Friday, July 2, 2010

पालक नव्हे, मित्र बना..!

मुलं डोळ्यांदेखत केव्हा मोठी होतात, हे पालकांना कळतच नाही. बोट धरून नाजूक पाऊल पुढे टाकून चालणं शिकणारी मुले पालकांची उंची गाठतात आणि त्यांची म्हातारपणाची काठी होत असतात. मुलांना "मोठ्ठ' करण्यासाठी पालक विविध भूमिकांमधून झिजत असतात. वयाचे टप्पे ओलांडणाऱ्या मुलांशी सुसंंवाद साधताना पालकांना कसरत करावी लागत असते. पालक नव्हे तर मित्र म्हणून त्यांना वयात आलेल्या मुलांशी सुसंवाद साधावा लागत असतो.
परंतु, काही कुटुंबातील पालक मुलांशी सुसंवाद साधण्यात अपयशी ठरत असतात. "मित्र' म्हणून भूमिका त्यांना वठवता येत नाही. आपली मुले कितीही मोठी झाली तरी ती लहानच आहे, असे त्यांना वाटते. "गप्प बस, तुला काय कळतं त्यातलं', असे म्हणून कळत्या वयात मुलांना सारखं ऐकवत असतात.
मुलांनी धोक्याचं वय ओलांडलं, अर्थात वयाची 16 वर्ष पूर्ण केल्यानंतर पालकांनी "पालक' म्हणून नव्हे तर एक "मित्र' म्हणून मुलांशी सुसंवाद साधणं आवश्यक झाले आहे. किशोरावस्थेत पदार्पण करणारी मुले लहरी असतात. या स्थितीत त्यांच्या इच्छेनुसार घ्यावं लागतं. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाल्यास ते हिरमुसतात. वेळ प्रसंगी केव्हा काय करतील याचा भरवसा नसतो. अलिकडच्या काळात मानसोपचारतज्ज्ञंाकडे येणाऱ्या पालकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पालकांविषयी नव्हे तर पाल्यांच्याच समस्या अधिक आहेत. तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलांमुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत.
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या मुलांमध्ये अमुलाग्र बदल होत असतात. त्याच्यात असे काही बदल होतात की, त्याने त्यांचे पालक थक्क होत असतात. मुलांना बालपणी न आवडणाऱ्या गोष्टी त्यांना किशोरावस्थेत आवडत असतात. मुले- मुलींशी तर मुली- मुलांशी मैत्री करतात. मुले अधिक वेळ घराबाहेर घालवतात. पालकांच्या सांगण्याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते. पालकांनी मुलीला "तो मुलगा कोण?', या विचारलेल्या प्रश्नाला... "तो माझा चांगला मित्र आहे आणि बाकी काही नाही.' असे साचेबद्ध ठरलेलं उत्तर मुली देत असतात.
या स्थितीत पालकांनी आणखी काही सुनावले म्हणजे ती आणखी बिथरते. कॉलेजमधून घरी यायला मुद्दाम उशीर...चौकशीअंती समजतं, ते प्रेमप्रकरण..! तर, मुलांच्या बाबतीतही "सेम टू सेम' अस्संच! परंतु थोडं वेगळं.., म्हणजे लपून सिगारेटी? फुंकणं... अभ्यासाच्या वेळी मित्रासोबत रिकामं भटकणं... वैगेरे वैगेरे. अशा परिस्थितीत काय करावं? त्यांच्याशी कसं सांगावं? असे यक्ष प्रश्न पालकांसमोर उभे ठाकतात. आपल्याच मुलांना समजावण्यासाठी पालक "समन्वयक' शोधतात. काही वेळेस तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच मानसोपचारतज्ज्ञांचा आश्रय घ्यावा लागत असतो. तेव्हा त्यांना आपल्याच मुलांना समजून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा फिज पेड करावी लागत असते. याला आपण काय म्हणावे?
"कारट्याने वा कारटीने समाजात आमचे नाक कापले', असे पालक "नाक' सलामत असतानाही म्हणत असतात. परंतु आपली मुले कोणत्या मानसिकतेतून जात आहेत. याचा विचार करणारे पालक फार कमी आहेत.
आपल्याविषयी मुलांमध्ये विश्र्वास निर्माण केला पाहिजे. तेव्हा मुले पालकांशी बिनधास्त संवाद साधतात. मनातील विचार कळवितात. नाहीतर याकाळात मुले आपल्या पालकांपेक्षा आपल्या मित्रांकडे भावना व्यक्त करत असतात. मुलांचा विश्र्वास संपादन करून "तुला अमुकच व्हावं लागेल' असे म्हणण्या पेक्षा "तुला काय व्हायचं आहे?' असे विचारून त्याच्या मनातील इच्छा जाणून घ्यावी.
त्याच्या करियरच्या बाबतीत पालकांनी कोणतीही तडजोड करू नये. राहिला त्यांचा प्रेमात पडण्याचा प्रश्न. तर वयात येण्याइतकीच प्रेमात पडणं, ही नैसर्गिक गोष्ट आहे. हे आधी समजून घ्यावं. त्याचं प्रेम किती खोलवर रूजलेलं आहे, हे आधी ओळखले पाहिजे. आपल्या पाल्यांवरील विश्र्वास कधीही कमी होऊ देऊ नका. त्यांच्यातील नातं खरोखरीच मित्रत्वाचं आहे का याचाही अंदाज आधी घेतला पाहिजे.
परंतु पालक येथेच चुकतात. खरी परिस्थिती जाणून न घेता. मुलांना चारचौघात सुनावत असतात. त्याचे अनिष्ठ परिणाम मुलांच्या मानसिक विचारसरणीवर होतात. त्यामुळे भविष्यात मोठी किंमत मोजाण्याआधीच आपल्या पाल्याशी पालकांनी मित्रत्त्वाचे संबंध जोपासणे गरजेचे आहे.

No comments: