Tuesday, December 2, 2008

करकरे, कामटे, साळसकर हत्येमागचे गौडबंगाल काय?

प्रशिक्षित अतिरेकी पाकिस्तानातून आले. या हल्ल्याच्या कटाचे सूत्रधार अन्य देशात असावेत असा संशय आहे. ईमेल रशियामधून आले. तर पाकिस्तानच्या किनाऱ्यावरून गुजरातेत पोहोचलेलेे अतिरेकी मच्छिमारांच्या बोटीद्वारे मुंबईच्या कफ परेडच्या किनाऱ्यावर उतरले, असा निष्कर्ष काढला जात असताना हे अतिरेकी कित्येक महिन्यांपासून ताज आणि ओबेरॉय हॉटेलात काम करीत होते असेही म्हटले जाते. मात्र एवढे सगळे घडूनही या कानाचे त्या कानाला कळले नाही. विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय कटाचा भारतच नव्हे तर इतर कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला सुगावा लागला नाही. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने आकस्मिक घडलेल्या या अतिरेक्यांच्या हल्ल्याने मुंबई पोलिसांची त्रेधातिरपिट उडाली. त्यामध्ये तब्बल 14 पोलीस आणि 2 कमांडोंचा बळी मात्र गेला. त्यातच एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर हे डॅशिंग अधिकारी शहीद झाले की त्यांचा बळी घेतला गेला, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
अतिरेक्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन किती पद्धतशीर अभ्यासपूर्ण केलेले होते हे पकडलेल्या अतिरेक्याच्या माहितीतून समोर येत आहे. परंतु बुधवारपासून घडलेल्या घटना आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची भूमिका, गृहमंत्र्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी मिडीयाला दिलेल्या प्रतिक्रिया, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती आणि संपूर्ण हल्ल्याची माहिती अभ्यासपूर्ण पद्धतीने तपासल्यास राजकारणी, पोलीस आणि मिडीया हे सर्वजण उलटसुलट बोलून काहीतरी लपवाछपवी चालल्याचे दिसून येते. देशाच्या इतिहासात इतका भीषण अतिरेकी हल्ला झालेल्याची नोंद नाही. बुधवारी रात्री अतिरेकी अचानक येतात काय, सीएसटी रेल्वे स्थानकासह अनेक ठिकाणी असंख्य निरपराध नागरिकांची हत्या करतात काय, ताज, ओबेरॉय हॉटेलात आणि नरीमन भवनमध्ये नागरिकांना 48 ते 58 तास ओलीस ठेवून सतत 3 दिवस-रात्र हा:हा:कार माजवतात काय, त्यानंतर मिडीयाकडून अतिरेक्यांचा आकडा वाढवला जातो काय, गृहमंत्रीसुद्धा त्यामध्ये भरीस भर घालतात काय, आणि या सगळ्या गडबडीत विले-पार्ले येथील बॉम्बस्फोटाचे प्रकरण दाबले जाते काय, त्यातच पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांची हत्या होते काय! सगळेच कसे महाभयंकर! हे अतिरेकी नक्की कोण आहेत हे
उघड होण्यापूर्वीच आपल्या मनाला वाटेल तसे विविध संघटनांची नावे काही चॅनेल्स्‌नी जाहीर केली. त्यातूनच "डेक्कन मुजाहिद्दीन' हे नाव पुढे आले. काही प्रसार माध्यमांनी अतिरेकी कामा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी मराठीत बोलल्याचे सांगितले. काही चॅनलवाले आणि वृत्तपत्रांनी कामा रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर कामटे यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याचे सांगितले. तसेच कामा रुग्णालयाच्या पुढच्या वळणावरील "कार्पोरेशन एटीएम'जवळ साळसकरांना येथेच अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याचे सांगितले. तर काही वृत्तपत्रांमधून करकरे, कामटे, आणि साळसकर यांनी पायधुनी पोलीस ठाण्याच्या एसीपीच्या क्वालिस गाडीतून मधल्या सीटवर एकत्र बसून आणि मागच्या जागेत चार कॉन्स्टेबल बसलेले असताना रंगभवनच्या रस्त्याने पुढे जात असताना अतिरेक्यांनी एके-56 मधून या गाडीवर तुफान फायरिंग सुरू केली. यामध्ये गाडीतले सर्वजण जागीच ठार झाले. त्यानंतर करकरे, कामठे, साळसकर आणि ड्रायव्हरचा मृतदेह रस्त्यावरच टाकून या अतिरेक्यांनी क्वालिसमधून पळ काढल्याचे आणि पुढील घटना घडल्याचे सविस्तर सांगितले आहे.
दरम्यान या प्रमुख तीन पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह रस्त्यावर तासभर पडून होते. दुसऱ्या दिवशी पंचनामा केला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या बुलेट्‌स आणि इतर ठिकाणी अतिरेक्यांनी वापरलेल्या बुलेट्‌स यामध्ये फरक असल्याचेही चॅनेलवाल्यांनी सांगितले. त्याचबरोबर शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा सीएसटी स्थानकाबाहेर गोळीबार झाल्याची अगदी रक्तरंजित छायाचित्रे एनडीटीव्हीसह बऱ्याच चॅनल्स्‌नी प्रसारीत करून जोरदार अफवा पसरवली. त्यामुळे नेमके सत्य काय, असा प्रश्न पडतो.
एटीएसचे हेमंत करकरे यांनी अतिरेक्यांचे आडाखेच बदलून टाकले होते. साध्वी प्रज्ञा ठाकूर, प्रसाद पुरोहित व दयानंद पांडे यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात करकरेंनी अटक केल्याने हिंदुत्त्ववादी संघटनांनी प्रखर विरोध दर्शविला होता. करकरेंच्या कुटुंबियांनाही या टीकाकारांनी सोडले नव्हते. नागपूरच्या एका वर्तमानपत्रात त्यांच्या 16 वर्षाच्या मुलावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने करकरे अत्यंत व्यधित झाले होते. गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे त्यांनी नाराजीही बोलून दाखविली होती. लालकृष्ण अडवाणींच्या टिकेनेही करकरेंना जबरदस्त धक्का बसला होता. याप्रकरणी शहीद होण्याच्या एक दिवसापूर्वी माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्याशी भेट घेऊन या विषयावर त्यांच्यामध्ये चर्चाही झाली होती. प्रचंड तणाव आणि दबावाखाली ते काम करीत होते. परंतु आता हे सर्व साध्वी प्रकरण गुलदस्त्यातच राहणार आहे. करकरेंच्या कुटुंबियांना नरेंद्र मोदींनी देऊ केलेली आर्थिक मदत नाकारल्याचा ज्या काही बातम्या आल्या त्या मागे सुद्धा कदाचित हीच पार्श्वभूमी असावी. गुन्हेगारांचे कर्दनकाळ आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांचा संपूर्ण मुंबई पोलिसांना अभिमान वाटत असला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मात्र नाराजीच होती. प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयामध्ये साळसकरांच्या सल्ल्याशिवाय मुंबई पोलिसांचे पानही हलत नसे. कामटेसुद्धा असेच डॅरींग व कशाचीही पर्वा न करता निर्णय घेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात ते खूपत होते. परंतु कोणी उघड-उघड बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे करकरे, साळसकर, कामटे हे तिघे एकाच गाडीत का व कशामुळे बसले? या तिघांच्याही गाड्या त्यावेळी कोठे होत्या? तिघांच्याही गाड्या असताना या क्वालिसमध्ये बसण्याचे कारण काय? असा संशयही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात आहे. हेमंत करकरे हे एका खूप मोठ्या गुपिताची उकल करण्यापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे संपूर्ण भारतात खूप मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता होती. त्याचे परिणाम जगभरात जाणवले असते, असेही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ते वादळ जाणीवपूर्वक शांत केले की अति धाडासाने त्यांचा बळी घेतला, हे आता कधीच कळणार नाही. कारण याची कोणी आता चौकशीच करणार नाही. आणि अशा गोष्टी गुलदस्त्यातच ठेवण्याची भारताची परंपरा आहे आणि हेच अंतीम कटू सत्य आहे.
शहीद झालेले 14 पोलीस अधिकारी मराठी आहेत. जखमींमध्येही मराठीच आहेत. परंतु सगळ्यांवरच सामूहिक जबाबदारी असताना बाकीचे प्रामुख्याने अमराठी अधिकारी (के.पी. रघूवंशी वगळता) बाकीचे अधिकारी त्यावेळी कुठे गायब झाले होते? मुंबईचे पोलीस आयुक्त कुठे होते? अतिरेक्यांना फुले देण्याची आणि मुंबई ही कुणाच्या बापाची नाही, असे मराठी माणसांना ठणकाहून सांगणारे के.एल. प्रसाद कोठे लपून बसले होते? कायदा व सुव्यवस्था कोलमडलेली असताना या विभागाचे प्रमुख के.एल. प्रसाद कोठे होते? या सर्व अमराठी अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर करकरे, कामटे, साळसकर व पोलिसांच्या हत्ये प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण केंद्र व राज्य सरकारने शहिदांच्या मृतदेहांवर लाखो रुपये ठेवले, कुटुंबियांना घरे दिली, नोकरी दिली तरी त्यांचा अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेला आणि ते शहीद झाले यावर मात्र कोणीही भरवसा ठेवणार नाही.

No comments: