Monday, August 29, 2011

अण्णांच्या आंदोलनाने भ्रमाचा भोपळा फोडला

सक्षम लोकपालसाठी ज्या राजकीय सहमतीची अण्णांनाच नव्हे, तर सार्‍या देशाला प्रतीक्षा होती, ती पूर्णांशाने जरी नाही, तरी बर्‍याच अंशी झाल्याचे संसदेने पारित केलेल्या प्रस्तावांमुळे म्हणता येईल. अण्णांनी अधिक स्पष्टतेचा हेका न धरता आपले ऐतिहासिक उपोषण मागे घेतले हेही योग्य झाले. संसदेत शनिवारी दिवसभर जी चर्चा झाली, त्यातील भाषणांचा सूर मात्र निराशाजनकच होता. संसदेच्या प्रतिष्ठेचा बाऊ करून बहुतांशी खासदार अण्णा, त्यांचे सहकारी, कार्यकर्ते, त्यांच्या चळवळीत सामील झालेल्या स्वयंसेवी संघटना, प्रसारमाध्यमे यांच्यावर ज्या भाषेत तुटून पडले ते पाहिले तर या मंडळींना अजूनही अण्णांच्या एवढ्या विराट जनआंदोलनाच्या यशाचे खरे कारण कळलेच नसावे असे दिसते.

स्वतः या देशाच्या जनतेचे खरे लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणवणार्‍या आणि ती प्रौढी मिरवीत ‘आमच्या पगडीला हात घालाल तर खबरदार’ अशी दमदाटी करणार्‍या या मंडळींनी लाखोंच्या संख्येने देशातील जनता आज आपल्या विरोधात का गेली आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जरी केला असता, तरी कोठे काय चुकते आहे त्याचा साक्षात्कार त्यांना घडला असता. निवडणुकीत आपल्याला जनतेची मते जिंकली म्हणजे त्यांची मनेही जिंकली आहेत, या भ्रमाचा भोपळा खरे तर अण्णांच्या या आंदोलनाने पूर्णपणे फोडला आहे.

आपल्या लोकशाही व्यवस्थेत भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिलेबाजी एवढी खोलवर झिरपण्यास आपले राजकीय नेतृत्वच जबाबदार आहे याविषयी जनतेची खात्रीच पटलेली आहे. राजकारण्यांविषयीचा हा जो तिटकारा जनतेच्या मनात आहे आणि जो या विराट जनआंदोलनाच्या निमित्ताने प्रकटला, त्याची कारणे काय आहेत याचे आत्मपरीक्षण खरे तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने करणे आवश्यक आहे. देशाच्या राजकीय नेतृत्वाने आपला विश्वास गमावलेला आहे. पत गमावलेली आहे. जनता नाराज आहे, संतप्त आहे. तिच्या आक्रोशाला अण्णा हजारे या सच्च्या माणसाच्या एका हाकेने वाचा फुटली आणि जनतेच्या आपल्या राजकीय व्यवस्थेप्रतीच्या संतापाचा बांध फुटून दबलेला, दडपलेला असंतोष उत्स्फूर्त वाहू लागला.

सर्व राजकीय पक्षांना तो गदागदा हलवून गेला. अण्णांना तुरुंगात डांबून हे आंदोलन दडपू पाहणार्‍या काँग्रेसप्रणित सरकारला नाक मुठीत घेऊन शरण यावे लागले. या आंदोलनापासून स्वतः दूर राहिलेल्या भाजपाला आपण पूर्णपणे अण्णांसोबत आहोत असे उपोषणाच्या शेवटच्या टप्प्यात का होईना सांगावे लागले. संसदेत जी सहमती घडून आली ती काही सहजासहजी घडलेली नाही. जनतेच्या रोषाची तीव्र धग जाणवल्याने आलेल्या भीतीपोटीच ही सहमती घडून आलेली आहे. एकेका राजकीय नेत्याची संसदेत ज्या प्रकारे या आंदोलनाला उद्देशून टोमणेबाजी चालली होती, ती पाहिली तर जनतेच्या रेट्यामुळे निरुपाय होऊनच ही शरणागती पत्करली गेली आहे हे स्पष्टपणे कळून चुकते. अण्णा शंभर टक्के बरोबर होते असे मुळीच नाही. त्यांच्या भोवतीच्या कोंडाळ्याला हा विषय चिघळलेलाच हवा आहे की काय अशी शंका येईपर्यंत तो कंपू आक्रस्ताळेपणाने वागत आला. अगदी शनिवारी संसदेत सर्व राजकीय पक्षांकडून अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत याचे संकेत मिळत असतानादेखील केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण वैगैरेंनी शेवटपर्यंत अडेलतट्टूपणा चालवला होता. मेधा पाटकर या आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात वाटाघाटींच्या केंद्रस्थानी एकाएकी कशा आल्या, ही बाबही बोलकी आहे. संसदेच्या दोन्ही सदनांत सहमतीचा प्रस्ताव पारित झालेला असतानाही सरकारकडून काहीच सकारात्मक घडलेले नाही आणि जे घडले ते आम्हाला अमान्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या दिसल्या. मात्र, मतदान, मतविभाजन वगैरेंचा हट्टाग्रह न धरता संसदेत व्यक्त झालेल्या व्यापक भावनेशी सहमती दर्शवून अण्णांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय विवेकाने घेतला आणि भरकटत चाललेल्या आंदोलनाचे गाडे पुन्हा रूळावर आणले. संसदेने अपेक्षेप्रमाणे सक्षम लोकपाल कायदा बनवण्याची जबाबदारी आता स्थायी समितीवर सोपवलेली आहे. अर्थात, संसदेत व्यक्त झालेली भावना ही स्थायी समितीने अनुसरणे अपेक्षित असले तरी ती बंधनकारक नसते हेही तितकेच खरे आहे. विविध पक्षांची सहमती विचारात घेऊन अंतिम लोकपाल मसुदा तयार होणे ही वेळकाढू प्रक्रिया आहे, कदाचित त्यासाठी काही महिने लागतील. परंतु संसदीय प्रणालीचा आदर करीत अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तेवढी प्रतीक्षा करायला हवी. या जनआंदोलनाने सर्व राजकीय पक्षांवर निर्माण केलेला दबाव यापुढेही कायम ठेवण्याचे कार्य तर त्यांना करावेच लागेल, अण्णा केवळ लोकपालपुरते न पाहाता देशात ही जी चेतना जागलेली आहे, ती आग प्रज्वलित ठेवून निवडणूक सुधारणांपर्यंत हा विषय व्यापक करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तो प्रयत्न यशस्वी झाला तर ते नक्कीच देशहिताचे ठरेल. या देशाच्या प्रत्येक आम नागरिकालाही भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा या आंदोलनाने दिली आहे. ज्या तीन मूलभूत मुद्द्यांवर सर्व पक्षांनी एकमत व्यक्त केले, त्यांच्या अंमलबजावणीतून भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला नक्कीच फार मोठी बळकटी मिळणार आहे. सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती असो, प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रशासकीय पारदर्शकता आणणारे सिटिझन्स चार्टर व तक्रार निवारण व्यवस्था असो, किंवा वरिष्ठ नोकरशहांबरोबरच कनिष्ठ सरकारी कर्मचार्‍यांवरील अंकुश असो. तळागाळातल्या नागरिकांच्या हाती एक फार मोठे शस्त्र अण्णांच्या या आंदोलनातून मिळणार आहे. माहितीचा अधिकार कायद्याने देशात कशी क्रांती घडवली, भ्रष्ट नेत्यांचे बुरखे कसे टराटरा फाडले ते गेल्या काही वर्षांत आपण पाहिले. लोकायुक्तांची ताकद काय असते तेही कर्नाटकात आपण अनुभवले. या देशाच्या सामान्य नागरिकाच्या मनगटास भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे बळ देणार्‍या ज्या गोष्टी संसदेने सर्वसहमतीने प्रस्तावित केलेल्या आहेत, त्यांचा वापर शेवटी जनतेला करावयाचा आहे. लाच घेणारा जसा दोषी असतो तसा लाच देणाराही गुन्हेगारच असतो. देश भ्रष्टाचारमुक्त जर करायचा असेल तर केवळ ‘मी अण्णा आहे’ च्या टोप्या मिरवून ते घडणार नाही. अण्णांनी वयाच्या ७४ व्या वर्षी जो निर्धार, जी चिकाटी, जे साहस दाखवले, ते आपल्या अंगी उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाला करावा लागेल. या देशामध्ये असे वातावरण निर्माण व्हावे की भ्रष्टाचार्‍यांना जनतेचा धाक वाटला पाहिजे. मतदारांना मिंधे बनवून निवडणुका जिंकण्याचे फॉर्म्युले गवसलेल्या भ्रष्ट, स्वार्थी लोकप्रतिनिधींना आपल्या मतदाराचा धाक वाटला पाहिजे. त्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता जर आपल्याकडून होणार नसेल, तर तो पुढच्या निवडणुकीत आपल्या घरी बसवील, आपल्या आमिषांना आणि आश्वासनांना तो बळी पडणारा नाही ही भीती जर राजकारण्यांच्या मनात निर्माण झाली, तरच या देशातील भ्रष्टाचाराची सध्या मातलेली बजबजपुरी नाहीशी होईल.

भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणार्‍या अण्णा हजारेंचा आवाज थेट दिल्लीच्या तख्तावर धडकला. सारे देशवासीय अण्णांच्या पाठीशी उभे राहिले. अण्णांचा आवाज, अण्णांची भावना सार्‍यांनाच आपली वाटू लागली. मात्र, असे असताना काही मंडळींनी बुद्धीभेद करण्याची संधी साधलीच. काही ठोस मुद्दे किंवा युक्तिवाद घेऊन कुणी अण्णांच्या आंदोलनाला विरोध करत असेल तर त्याचे स्वागत आहे. पण असे रॉय-बुखारींसारखे निराधार आरोप करून कुणी जनतेची दिशाभूल करत असेल तर त्याने आंदोलनाला अधिक समर्थन मिळत जाते हे दिसून आले. आता अण्णांच्या आंदोलनात सहभागी व्यक्तींच्या चारित्र्यहननाचा खटाटोप सुरू झाला असताना यामागील षडयंत्र लक्षात घेण्याची गरज आहे. आंदोलन कोणतेही असो त्याला आम-जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे असे दिसू लागले की, विरोधकांकडून त्या आंदोलकांचे पाय खेचण्याचे प्रयत्नही तेवढ्याच वेगाने सुरू होतात. आंदोलन मोडून काढण्याचा कुठल्याही सरकारचा सरधोपट मार्ग म्हणजे दबावतंत्राचा आणि बळाचा वापर करणे. जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेले अण्णा हजारे यांचे ताजे आंदोलन चिरडून काढण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारने अण्णांना अटक करत सर्वप्रथम पोलिसी खाक्याचा वापर केला. पण तो डाव बुमरँगप्रमाणे उलटला आणि जनतेची वाढती सहानुभूती मिळून आंदोलनाला अधिक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील मनीष तिवारींसारख्या बोलघेवड्या प्रवक्त्याने अण्णांवरच भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्या चारित्र्यहननाचा लाजिरवाणा प्रयत्न केला. त्याचाही आंदोलनावर किंवा त्याला समर्थन देणार्‍या जनतेवर परिणाम झाला नाही. उलट सरकारच्या वरील दोन्ही कारवाया कशा चुकीच्या होत्या, हे  काँग्रेसचेच खासदार संदीप दीक्षित, नवीन जिंदाल, संजय निरुपमसारख्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. हे सरकारी उपाय फिके पडल्यामुळे की काय म्हणून मग बूकर पुरस्कारविजेत्या ख्मातनाम लेखिका अरुंधती रॉय आणि दिल्लीतील जामा मशिदीचे सय्यद जामा बुखारी यांनी अण्णांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा विडा उचलला. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे देश ढवळून निघालेला असताना दिल्लीत जामा मशिदीचे इमाम सैयद अहमद बुखारी यांनी या आंदोलनापासून मुस्लिमांना लांब राहण्याचा सल्ला दिला. अण्णांचे आंदोलन हे ‘संशयास्पद’ असून ‘वंदे मातरम’च्या घोषणेला त्यांचा आक्षेप होता. विशेष म्हणजे बुखारी हे आवाहन करत असतानाच, दिल्लीत त्यांच्या घरापासून दोनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडिया गेटवर अण्णांचं समर्थन करण्यासाठी आलेले अनेक मुस्लिम तरुण ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा देत होते. रमजानचा महिना सुरु असल्याने ‘मै अन्ना हूं’च्या टोप्या घातलेल्या या तरुणांनी इंडिया गेटवर इफ्तारही केला. दिल्लीतल्या जामा मशिदीच्या इमामपदावर आपला मालकी हक्क सांगत मुस्लिम समाजाला नेहमी उफराटे सल्ले देण्यात सैयद अहमद यांचे वडील इमाम बुखारी यांची हयात गेली. ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा ही ‘परंपरा’ पुढे सुरू ठेवतोय. अण्णांचं जनलोकपाल बिलासाठीचं आंदोलन हे मुळात भ्रष्टाचार संपवण्यासाठीचं आंदोलन आहे. सध्या भ्रष्टाचारानं देशातल्या सर्वांचचं जगणं असह्य केलेलं आहे. भ्रष्टाचारामुळे पिचल्या गेलेल्या लोकांच्या भावनाच इतक्या तीव्र आहेत की या आंदोलनात मध्यमवर्ग, गरीब वर्ग, समाजातल्या सर्व वर्गातले नागरिक आपसूकच ओढले. अण्णांच्या हाकेला ओ देत जनलोकपालच्या मागणीसाठी मुस्लिम समाजसुद्धा या चळवळीत उतरला. भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. यातच आपल्या भावी पिढीचं भलं आहे, याची जाणीव इतराप्रमाणे सर्वसामान्य मुस्लिमांना असली तरी जामा मशिदीच्या इमामला मात्र ती नाही. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने अनेक मिथकं गळून पडली. लोक, जात, धर्म, वर्गाच्या भिंती तोडून अण्णांच्या समर्थनार्थ एकत्र आले. अरुंधती रॉय यांनी एका इंग्रजी दैनिकात लेख लिहून हे नवे संत अण्णा हजारे नक्की आहेत तरी कोण, असा सवाल करत अण्णा व त्यांच्या आंदोलनावर टीकेची जोरदार झोड उठवली. बरे झाले, या दोघांच्या टीकेची दखल खुद्द अण्णा किंवा त्यांचे प्रमुख समर्थक यांनी घेण्यापूर्वी इतरांनीच त्याची खिल्ली उडवली. मुस्लिम समाजातील अनेक जाणकारांनी इमामांचा हा दावा हास्यास्पद ठरवत या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. लोकपाल ही काही जादूची कांडी नव्हे. त्या व्यवस्थेच्या मर्यादाही लक्षात येण्यासारख्या आहेत. पण कुठे तरी सुरुवात व्हावी आणि त्यातल्या त्यात भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण व्हावी हा या मागणीमागचा सरळ हेतू आहे हे अरुंधती रॉय यांना समजत नाही का? उठसूठ अण्णांचे उपोषण करणेही सर्वांना मान्य नाही. परंतु त्यांचा त्यामागचा प्रामाणिक हेतू तळमळ किंवा जनहिताबद्दलचा ध्यास याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. निराधार आरोप करून कुणी जनतेची दिशाभूल करत असेल तर त्याने आंदोलनाला अधिक समर्थन मिळत जाते, याची प्रचिती मात्र यावेळी सर्वांना आली.

Thursday, August 25, 2011

स्व-नेतृत्व दाखवा!

""३० ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक संमत केले गेले नाही तर, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे व्यापक जन आंदोलन देशात उभारले जाईल. देशात स्वयंप्रेरित उठाव होईल आणि सरकारला पाय उतार व्हावे लागेल"", असे सांगत अण्णा हजारेंनी आपले उपोषण चालूच ठेवलेले आहे. ""अण्णा जगले किंवा नाही, तरीही आंदोलनाची ही मशाल सतत पेटती ठेवा"", असे सांगून तरूणांनी लढा देण्यासाठी सज्ज व्हावे असेही आवाहन अण्णांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद देत तरूणाई आज रस्त्यावर उतरताना दिसत आहे.

देशाची लोकसंख्या पाहता, दिल्ली अथवा इतर ठिकाणी गर्दी करणार्‍या तरूणाईने आज लक्ष वेधले असले तरी, मुंबई-ठाण्यातील तरूणाईनेही आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवले आहे. मुंबई-ठाण्यातील  तरूणाई मौजमजा करण्यातच दंग आहे, तारूण्य वाया घालवणे एवढेच त्यांचे ध्येय आहे, असे वाटत असतानाच तरूणाई एका जोषाने पुढे येते, हीच एक सध्याच्या आंदोलनाची जमेची बाजू म्हणावी लागेल. अण्णांनी आवाहन करताच मुंबई-ठाण्यातील  तरूण-तरूणी आपला बुलंद आवाज घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. ही बाब राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आश्‍वासक आहे, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच या तरूणाईचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत व्हायला हवे. तरीही अण्णा हजारेंच्या नावाने भाऊगर्दी करणार्‍या या तरूणाईत खरोखरच सद्य परिस्थितीचे गांभिर्य आहे काय? याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षांवर आणण्यात आली होती तेव्हा, देशातील तरूणाईवर अविश्‍वास दर्शवण्याचे काम बुजुर्गांनी केले होते. वय वाढले म्हणून राजकीय अक्कल येत नसते असे बोलून बुजुर्गांची खिल्ली उडवत तरूणाईचे समर्थनही त्या काळी झाले होते. आज पुन्हा एकदा तरूणाईचा उन्माद पाहून या तरूणाईत खरोखरच गांभिर्य आहे का? असा एक सूर, हवा असल्यास निराशावादी सूर म्हणण्यास हरकत नाही, यायला लागलेला आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग सामील झाला आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाविषयी कुणाच्या मनात संशयाची पाल चुकचुकण्याचे कारण नाही. त्यांच्या आंदोलना विरोधी ओरड चाललेली आहे ती, प्रस्थापितांकडून. आपला भ्रष्टाचार आता उघड होईल अथवा यापुढे आपल्या भ्रष्टाचारास थारा नाही असे वाटल्यानेच आज सत्तास्थानी असलेले अण्णाविरोधी वातावरण तयार करीत आहेत. त्यांच्या विषयीचा अपप्रचार जनमानसात पसरवित आहेत. पण त्याचा काडीचाही असर झाल्याचे दिसत नाही. कारण अण्णांचे हे काही पहिलेच आंदोलन नव्हे. या आधी त्यांनी कित्येक आंदोलने केलेली आहेत, आणि त्यांना चांगला पाठिंबा मिळून ती यशस्वीही झालेली आहेत. म्हणूनच आजच्या या आंदोलनामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहेत. त्याही पेक्षा सरकार आणि सत्ताधारी घाबरलेले आहेत ते, अण्णाच्या एका हाकेने रस्त्यावर उतरणारी, जल्लोषाने पेटलेली तरूणाई पाहून, कारण हीच तरूणाई या भ्रष्टाचारी सत्ताधार्‍यांची भांडवली गुंतवणूक आहे. अण्णांनी याच गुंतवणूकीला हात घातलेला आहे. ही तरूणाई ३० ऑगस्टपर्यंत अशीच उन्मादाने भरलेली राहिली आणि ती चेतवण्यात अण्णा हजारे यशस्वी ठरले तर, अण्णा आणि आमच्या सारखे देशाचे भले इच्छिणारे नक्कीच देशाचे दुसरे स्वातंत्र्य पाहू शकतील.

आज अण्णा हजारे केवळ निमित्तमात्र झालेले आहेत. भ्रष्टाचाराने पिचलेली जनता, दडपशाही, महागाई, काळाबाजार, आतंकवाद, झुंडशाही यामुळे आतल्या आत खदखदणारी जनता या असंतोषातून मुक्त होऊ इच्छित होती. त्याला वाट करून दिली ती अण्णा हजारेंसारख्या ज्वालामुखीने! आज या ज्वालामुखातून तरूणाईच्या ज्वलंत लाव्हा उत्सर्जित होत आहे, तो भ्रष्टाचाराचा नरकासूर कायमचा नष्ट करण्यासाठी. हा लाव्हा आम्ही वाया जावू देता कामा नये. त्याला योग्य असे वळण देण्याची गरज आहे. म्हणूनच रस्त्यावर उतरलेल्या तरूणाईच्या स्वागताबरोबरच तीला दिशा देण्याचेही कर्तव्य आम्हा सर्वांचे आहे, ते एकट्या अण्णांचे नाही याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.

सध्या मुंबई-ठाण्यापुरताच विचार केला तर, मुंबई-ठाण्यातील  तरूणाई गेली तीन दशकं कुठे दृष्टीपंथातच येत नव्हती. शिवसेनेच्या अधुनमधून कानावर पडणार्‍या घोषणा आणि बावचळलेल्या हिंदूत्ववाद्यांच्या मिरवणुका सोडल्यास राज्यातीन जनतेने अन्यायाविरूद्ध, शोषणाविरूद्ध एकही मोर्चा हल्लीच्या काळात पाहिला नव्हता. जणू काही मुंबई-ठाण्यातील  तरूणाई गाढ निद्रीस्त झालेली आहे. विद्यार्थी सेना आपल्या अभ्यासात आणि करियरच्या भ्रामक स्वप्नात बुडून गेली की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसत होती. पण आता अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यातील  विद्यार्थी आणि युवावर्ग भरभरून रस्त्यावर उतरायला लागलेला आहे. ही फक्त तात्पुरती जल्लोषबाजी नव्हे, हा फक्त रस्त्यावर येऊन सादर करण्यासारखा तात्पुरता स्वरूपाचे रस्तानाट्य प्रयोग नव्हे. कारण असले प्रसंग हे परत परत येत नसतात. काही दशकानंतर अण्णा हजारेंसारखी एखादीच व्यक्ती सुरुंगाची वात पेटवायला पुढे सरसावत असते. अण्णा हजारेंची तुलना महात्मा गांधींशी जरी होऊ शकत नसली तरी गांधीजींनंतर जयप्रकाश नारायण आणि आता अण्णा हजारे जनतेसमोर आश्‍वासक मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. या मशालीने देशातील ज्वलंत पलिते तापलेले आहेत, सुरुंग पेटलेले आहेत. या पलित्यांचे डाग भ्रष्टाचा-यांच्या ढुंगणावर कसे द्यायचे, हे सुरूंग अचूक ठिकाणी कसे पेरायचे जेणे करून समाजाच्या कल्याणासाठी त्यांचा वापर होईल, याचा विचार आताच करायला हवा.
आज देशातील तरूणाईचा वापर राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी चालवलेला आहे. या तरूणाईला आपले कार्यकर्ते म्हणून वापरायचे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना या वयात आवश्यक असलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी द्यायच्या हीच भ्रष्ट निती म्हणा अथवा कुटनिती म्हणा या भ्रष्टाचारी राजकीय धेंडांनी चालू ठेवलेली आहे. याचे कारण काय तर, आज  एकही नेतृत्व या तरूणाईसमोर कार्यक्रम ठेऊ शकलेले नाही. विधायक कार्यक्रम देऊ शकणारे जबरदस्त ताकदीचे विधायक नेतृत्व आज अस्तित्वात नाही असे नाईलाजाने म्हणावे लागते. जे नेतृत्व पुढे पुढे करताना दिसते ते प्रसिद्धीला हपापलेले आणि राजकीय अस्तित्वाची खुमखूमी असलेले सवंग नेतृत्व आहे. या नेतृत्वाकडून आजच्या तरूणाईला योग्य मार्गदर्शन मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ही तरूणाई म्हणजे या राजकीय नेत्यांची पिळावलच आहे. भ्रष्टाचाराने कमावलेल्या नोटा या तरूणाईसमोर नाचवायच्या आणि त्यांच्या कडून आपल्यासाठी मतांचे गठ्ठे वळवायचे एवढेच काम या तरूणाईकडून करवून घेतले जात आहे. त्याच्या बदल्यात तात्पुरत्या सुख-चैनीची व्यवस्था या तथाकथित नेतृत्वाकडून व्यवस्थितपणे करण्यात येते.

अण्णा हजारेंच्या पायगुणाने का होईना, त्यांच्या हाकेने देशातील तरूणाई पेटून उठलेली आहे. त्यांच्यासाठी हे आंदोलन म्हणजे जल्लोषाने भरलेले स्नेहसंमेलनही असेल, त्यांच्यासाठी हा सर्व प्रकार म्हणजे एक इव्हेंटही असेल, पण तरूणाई घोषणा देत उठली हेच महत्वाचे आहे. तीला कशी पेटवायची, पेटवत ठेवायची याचा विचार थंड डोक्याने देशाच्या भवितव्याचा विचार करणार्‍यांनी करायला हवा. डोक्यावर ""मी अण्णा हजारे"" असे लिहिलेली गांधी टोपी घातली म्हणून कोणी अण्णा हजारे होऊ शकत नाही. अण्णा हजारे होण्यासाठी त्यागाची आवश्यकता असते. बिनापरवाना वाहने हाकून पोलिसांनी अडवल्याबरोबर त्यांच्या हातावर चिरिमीरी टाकून सुटका करून घेण्यात धन्यता मानणारे अण्णा हजारे होऊ शकत नाहीत. अण्णा हजारे होण्यासाठी प्रचंड आत्मबळ लागते. ते बळ तरूणाईने आधी आपल्या अंगी बाणवायला हवे. सर्व प्रथम आपण कोण आहे? याचे भान बाळगायला हवे. 

आमच्या देशाला एक गांधी, एक जयप्रकाश आणि एक अण्णा पुष्कळ झाले, आम्हाला अण्णा व्हायची गरज नाही. फक्त अण्णांनी जे विचार दिलेले आहेत ते समजून घेऊन स्व-नेतृत्व देशापुढे आणण्याची गरज आहे. त्याच दिशेने आपण पुढे जावूया! त्याच पंथाचा स्वीकार करूया!!

Wednesday, August 17, 2011

अण्णा जिंकलेच पाहिजेत

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अटकेच्या बातमीनंतर देशभरातील आणि विदेशातील लाखो भारतीयांनी फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आदी सोशल नेटवर्किंग वेबसाईट वापरून अण्णांच्या समर्थनासाठी आवाहन केले. अण्णांच्या कार्याची महती गाणारे ई मेल आणि एसएमएसही दिवसभर इनबॉक्‍स मधून फिरत राहिले. अण्णांनी सरकारपासून थेट विरोधकांचीही पुरती भंबेरी आणि झोप उडवली आहे. विरोधकांना अण्णांच्या मागे फरफटत जाण्यावाचून पर्याय उरलेला नाही. शिवसेनेच्या डरकाळ्या फोडणा-या आणि कधीकाळी अण्णांना वाकड्या तोंडाच्या गांधीम्हणून हिणवणा-या या अण्णांना बिनशर्त पाठींबा दिला.राज ठाकरेंनी अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करून पहिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अवाक झालाय.गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्या गांधीने जनसंघर्षाला तोंड फोडून सर्वांना एकत्र केले आहे.स्वातंत्र्यचळवळीनंतर असा एकमुखी पाठींबा जयप्रकाश नारायणांनासुद्धा मिळवता आला नव्हता.हे नेतृत्व अचानक उपटलेले नाही ते पिचलेल्या, नाडलेल्या, गांजलेल्या, उगबलेल्या, त्रासलेल्या जनतेने आपणहून पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सर्व मिडीयानेही त्यांना एकप्रकारचे समर्थन देऊन भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत प्रमुख भुमिका घेतली आहे. मिडीयानेच जनतेला जागे केले. अण्णांचे विचार, त्यांचे निर्णय, पुढचे धोरण जगजाहीर केल्याने जनता जागृत झाली. तरुणवर्ग पेटून ऊठला. 

देशाला विळखा घालून राहिलेल्या राजकीय व शासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर लोकपाल विधेयक आणावे या मागणीसाठी मंगळवारपासून उपोषण पुकारणार्‍या अण्णा हजारेंना त्यासाठी ऐनवेळी परवानगी नाकारून सरकारने भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाप्रती आपली नकारात्मकताच प्रकट केली आहे. अण्णांना सरकार एवढे का घाबरते? उपोषणासारखा अत्यंत शांततामय व संवैधानिक मार्ग अवलंबिणारे अण्णा असोत, अथवा रामदेव बाबा असोत, त्यांचे आंदोलन दडपण्याचे, चिरडण्याचे जे प्रयत्न झाले अथवा होत आहेत, ते निषेधार्ह आहेत. अण्णांच्या उपोषणामुळे सत्ताधीशांची आसने डळमळू लागली आहेत. हे बळ अर्थातच केवळ अण्णांचे नाही. ते नैतिकतेचे बळ आहे. सच्चेपणाची ती ताकद आहे. दुसर्‍या स्वातंत्र्याची ही लढाई आहे आणि ती जिंकल्याशिवाय मागे हटणार नाही, असा वज्रनिर्धार करणार्‍या अण्णांना आज अवघ्या देशाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष साथ आहे. त्यांनी उद्गार दिलेली भावना ही आजच्या घडीस समस्त देशाचीच भावना आहे. भ्रष्टाचाराच्या पाण्यात आपण आकंठ बुडालेलो आहोत आणि देशही बुडण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठी क्रिकेट संघाला जेवढा पाठिंबा मिळाला त्यापेक्षा  जास्त पाठिंबा भ्रष्टाचारविरोधी कठोर कायद्यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना द्यायला हवा, असे आवाहन अभिनेता आमिर खान याने देशवासियांना केले. सर्व स्तरातून अण्णांना पाठींबा मिळाला, मिळत आहे.

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारी तिजोरीला गंडा घालून बुडवले गेलेले एक लाख श्याहात्तर हजार कोटी म्हणजे किती शून्ये रे भाऊ असा प्रश्न पडणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला या अपरिमित लुटीची व्याप्तीच आकळेनाशी झाली आहे एवढा अमर्याद भ्रष्टाचार डोळ्यांदेखत घडत असताना त्यावर अंकुश आणण्याचा विचार कोणी तरी प्रामाणिकपणे बोलून दाखवतो आहे याचे देशाला नक्कीच कौतुक आहे. मात्र, अशा प्रकारच्या आंदोलनाच्या यशस्वीततेसाठी केवळ जनतेचे नैतिक पाठबळ पुरेसे ठरत नसते. आंदोलनाचे स्वरूप काय असेल, ते कुठवर ताणायचे आणि कोणत्या टप्प्यावर मागे घ्यायचे याचे अचूक आडाखे नेत्यांपाशी असावे लागतात. ते नसतील तर बाबा रामदेव यांच्या बाबतीत जे घडले, त्या प्रकारची नामुष्की वाट्याला येते. बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध देशव्यापी वादळ उभे केले. अण्णा हजारेंपेक्षाही अधिक प्रमाणात जनतेचा त्यांना प्रतिसाद लाभला होता. त्यांना बुद्धिवाद्यांची साथ भले नसेल, परंतु देशाच्या सर्व थरांतील नागरिकांपर्यंत ते आपल्या योगप्रसाराद्वारे पोहोचलेले आहेत. त्यामुळे बाबा रामदेव यांनी जेव्हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध लढा पुकारला, तेव्हा देशात एक चेतना जागली होती. दुर्दैवाने त्यांचा भाबडेपणा नडला आणि भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटून उभ्या ठाकलेल्या कार्यकर्त्यांचा अवसानघात झाला. ज्या मग्रुरीने सरकारने ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, ते पाहाता त्याविरुद्ध देशभरात उसळलेल्या असंतोषावर स्वार होत आपल्या आंदोलनाचा वणवा अधिक तीव्र करण्याची रामदेव यांना संधी होती, परंतु सरकारने त्यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावल्यामुळे असेल वा अण्णांच्या समांतर आंदोलनामुळे असेल, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. अण्णांच्या आंदोलनाच्या बाबतीत असे घडू नये अशी जनतेची अपेक्षा आहे. अण्णा हा ग्रामीण आणि धनिक भारताला सांधणारा दुवा ठरला आहे. फक्त आपले आंदोलन ते कशा प्रकारे चालवतात, त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. केवळ भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडा केल्याने प्रश्न सुटत नसतात. लोकपालसाठी एवढा दबाव निर्माण केल्यानंतर सरकार झुकले तरी त्यातून शेवटी काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सरकारने आपल्याला हवा तसा आणि राजकारण्यांना सोयीचा ठरणारा मसुदाच लोकपालच्या रूपाने पुढे आणला आहे. अण्णांच्या उपोषणामुळे सरकार पुन्हा झुकण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु देश जागतो आहे आणि हे जागणे महत्त्वाचे आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध, काळ्या पैशाविरुद्ध जे तीव्र जनमत गावोगावी, खेड्यापाड्यांतून निर्माण होते आहे, त्याकडे सहजासहजी दुर्लक्ष करणे कोणालाही परवडणार नाही. आपल्याविरुद्ध देशात उठलेल्या वणव्यावर जेवढे त्वरेने पाणी फेरता येईल तेवढे राजकारण्यांना हवेच आहे. परंतु अण्णांच्या मागे आज अवघा देश उभा आहे हे मात्र त्यांनी विसरू नये. अण्णांनी जिंकलेच पाहिजे. ते हरले तर त्याचा अर्थ देश हरला असाच होईल. खरेच ही दुसर्‍या स्वातंत्र्याचीच लढाई आहे.