Tuesday, October 28, 2008

...तीच खरी दिवाळी

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवले नाहीत तर ती दिवाळी कसली असा प्रश्न काहीजण करतात. परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीत मात्र करोडो रूपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे जागतिक मंदी आली असली, व्यापारी हवालदील झाले असले, महागाईने सर्वांना त्रासले असले तरी आणि राज्यातील शेतकरी आत्महत्या करित असले तरीही त्याची पर्वा कोणालाच नाही. हेच यावरून दिसते
दिवाळीत रस्त्यांवर, गल्ल्यांमधून जेव्हा फटाक्यांचे जोरदार आवाज निघतात, तेव्हा त्यात आवाजापूर्वीचा कटू इतिहासही दडलेला असतो. आपण त्या कर्णकर्कश आणि जीवघेण्या आवाजालाच आपली संस्कृती बनविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे फटाके थांबत नाहीत, ध्वनीप्रदूषणही वाढते, अपघांतांमध्ये वाढ होते, त्यातून घडणारे मृत्यूही थांबत नाहीत. दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच राजस्थानातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन कोवळ्या 8 जीवांसह 30 जण ठार झाले. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील डीग या गावी घडलेली स्फोटाची ही घटना खूपच भयानक आणि भयावह होती. स्फोटाने संपूर्ण इमारतच जमीनदोस्त झाली. जेथे स्फोट झाला त्या गावात एक-दोन नव्हे तर तब्बल 13 फटाक्यांचे कारखाने असून ते सर्वच्या सर्व बेकायदेशीर आहेत. वर्षानुवर्षे चालणारे हे अवैध कारखाने माहित असूनही भ्रष्टाचाराचा रोग लागून आंधळा, मुका, बहिरा झालेला कायदा तेथपर्यंत पोहचू शकला नाही, हे आपले दुर्दैव. यापूर्वी सुद्धा बिहारमध्ये 32 आंध्रात 11, तामिळनाडूत 30, ओरिसात 7 व केरळात 5 बालमजुरांचे बळी फटाक्यांच्या कारखान्यांनी घेतले आहेत. त्यामुळे बालमजुरी संपवण्यात आपल्याला यश आलेले नाही हे जसे खरे आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जेथे जेथे स्फोट झाले तेथे तेथे कायदा फितूर झाला होता किंवा कारखानदारांनी तो धाब्यावर तरी बसवला होता. तसेच आधुनिक काळातही कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. हेही तितकेच खरे असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचबरोबर या दिपावलीच्या कालावधीत या फटाक्यांमुळे देशभरात कोट्यवधी रुपयांची हानी तर होतेच शिवाय लाखो मुले होरपळून, हजारो मुले मृत्यूमुखी पडत असल्याने हीच का आमची संस्कृती असा प्रश्न पडतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बाल कल्याण आणि सुरक्षा विभागाने दिवाळीच्या तोंडावर दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की 15 वर्षांखालील मुलांचे अपघातीतील प्रमाण 70 टक्के आहे फटाक्यांमुळे दरवर्षी दीपावलीत दीड लाख मुले भाजतात, 7000 मुलांचा मृत्यू होतो, जवळजवळ 13 हजार मुले आंधळी होतात. 38 हजार मुले अपंग होतात. त्यामुळे हा अहवाल निश्चितच धक्कादायक आणि धोकादायक आहे. मुले फटाके उडवीत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची असते.
परंतु मुले पालकांना न जुमानता, पालकांची नजर चुकवून फटाके उडवतात आणि अशाप्रकारे भीषण अपघातांमधून बळी पडतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवले नाहीत तर ती दिवाळी कसली असा प्रश्न काहीजण करतात. या फटाक्याच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे, अतिधूरामुळे मानवाप्रमाणेच पशुपक्षांनाही प्रचंड त्रास होतो. मंदीचा तडाखा बसलेला असूनही परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीत मात्र करोडो रूपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे जागतिक मंदी आली असली, व्यापारी हवालदील झाले असले, महागाईने सर्वांना त्रासले असले तरी आणि राज्यातील शेतकरी आत्महत्या करित असले तरीही त्याची पर्वा कोणालाच नाही. हेच यावरून दिसते. दिवाळीतच नव्हे तर आता कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी हजारो रुपयांचे फटाके उडवले जातात. दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च केवळ "आवाज' करण्यावर खर्च होतो. पण हाच वाया घालवलेला पैसा अन्य समाजोपयोगी कार्यासाठी वापरला गेला तर, समाजाचे किती कल्याण होईल? बेकार गिरणी कामगार, कर्जबाजारी शेतकरी, गरीब मुले, औषधालाही पैसे नसणारे व्यक्ती, पुलाखाली, रस्त्यावर रहाणारी रस्त्यांमध्ये कोणी तरी मदत करील या आशेवर आशाळभूतपणे पाहणारी दूर्दैवी बालके यांना मदत कोण करणार? सर्वांना आपल्या आनंदात सामावून घ्या. बघा तुमचा आनंद कसा द्वीगुणित होतो. याची जाणीव जेव्हा होईल, तीच खरी दिवाळी तोच खरा सुदिन!
दिवाळी मना-मनाची असते. ती साजरी करताना समाजातील उपेक्षितांचा भाग्यदीप आपल्याकडून उजळला गेला पाहिजे.

Sunday, October 19, 2008

"कोजागिरी' कि "मजागिरी'

आज कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, वाल्मिकी पौर्णिमा अशी नावे आहेत. कोजागिरी किंवा कोजागिरी हे या पौर्णिमेचे सर्वज्ञात नाव. "को+जाग+री म्हणजे कोण जागे आहे.' या रात्री घर, मंदिर, उद्यान, रस्ते वगैरे ठिकाणी दिवे लावतात. लक्ष्मी व इंद्र देवाची चंद्राच्या साक्षीने पूजा करायची. नारळ फोडून पाणी व पोहे देवांना समर्पण करायचे आणि चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा. त्यासाठी रात्री जागरण करायचे. जागायचे त्यासाठी मग रात्रभर जागत असताना भजन, गाणी, भक्ती गीते म्हणायची, खेळायचे, आनंदाने नाचायचे. मग रात्री लक्ष्मी आपल्यावर कोण जागे आहे हे पाहून जो जागृत असेल त्यावर प्रसन्न होऊन त्यांना भरपूर अशीर्वाद, पैसा, संपत्ती देण्याचे वरदान देते अशी रूढ परंपरा आहे, असे हे मूळे कोजागरीव्रत.
कोजागिरी हा खरे पाहता कृषिकर्त्यांचा आनंदोत्सव आश्विनात पावसाळा संपलेला असतो. सर्वत्र वातावरण अगदी प्रसन्न असते. शेतातील पिके डौलाने फडफडत असतात. वेली फुलांनी बहरलेल्या. परसात, अंगणात दुधी, भोपळे, भेंडी, काकडी, चवळी, पेरू असा फळभार आलेला असतो. कारळी, शिराळी, पडवळ, घोसाळी यांनी मांडव सजलेले असतात. भातखाचरात हळव्या भाताचे पीक तयार झालेले. घरोघरी कसे संपन्न, भरलेले वातावरण असते. त्यातच नवान्न पौर्णिमा आल्याने प्रत्येक घराघरात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी नव्या अन्नाची म्हणजे तांदळाची खिर बनविण्यात येते. देवीला प्रसाद दाखवून सर्वांना वाटण्यात येते. शेतात पिकलेल्या नव्या दाण्यांची खीर करून लक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच नवा दाणा खायला शेतकरी सुरुवात करतो. तत्पूर्वी तो नव्या दाण्याला अन्न म्हणून शिवप्रही नाही. ही सगळी मनोभावे, श्रद्धेपोटी केलेली पूजा आणि रात्रीचा आंनदोत्सव म्हणजेच "कोजागिरी पौर्णिमा' होय. शेतात धान्य पिकले आहे. तेव्हा कृषिराजा जागा रहा... सावध हो, जागते रहो, जागेल तोच मिळवेल, जो जागतो, जो कष्टतो, तोच धनधान्याचा मालक होतो असा संदेश देणारी ही कोजागिरी पौर्णिमा आहे.
पण आजच्या काळात कृषिपूजन हरवले जात आहे. मूळ व्रते, पूजा म्हणजे काय, त्याचा आज कोणालाच पत्ता नाही. मग त्यातूनच निर्माण होत आहे भ्रष्ट लोकाचार आणि त्यातूनच आज "कोजागिरी'ची झाली आहे "मजागिरी'. "कोजागिरी-नवान्न पौर्णिमा' म्हणजे काय हे शहरात अनुभवणे अशक्य. शहरांपासून फक्त दुधाची तहान ताकावर भागवली जाते. घरासमोर अंगणच नाही. आजूबाजूच्या मोठ-मोठ्या इमारतींमुळे चंद्र अनुभवता येत नाही. इमारतींमधून राहणारे मग टॅरेसचा आधार घेतात. कोजागिरी म्हणजे शहरी मुलांसाठी ऋेेश्र ोेप वरू! इमारतीच्या गच्चीवर सगळेजण जमणार, प्लास्टिकच्या पिशव्यांमधील दूध आणणार, गॅसवर गरम करणार, मसाला दूध करून लाऊड स्पिकर, डी.जे.च्या तालावर वेडे-वाकडे नाचत ते दूध पिणार.... यांची "मजागिरी' पौर्णिमा साजरी झाली. हे तर काहीच नाही. हल्ली नवीन फॅड तरुणाईच्या डोक्यात शिरला आहे. कित्येकजण चौपाटीवर जाऊन मजा करतात. काहीजण घराघरातून बळजबरीने वर्गणी काढून वडे, समोसे आणतात, पाव-भाजी खातात. त्याच्याही पलीकडे जाऊन नशापाणीसुद्धा करण्यात आजची तरुण मंडळी धन्यता मानताना दिसते. रात्रच जागवायची आहे ना... मग दारु प्यायची आणि डी.जे.च्या तालावर रात्र बेधुंद करायची. फक्त खाणे, पिणे, ऐश करणे हीच का आपली संस्कृती?
मुंबईतील युवा पिढी तर अशाप्रकारच्या संधीची वाटच पहात असतात. फे्रन्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे, पिंक डे, जिन्स डे, गटारी, थर्टी फर्स्ट, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव. आणि आता कोजागिरी पौर्णिमासुद्धा या सणांचा आस्वाद घेण्याऐवजी युवा पिढी शरीरसुखात डुंबण्यातच धन्यता मानताना दिसते. हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तरुण-तरुणींना पबमध्ये जाणे, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये रमणे, मित्र-मैत्रिणींचा सर्वप्रकाराने उपभोग घेण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही.
कोण होतास तू काय झालास तू,
अरे! वेड्या कसा वाया गेलास तू !!
अशी परिस्थिती आज सर्वत्र दिसत आहे. आधुनिकतेच्या नादात आम्ही डोळसपणा हरवून बसलो आहोत. आमची सारासार विवेकबुद्धी पुरती भ्रष्ट झाली आहे. भोग प्राप्तीला सर्वस्व मानून त्यांच्या प्राप्तीसाठी वाटेल ती कर्मे बिनदिक्कत आचरण्याचा कोडगेपणा आमच्यात आला आहे. सरकारतर्फे कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा प्रचार केला. परंतु मागे वळून पाहिले असता चित्र काय दिसते? कुणाचे कल्याण झाले? कुटुंबाचे, समाजाचे की देशाचे? दुर्दैवाने या कुटुंबांचे कल्याण केले, ना समाजाचे, ना देशाचे! परंतु तरुण मंडळींनी याचा चांगलाच गैरफायदा उचलला. लैंगिक संबंध कितीही जणांशी ठेवले तर काय बिघडते? ते सुरक्षित असले म्हणजे झाले! अशा प्रकारचे भयानक, भयावह मत महाविद्यालयातील युवापिढी व्यक्त करीत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्रोत्सवात कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. त्याचबरोबर यादरम्यान कंडोम, आय पिल या गोळ्यांची विक्रीसुद्धा लाखो रुपयांची झाली. नवरात्रोत्सवानंतर पुढील दोन-तीन महिन्यात दरवर्षी गर्भपाताचे प्रमाण वाढलेले दिसायचे ते मात्र यावर्षी दिसणार नाही. लोकसंख्या दरवाढ रोखण्यासाठी सरकारतर्फे प्रचार यंत्रणेवर लाखो रुपये खर्च केले जातात. विवाहित जोडप्यांवर ज्यांचा काहीच परिणाम होत नसला प्रेमी युगुलांनी मात्र त्याचा पुरेपूर लाभ घेतला आहे. कंडोम आणि आयपिल गोळ्यांमुळे अनैतिक संबंधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळेच रेव्ह पार्ट्यांसारखी कृत्ये सहजपणे घडत आहेत. अफेअर्स असण्यातच अनेकांना भूषण वाटते आहे. हे लोण आता शहरांमधून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचले आहे. लैंगिक विकृती पशुत्त्वाच्या स्तराला चालली असल्याचीही उदाहरणे घडून येत आहेत. खिळखिळ्या झालेल्या सर्व संस्कार यंत्रणाच भक्कम करणे हाच त्यावरील उपाय असू शकतो. प्रत्येक कुटुंबातील वरिष्ठांनी दक्ष राहून लक्ष दिले पाहिजे. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत. अन्यथा सगळीकडे स्वैराचार माजेल आणि माणसे व जनावरे यांच्यातील भेदच संपुष्टात येईल, त्याला जबाबदार कोण?

सुखासाठी गुलामी धोकादायक

कामगारांचे, शेतकऱ्यांचे शोषण असो, मरण असो किंवा पिळवणूक असो किंवा इतर कोणताही अन्याय असो. जो जळतो तोच कण्हतो. इतर सर्वजण मात्र आपण त्या गावचेच नाही अशा थाटात वावरत असतात, ही वस्तूस्थिती दुर्दैवी असली तरी सत्य आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळेच वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून बातम्या, लेख प्रसिद्ध झाले तरी अप्रत्यक्षरित्या परिणाम भोगणारा सामान्य वाचक मात्र अविचल आहे. जो काही थोडा स्वागत-निषेधाचा स्वर उमटत आहे तो केवळ वृत्तपत्रांच्या पांढऱ्या पानंाना काळे करण्यापुरताच म्हणता येईल.
सध्या जो-तो विरोधाच्या गोष्टी करताना दिसत आहे. अमेरिकेची विषारी "डाऊ' कंपनी संतभूमीतून हाकलण्यासाठी जोरदार वाद सुरू आहे. "डाऊ' ही कंपनी संतभूमीतूनच नव्हे तर या राज्यातून हद्दपार व्हायला हवी, यामध्ये काही वादच नाही. अशाप्रकारे विषाची चव घेण्याची गरजच काय? 1984 साली भोपाळमधील कारखान्यात झालेल्या विषगळतीने 25 हजार लोक मरण पावले हे उदाहरण समोर असताना "डाऊ' ला झालेला विरोध रास्तच आहे. परंतु गेल्या दोन-चार महिन्यातील वृत्तपत्रे चाळली असता प्रत्येक प्रकल्पात काही ना काही कारणास्तव "खो' घातल्याचे दिसून येते. अशाने राज्याची प्रगती होणार कशी? रायगड जिल्ह्यात आलेल्या 12 सेझ प्रकल्पांमुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतीसाठी एक कोपराही उरलेला नसल्याचे लक्षात येते. मुकेश अंबानीच्या महामुंबई सेझ प्रकल्पाविरोधात 22 गावातील शेतकऱ्यांनी मतदान केल्यावर आता अनिल अंबानींच्या औष्णिक वीज प्रकल्पाविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याचबरोबर 9 गाव संघर्ष समिती, 24 गाव सेझविरोधी संघर्ष समिती, आदिवासी हक्क संघर्ष समिती, टाटा सेझविरोधी संघर्ष समिती, अशा प्रकारच्या अनेक संघटना व संतभूमीतील वारकरी 10 ऑक्टोबरला मंत्रालयावर मुख्यमंत्र्यांविरोधात धडक देणार आहेत. इकडे मुंबईत मेट्रो रेल्वेचे यार्ड हटाव अभियान राबविले जात आहे. त्यासाठी जोरदार विरोध दर्शविला जात आहे. आश्चर्य म्हणजे या मेट्रो यार्डला सर्वपक्षियांनी विरोध केला असून त्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीसुद्धा सहभागी झाले आहेत. त्याला कारण ही तसेच ठरले आहे. ज्याप्रमाणे अनिल अंबानी यांनी वीज प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यापूर्वी कमीत कमी विस्थापितांचा पर्याय प्राधिकरणाला सादर करायला पाहिजे होता. तो पर्यायच सादर न करता सक्तीने जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली. म्हणूनच तेथील शेतकरी रस्त्यावर उतरले. असाच प्रकार मुंबईत सुरू आहे. एमएमआरडीएच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी पूर्वपाहणी न करताच चारकोप ऐवजी कांदिवली, मालवणी भागात मीटचौकीजवळ स्वघोषित चारकोप स्थानक आणि बाजूच्या 15 हजार झोपडीधारकांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवून यार्ड (कारशेड) बांधण्याचे मनसूबे रचले आहेत. त्यांना पर्यायी जागा कशी देणार? कोठे देणार? एकूण किती झोपड्या विस्थापित होणार आहेत? याची काहीच माहिती एमएमआरडीएकडे नाही. त्यामुळे याच परिसरात दोन ठिकाणी मोकळे भूखंड असतानाही मुद्दामहून याच झोपड्यांवर बुलडोजर चढवण्याची कल्पना कोणाची? असा प्रश्न पडतो. अशा प्रशासकीय चुकांचे खापर अखेर मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर फोडले जाते, याला जबाबदार कोण? प्रशासनाच्या चुकांमुळे सर्वसामान्यांचे सुख हिरावून घेतले जात आहे. त्या प्रशासनात बदल कसा आणि कोण करणार? कामगारांचे, शेतकऱ्यांचे शोषण असो, मरण असो किंवा पिळवणूक असो किंवा इतर कोणताही अन्याय असो. जो जळतो तोच कण्हतो. इतर सर्वजण मात्र आपण त्या गावचेच नाही अशा थाटात वावरत असतात, ही वस्तूस्थिती दुर्दैवी असली तरी सत्य आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळेच वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून बातम्या, लेख प्रसिद्ध झाले तरी अप्रत्यक्षरित्या परिणाम भोगणारा सामान्य वाचक मात्र अविचल आहे. जो काही थोडा स्वागत-निषेधाचा स्वर उमटत आहे तो केवळ वृत्तपत्रांच्या पांढऱ्या पानांना काळे करण्यापुरताच म्हणता येईल.
आज आपल्या राज्याची काय परिस्थिती आहे? प्रशासकीय कामकाज कसे चालले आहे? जनतेला कसे वेठीस धरले जाते? आणि नेतेमंडळी कशी वागतात? हे कधीच न सुटणारे प्रश्न आहेत. समजा एखाद्याने उद्योगधंदा सुरु करायचे ठरवले तर अधिक पैसा कमवायचा आणि सुखाने जगायचे हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्याकडील जमा, अधिक बॅंकेचे कर्ज काढून उद्योगधंदा सुरू करायचा. धंदा सुरू करण्याचे ठरवल्यापासून त्याची झोप उडून जाते. आपल्या भागातील झाडून सगळ्या बॅंकांची ना हरकत प्रमाणपत्र, निरनिराळ्या सरकारी खात्यांचे परवाने, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, बाजारपेठ मिळविण्यासाठी शोधाशोध, अशा अनेक कटकटींना सामोरे जावे लागते. एवढे सगळे अडथळे पार केल्यानंतर उद्योग भरभराटीला येतो न येतो तोच वेगळ्या समस्या उभ्या राहतात. कामगार मिळत नाहीत, आहेत ते संघटीत होतात, कामगारांची संघटना तयार होते, कामगारांच्या प्रमाणाबाहेर मागण्या वाढतात, मग संप, निदर्शने, उपोषणे, आंदोलने, कोर्ट-कचेरी सुरू होतात. त्यातच मग सरकारी अधिकारी विविध कायद्यांवर बोट ठेवून मालकाकडून "चिरीमिरी' घेऊन अक्षरश: लूटतात. मोठ्या उत्साहाने उद्योगधंद्यात उतरलेला तो उद्योजक अखेर "झक मारली आणि उद्योग उघडला' या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचतो. तात्पर्य काय तर भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेमुळे उद्योजक हा कधीच सुखी होऊ शकत नाही.
मुंबईतील चाकरमानी बघा. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे बघण्याचीदेखील त्यांच्याकडे फुरसत नाही. सकाळी पळत-पळत गाडी पकडायची आणि कामाला जायचे. संध्याकाळी दगदगीने थकल्या भागल्या जिवाने पुन्हा पळत पळत गाडीत घुसायचे. मुसंडी मारता आलीच तर जागा पकडायची. बस्स! कशासाठी? तर चार घास सुखाने खाण्यासाठी. आज आपल्या देशाची अवस्था अशी बिकट झाली आहे.
थोडक्यात म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर अजिबात काही करू नका. सगळं सरकारच्या भरवशावर सोडून द्या. तुमच्याजवळ थोडाफार पैसा असेल तर बॅंकेत ठेवा आणि व्याज खाऊन मजेत जगा. पुन्हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न उभा ठाकला तर इतरांना फुकाचे सल्ले देण्याचे काम करा. हे जर जमले तरच तुम्ही सुखाने जगू शकता, पण मेहरबानी करून कोणताही उद्योगधंदा करण्याच्या भानगडीत पडू नका. ज्या दिवशी हा विचार तुमच्या डोक्यात आला त्या दिवसापासून तुमचे सुखचैन संपले हे निश्चित समजा. अशा प्रकारचा अगतिकतेतून जन्माला आलेला हा विचारच आपल्या मानसिक गुलामगिरीला कारणीभूत ठरत आहे आणि "बंद डोळे, बंद कान, तरच मिळेल सुख समाधान' या वृत्तीने जगणाऱ्या सर्वसामान्य जनतेलाच यासाठी सर्वाधिक दोषी मानावे लागेल.