Monday, April 20, 2009

.... तर जोडे खाता-खाता भस्मसात व्हाल!

निवडणूका आल्या की, आश्वासनांची खैरात करायची आणि निवडून आल्यानंतर जनतेला सोयीस्करपणे विसरायचे हे आता नित्याचेच झाले आहे. पुन्हा निवडणूका आल्या की पुन्हा नवीन प्रलोभने, नवीन आश्वासनांची खैरात करायची. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही प्रत्येक पक्षाचे नेते प्रतिपक्षांवर आरोप. प्रत्यारोप करण्यात आणि विविध प्रलोभने दाखवून मतदारांना गंडवण्यात गुंतल्याचे दिसते. आचारसंहितेचा एकीकडे धसका घेतलेल्या राजकारण्यांनी याच "आचारसंहितेची ऐसी की तैसी' म्हणत पैशांचा बाजार खुलेआम मांडला आहे. प्रसिद्धीसाठी मिडीयाला पेट्या-खोके पोहचवले गेले. प्रिन्ट ऑर्डर 1 हजार, 10 हजार, 1 लाख अशी छापून प्रत्यक्षात मात्र मतदारांना दिली जाणारी माहिती पत्रकांच्या लाखो प्रती छापण्यात येत आहेत, प्रिन्टरशी साटेलोटे करून बिले बनवली जात आहेत. ही निवडणूक आयोगाची फसवणूक नव्हे काय? पण सगळेच चोर म्हटल्यावर यांना जाब विचारणार कोण?
एकीकडे निवडणूक आयोगाने ढोणीला आपला ब्रॅंड अँम्बेसेडर बनविण्याची घोषणा केली परंतु त्याच्याकडे व्होटींग कार्डच नव्हते. तो मतदान करण्याऐवजी आफ्रिकेत जाऊन मॅच खेळण्यात दंग आहे. दुसरीकडे जॉन अब्राहम "उंगली उठा बिंदास म्हणून सांगत असताना त्याची गर्लफ्रेंड बिपाशा मात्र आपण व्होट करणार नसल्याचे खुलेआम सांगते. यांना जाब बिचारण्याचे धाडस कोण करणार?'
देश आर्थिक मंदीने ग्रासलेला असला, देशातील शेतकरी आत्महत्या करीत असले, महागाई, बेकारी, इतर विविध समस्यांनी देशात आगडोंब उसळलेला असला तरी राज्यकर्त्यांना मात्र काहीच फरक पडलेला नाही. सर्वच प्रमुख उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उधळण वारेमाप सुरू आहे. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी फिल्मस्टार्सना मैदानात उतरवले आहे. या सर्वांमध्ये कहर केला आहे तो म्हणजे अभिनेता सलमान खान. कसलेही तारतम्य न ठेवता तो कोणत्याही उमेदवारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रोड शो करतो आहे. एकेकाळी ऐश्वर्यासाठी रस्त्यात मारामारी करणारा, दारूच्या नशेत तर्राऽऽट गाडी चालवून बळी घेणारा आणि प्राण्यांची शिकार करण्यातही "कु' प्रसिद्ध असलेला सलमान खान उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरतो आहे. सलमान खान यापूर्वी विनोद खन्ना आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या व्यासपीठावर गेला होता. राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल आणि समीर भुजबळ यांच्या प्रचारानंतर तो मिलिंद देवरा, प्रिया दत्त या कॉंग्रेस उमेदवारांच्या व्यासपीठावर गेल्याने मतदार बुचकळ्यात पडले. त्यामुळे संतप्त मतदारांपैकी काहिंनी प्रिया दत्तच्या प्रचारासाठी वांद्रे येथे आलेल्या सलमानच्या दिशेने चप्पल फेकून मारली. परंतु नंतर हे प्रकरण चलाखीने दडपण्यात आले.
सलमान खान शिवाय सास-बहु फेम स्मृती इराणी, हेमामालिनी या भाजपच्या प्रचारात सक्रीय आहेत. मागच्या निवडणुकीत बहिणीसाठी मतांचा जोगवा मागत फिरणारा मुन्नाभाई संजय दत्तने यावेळी समाजवादी पक्षाची धुरा सांभाळली आहे. मनसेकडून भरत जाधव मैदानात उतरलेला असताना पुण्याचे बसपा उमेदवार डी.एस. कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी अमेरिकेहून अभिनेत्री माधुरी दीक्षित येणार आहे. माधुरीसोबत उर्मिला मातोंडकरही त्यांच्या व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. याच उर्मिलाने काही दिवसांपूर्वीच विदर्भात कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे या स्टार प्रचारकांच्या सर्वपक्षसमभावाचे इंगित काय, हे लक्षात न येण्याइतके मतदार भोळेभाबडे नक्कीच नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून सलमानला जोडे खावे लागले. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर एका इराकी पत्रकाराने बूट फेकून मारून आपला रोष प्रकट केला होता. त्याचाच आदर्श आज भारतात सर्वत्र घेतला जात आहे. शिखांच्या कत्तलीस जबाबदार असणाऱ्या टायटलरच्या सुटकेचे समर्थन करणाऱ्या पी. चिदंबरम्‌ यांना जर्नेल सिंग या पत्रकाराने भर पत्रकार परिषदेत जोडे फेकून मारले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कुरुक्षेत्र येथील कॉंग्रेसचे खासदार व या निवडणुकीतील उमेदवार नवीन जिंदाल यांच्यावर राजपाल नावाच्या एका निवृत्त शिक्षकाने चप्पल हल्ला केला. या प्रकरणाला आठ दिवस होत नाही तोवर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनाही चप्पलचा प्रसाद मिळाला.
यामागचे कारण एकच दिसून येते. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आतापर्यंत त्यांच्या प्रतिमेला अथवा प्रतीकृतींना जोडे मारणारी, जनता आता प्रत्यक्ष त्यांच्यावरच जोडे फेकून मारू लागली आहे. राज्यकर्त्यांनी जनतेच्या समस्यांकडे अशाचप्रकारे दुर्लक्ष केल्यास जोड्याने हाणता हाणता एक दिवस प्रतीकृती जाळतात तसे रॉकेल ओतून एखाद्या नेत्याला जिवंत जाळले तर आश्चर्य वाटायला नको.