसाठी तोच एक आदर्श आहे जर शिवरायांनाच विसरलो तर नव्या पिढीला आदर्श काय देणार? तळहातावर प्राण ठेवून राजांनी शत्रूशी सामना केला. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लावण्यास बंदी केली. बलात्कार करणाऱ्याचे हातपाय तोडले. अप्सरेसारख्या परस्त्रीमध्ये त्यांनी माता बघितली. रयतेचा राजा म्हणून नावलौकिक मिळवला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य स्मारक अथांग सागरात व्हायलाच पाहिजे. या स्मारकासाठी 100 कोटीच नव्हे तर कितीही खर्च झाला तरी हरकत नाही. परंतू या पैशाची तरतूद मात्र सरकारी तिजोरीतून नव्हे तर धनदांडग्यांचे पेठारे फोडून करायला हवी. महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेवर छापा टाकून पैसा लुटला. या सरकारने निदान स्वत:च्या गब्बर झालेल्या मंत्र्यांकडून, शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून, मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांकडून, शासनातील भ्रष्टाचाराने गब्बर झालेल्या अधिकाऱ्यांकडून हा पैसा वसूल करायला हवा. मुंबईत येऊन मराठी माणसाच्या जीवावर उठलेल्या धनिकांचे पेठारे उघडायला लावा, सत्ताधारी, बिल्डर, व्यावसायिक, अंबानी, अमिताभ, शाहरूख सारख्या पैशाने माजलेल्या नट-नट्यांकडून पैसे घ्या. कुणी किती पैसा दिला ते जाहिर करा आणि कोणी मागूनही पैसे देत नसल्यास त्या धेंडाचीही नावे जाहिर करा. मग हिंमत असेल, मी तर म्हणेन "मर्द असाल आणि खरोखरच मनापासून शिवप्रेमी असाल तर निधी नाकारणाऱ्या धेंडांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या घरांवर हल्ला करून दाखवा. त्यांच्याकडून स्मारकासाठी निधी मिळवून दाखवा.' पण नाही, तेव्हा मात्र यांचे शिवप्रेम जागृत होत नाही. ज्याला राजकीय वजन नाही, जेथे पहारा नसतो अशा कचेऱ्यांमध्ये व घरांमध्ये जाऊन बुद्धीजीवी वर्गावर हल्ला केला जातो, काळे फासले जाते, प्रसंगी मारहाण केली जाते. ते शक्य नसल्यास मग महिलांना पुढे करुन "बांगड्यांचा आहेर' पाठवला जातो. "शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक उभारता, मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मारक चैत्यभूमीजवळ समुद्रात उभारा' अशी मागणी रिप.नेते रामदास आठवले यांनी परवा केली आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक बनणार म्हटल्यावर यांच्या पोटात शूळ उभे राहिले. फक्त विरोधासाठी विरोध, किंवा महाराजांचे स्मारक बांधताय मग आमच्या बाबासाहेबांचेही बांधा म्हणणाऱ्या आठवलेंवर तुमच्यात हिंमत असेल हल्ला करुन दाखवा. आहे कां हिम्मत? मला डॉ. बाबासाहेबांबद्दल आदर आहे पण फक्त त्यांच्या नावाने आम्ही राजकारणच करायचे कां? लो. टिळक, आगरकर, महात्मा गांधी आदी स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणांची आहुती देणारे आपले कोणीच नाहीत कां? परंतू त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. पण स्वार्थासाठी त्यांच्या नावांचा वापर करणाऱ्यांना त्यांचे महत्त्व कळणार नाही. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध इंटरनेटवरुन अश्लिल मजकूर प्रसृत करणाऱ्या हरयाणामधील गुडगावच्या राहूल कृष्णकुमार वैद्य या 28 वर्षीय आयटी तंत्रज्ञाला पुणे पोलिसांनी अटक केली. कशासाठी? तर म्हणे सोनिया गांधीना खूष करण्यासाठी! परंतू गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदूंच्या दैवतांची विटंबना करणाऱ्या एफ.एम.हुसेन यांच्या विरोधात 1250 हून अधिक तक्रारी नोंदविलेल्या असताना, त्यांच्यावर उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात केसेस दाखल असतानाही तो विक्षिप्त माणूस मात्र आपल्या पोलिसांना सापडत नाही. याच्या उलट दुसरे उदाहरण द्यायचे तर अमेरिकेत स्वातंत्र्यदेवतेचा (लिबर्टी) जो पुतळा आहे तो पुतळा संगित सुरु केल्यावर तालावर नाचायला लागतो, अशी एक फिलिप्स कंपनीची जाहिरात आहे. त्याबद्दल अद्याप कोणीही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. परंतू हिच घटना आपल्याकडे घडलीच, स्वातंत्र्यदेवता किंवा एखाद्या पुतळ्याने नृत्य करताना दाखवले तर आपली नेतेमंडळी आकाश-पाताळ एक करतील. देशभर हिंसाचार माजेल. पुतळ्याची किंवा देवताची विटंबना केली म्हणून कित्येक वेळा राज्यात हिंसाचार, दंगली घडल्या आहेत. त्यामुळे आहे त्या पुतळ्यांना संरक्षण पुरविणे, त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. उभ्या महाराष्ट्रात 350हून अधिक किल्ले आहेत. पण हे सारे दुर्लक्षित, उद्‌ध्वस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची डागडुजी कोण करणार?
समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभारलेच पाहिजे. त्यासाठी धनिकांची तिजोरी खाली करा. आणि त्यासाठी सरकारनेच कठोर पावले उचलायला हवी. स्वयंसेवी, शिवप्रेमी संस्थाही या कार्यात मोठ्या हिरीरीने भाग घेतील. पण हे करीत असताना राज्यातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? अण्णा हजारेंनी "पाणी अडवा व पाणी जिरवा' ही चळवळ सुरु केली. आज पारनेर तालुका आणि राळेगण सिद्धी हिरवेगार झाले आहे. अशाप्रकारे अण्णाहजारेंना 100 कोटी दिले तर ते 100 गावे सुजलाम-सुफलाम्‌ करतील. लहान-मोठे प्रकल्प करता येतील. कोकणात/घाटावर छोटी धरणे बांधता येतील, वीज, रस्ते, पाणी, झाडे लावून जोपासता येतील. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. टेलिफोन, वीजेची बिले न भरल्याने पोलीस ठाण्याचे, सरकारी कार्यालयांचे कनेक्शन कापण्यात येते, दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांकडे गाडी आहे परंतू पेट्रोलसाठी पैसे नाहीत, महाराष्ट्र सरकारवर 1 लाख 20 हजार कोटींचे कर्ज आहे. शहरात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. मराठी शाळा दुरुस्तीसाठी पैसा नाही, शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही, महागाईचा वणवा पेटलेला आहे, गॅस महागला. पण त्याची चिंता कोणालाच नाही.
मुंबईत अत्याधुनिक आणि डोळे दिपवणारे महाराजांचे स्मारक असायलाच हवे. पण त्याचबरोबर महाराजांच्या या रयतेवर अन्याय, अत्याचार होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला हवी आणि महाराजांच्या नावाने किंवा त्यांच्या विरोधात मुद्दामहून राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांचे कोतळे फाडण्याचीही तयारी हवी. हिच शिवरायांना खरी श्रद्धांजली ठरेल!

विलासराव, चौकशी नको कृती करा

विलासराव, चौकशी नको कृती करा
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सध्या सुरू आहे. राज्याला दुष्काळाने भेडसावले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागचा वर्ष दुष्काळात गेला असताना पुढच्या वर्षीही त्याहून अधिक भयानक दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. या अतिशय गंभीर प्रश्नावर अधिवेशनाच्या वेळी सभागृहात विरोधकांनी चर्चा उपस्थित केली. त्यावेळी सहकार मंत्री डॉ. पतंगराव कदम हे सभागृहात उपस्थित नव्हते. इकडे महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत असताना आणि राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही पतंगराव मात्र तिकडे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आंध्र प्रदेशात? हे स्पष्ट दिसून येते.
राज्यातील जनतेच्या प्रश्नांचा निपटारा व्हावा, महत्त्वाचे निर्णय चर्चा करून सोडवले जावेत, यासाठीच अधिवेशन घेण्यात येते पण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नसते. मंत्री सोडाच आमदारांनादेखील जनतेच्या प्रश्नांबाबत आणि विधिमंडळातील उपस्थितीचे गांभीर्य नसते. वास्तविक ठराविक तास प्रत्येक सदस्याने सभागृहात उपस्थित रहावे असे बंधन असते. परंतु नियमातील पळवाटा शोधून सभागृहात गैरहजर रहाण्यात सगळेजण धन्यता मानतात हेच सर्वसामान्य जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. केवळ हजेरी लावून दिवसभर आपली इतर वैयक्तीक कामे करण्यात मग्न असणाऱ्या अशा सर्व लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हायला हवी. पण सगळेच चोर म्हटल्यावर कारवाई कोण आणि कोणावर करणार? हा प्रश्न पडतो. विधिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थितीबद्दल मागच्या अधिवेशनाचा कार्यकाळ पाहिला तर खुद्द मुख्यमंत्री व सभापतींनी अनेकवेळा सज्जड दम देऊनही कोणीही ऐकत नसल्याचे दिसून येते. महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी संबंधित मंत्री उपस्थित नसतात. त्यामुळे मग त्या पक्षाच्या उपस्थित असलेल्या दुसऱ्या खात्याच्या मंत्र्याला वेळ मारून न्यावी लागते. पण ज्यासाठी हे अधिवेशन घेतले जाते ते प्रश्न मात्र तसेच प्रलंबित राहतात. त्यामुळे या गैरहजर मंत्र्यांवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. पण अशावेळी अनुपस्थित मंत्र्यावर पक्षाने अथवा विधिमंडळाचा नेता म्हणून मुख्यमंत्र्यांनी कारवाई केल्याचे स्मरत नाही. परंतु परवा पतंगराव कदमांच्या बाबतीत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रथमच जाहिरपणे कारवाईची भाषा वापरली. आता कदाचित त्यांना पक्षांतर्गत होणारा विरोध कमी झाला असावा म्हणूनच विलासरावांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिवेशनाच्या काळात सहकार मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अधिवेशनाव्यतिरिक्त इतर कार्यक्रम आखणे गरजेचे नव्हते. अधिवेशन काळात सभागृहात चर्चिले जाणारे विषय हे प्रत्येक सदस्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर सर्वोच्च प्राधान्यक्रमाचे असतात. आणि या अधिवेशनाची तयारी तब्बल तीन महिने आधीपासून ठरलेली असते. तारांकित प्रश्नांची यादी दोन महिने आधीच निश्चित करण्यात येते. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी अचानक जाहीर केलेला नसतो. अशावेळी इतर सत्कार सोहळे, पुस्तक प्रकाशने आणि इतर जाहीर कार्यक्रम दुय्यम स्थानी जायला हवेत. पण असे होत नाही. डॉ. पतंगराव कदमांनी अधिवेशनातील कामकाजाला प्राधान्य दिले नाही. त्यांना राज्याच्या ज्वलंत प्रश्नांपेक्षा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कार्यक्रम खूप महत्त्वाचे वाटतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा त्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन लाख मोलाचे वाटते. बरं, इतका सगळा प्रकार घडल्यानंतरही पतंगराव हे आपले कार्यक्रम पूर्वनियोजित होते असे सांगत टेंभा मिरवतात. म्हणजेच पतंगरावांना राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी काहीही सोयर-सुतक नसल्याचे जाणवते. विधानसभा अध्यक्षांना कळवल्याचे डॉ. कदम सांगतात. म्हणजे ही एक पळवाटच नाही का? मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेल्या डॉ. पतंगराव कदमांसारख्या एका ज्येष्ठ मंत्र्याने तरी असे वागणे बरं नव्हे. अधिवेशनाच्या काळात तरी इतर कोणतेही राजकीय आणि दिखाव्याचे कार्यक्रम महत्त्वाचे असूच शकत नाहीत.
जनतेच्या प्रश्नावर उद्‌भवलेल्या चर्चेसाठी चर्चेसाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. त्यावर तोडगे सुचवावे लागतात. सर्व संबंधितांशी चर्चा करावी लागते. अनेकदा जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न अधिवेशन काळातच ऐरणीवर येतात. त्यावेळी मंत्री आणि आमदारांनी आपली इतर कामे बाजूला ठेवून या चर्चेत सहभागी व्हायला हवे. पण बऱ्याच सदस्यांना त्याचे महत्त्वच कळत नाही. कारण अशा चर्चांना बाहेर काडीचीही प्रसिद्धी मिळत नाही. वृत्तवाहिन्यांवर फोटो झळकत नाहीत. त्यामुळे सर्वजण विधिमंडळात अनास्था दाखवतात. त्यामुळे अधिवेशन काळात इतर कोणतेही कार्यक्रम सदस्याने स्विकारू नयेत याची सक्ती व्हावी आणि यासंदर्भात सभागृहात चर्चा करून यावर विधेयक तयार करायला हवे. तसेच दांड्या मारणाऱ्या व कधीही चर्चेत भाग न घेणाऱ्या सदस्यांची यादीच प्रसिद्धीला द्यायला हवी. तरच लाजेपोटी तरी हे सदस्य हजर राहून दुसऱ्यांचे पाहून मग स्वत: कामकाजात भाग घेतील. डॉ.पतंगराव कदम यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे ते त्यांनी बोलल्याप्रमाणे खरोखर अंमलात आणायलाच हवे. नुसती चौकशी नको, प्रत्यक्षात कृती हवी. यामध्ये मात्र पळवाटा नकोत, तरच इतर मंत्र्यांना आणि आमदारांना यापासून चांगला धडा मिळू शकेल.