Monday, December 22, 2008

"अति तेथे माती', या नगरसेवकांची कोठे जाते मती?

काही दिवसांपूर्वी गुदरलेल्या भीषण अतिरेकी हल्ल्याच्या प्रसंगातून मुंबईकर हळुहळु सावरत असतानाच, त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी आधार देण्याऐवजी, मुंबईत सर्वत्र शहिदांना श्रद्धांजलीचे कार्यक्रम सुरू असताना मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी या मुंबईतील नगरसेवक परदेशप्रवासाची स्वप्ने पहात आहेत. त्यामुळे मुंबईच्या नगरसेवकांनी परदेश दौऱ्याचा जो घाट घातला आहे, तो नक्कीच निषेधार्ह म्हणायला हवा. मुंबईकरांना सावरण्याऐवजी, शहिदांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:साठी चंगळ करण्यासाठी माजलेल्या नगरसेवकांनी परदेश प्रवासाचा घाट घालणे कदापिही योग्य नाही. जगभरातून भारतासाठी आणि विशेषत: मुंबईकरांसाठी संवेदना जागल्या. परंतु या मुंबईतील नगरसेवकांना मात्र परदेश दौऱ्याचे वेध लागले आहेत. कशासाठी? तर म्हणे, उद्याने पाहण्यासाठी!
भारतीय पुराणातील भस्मासुराने भगवान शंकराकडे वर मागितला होता की, तो ज्या वस्तूवर हात ठेवील ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळ्या सांबाने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकले. आता आपले कोणी काय वाकडे करू शकतो, या विचाराने माजलेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्या मागे लागला. अखेरीस भगवान विष्णूला हस्तक्षेप करून एका सुंदर ललनेच्या रूपात जावे लागले. त्यानंतर भस्मासुराला मोहात पाडून नाचता-नाचता डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडून भस्मसात करावे लागले. अशी एक कथा आहे.
तर आणखी एका कथेत एका व्यक्तीवर राजा खुश झाला आणि त्याने त्याला सांगितले की, तू संध्याकाळपर्यंत जेथपर्यंत धावत जाऊन परत येशील तेथपर्यंतची जमीन तुझ्या मालकीची! जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याच्या ईर्षेने तो ऊर फाटेपर्यंत धावला आणि शेवटी मेला. तर अशाच एका युरोपियन लोककथेतील राजाने ज्या वस्तूला हात लावेल त्या वस्तूचे सोने होऊ दे, असा वर देवाकडून मिळवला. शेवटी अनेक वस्तूंचे सोन्यात रुपांतर केल्यानंतर तो जेवायला बसला तर घासही सोन्याचा होऊ लागला. शेवटी उपाशी रहाण्याची पाळी त्याच्यावर आली. या सर्व कथांमधून एकच संदेश मिळतो की कोणत्याही गोष्टीचे अति केले की नाश होतो. सांगायचे तात्पर्य हेच की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याची अखेर ही सर्वनाशातच होते.
भस्मासूर त्याला वर देणाऱ्या शंकराला मारण्यासाठी निघाला. त्याऐवजी तो संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करू शकला असता. पण अति हाव भारी पडला. शंकराची पत्नी पार्वतीवरच वाईट नजर टाकली आणि स्वत: भस्मसात झाला. राजा प्रसन्न झालेल्या व्यक्तीनेही अति लालसा धरली नसती तर पुढच्या किती तरी पिढ्यांनाही पुरेल इतकी जमीन संपादन करू शकला असता. त्याचबरोबर युरोपियन कथेतील राजानेही अती लालच केली आणि माणूस ज्याच्यासाठी आयुष्यभर झटतो त्या भोजनासही तो मुकला. अशा तऱ्हेने "अति तेथे माती' ही सर्व प्रचलित म्हण खऱ्या अर्थाने खरी ठरते. पूर्वी पोलीस म्हटले की, त्यांचा केवढा दरारा असायचा, काय धाक असायचा! आणि आज? भ्रष्टाचार पूर्वीही होता, नाही असे नाही, पण व्यवहार अगदी लपून-छपून चालत. आज तर खुलेआम पोलीस उघडउघड पैसे घेताना, नोटा मोजताना दिसतात. मग कोण, कशाला घाबरेल त्यांना? जे पोलिसांचे तेच शिक्षकांचे! पूर्वीच्या गुरुंचा "छडी लागे छम्‌छम्‌, विद्या येई घम्‌घम्‌' या तत्त्वावर ठाम विश्वास होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शिक्षकांचा धाक वाटत असे. कालांतराने यामध्ये बदल झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मित्रत्त्वाची वागणूक द्यावी, या तत्त्वाचा एवढा अतिरेक झाला की काही प्राध्यापक, आजकाल विद्यार्थ्यांसोबत धुम्रपान, मद्यपान करताना दिसतात. त्यामुळे शिक्षकांचा धाक केव्हाच संपला आणि आता आदरही संपला! पूर्वी आमदार-खासदार-नगरसेवक-सरपंच म्हटले की काय भाव असायचा त्या व्यक्तीचा! आता तर मंत्रीसुद्धा एवढे झालेत की त्यांना बघायला कोणीही थांबत नाही. थोडक्यात काय तर या जबाबदार पदांवरील व्यक्तींनी अति करून त्या पदांचीच गरिमा संपवली आहे आणि "अति तेथे माती' ही म्हण सार्थ ठरविण्यात आली आहे.
आता हेच बघ ना...! काही दिवसांपूर्वी गुदरलेल्या भीषण अतिरेकी हल्ल्याच्या प्रसंगातून मुंबईकर हळुहळु सावरत असतानाच, त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी आधार देण्याऐवजी, मुंबईत सर्वत्र शहिदांना श्रद्धांजलीचे कार्यक्रम सुरू असताना मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी या मुंबईतील नगरसेवक परदेशप्रवासाची स्वप्ने पहात आहेत. त्यामुळे मुंबईच्या नगरसेवकांनी परदेश दौऱ्याचा जो घाट घातला आहे, तो नक्कीच निषेधार्ह म्हणायला हवा. मुंबईकरांना सावरण्याऐवजी, शहिदांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:ची चंगळ करण्यासाठी माजलेल्या नगरसेवकांनी परदेश प्रवासाचा घाट घालणे कदापिही योग्य नाही. जगभरातून भारतासाठी आणि विशेषत: मुंबईकरांसाठी संवेदना जागल्या. परंतु या मुंबईतील नगरसेवकांना मात्र परदेश दौऱ्याचे वेध लागले आहेत. कशासाठी? तर म्हणे, उद्याने पाहण्यासाठी!
आज प्रश्न आहे तो उद्याने सुशोभिकरणाचा नव्हे तर येथील जनतेच्या सुरक्षेचा. सर्वसामान्य परिस्थितीत हा दौरा झाला असता तर त्याबद्दल फारसे आक्षेप कोणीही घेतले नसते. परंतु शहरावर संकट आलेले असताना, या शहरात 16 पोलीस जवान शहिद झालेले असताना आणि दोनशेहून अधिक माणसं मृत्युमुखी पडलेल्या शहरातील नगरसेवकांनी पर्यटनासाठी जाणे शोभत नाही. खरे तर अशा गंभीर पार्श्वभूमीवर परदेश दौऱ्याचा विचार होतो तरी कसा, हाही एक प्रश्नच आहे. त्याचबरोबर मुंबईच्या नगरसेवकांना मुंबईसमोर असलेल्या प्रश्नांचे गांभीर्य कळते की नाही, हाच खरा प्रश्न पडतो. आपण प्राधान्य कशाला द्यायचे, स्वत:ला कशात गुंतवायचे हेच त्यांना कळत नाही.
त्यामुळेच सर्वसामान्यांशी यांचा संपर्क तुटतो. मग काहीजण वैतागून त्यांच्या नावाने दोन-चार चांगल्या शिव्याही हासडतात. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा दौऱ्यांना कात्री लावायला हवी होती, किंवा दौरा पुढेही ढकलता आला असता. परंतु निगरगट्ट बनलेल्या राजकारण्यांना सर्वसामान्यांबद्दल काहीच वाटत नाही. अती गर्वाने हे सर्वजण माजले आहेत. त्यांचा माज आता मुंबईकरांनी उतरवायला हवा. संवेदनशील मुंबईकर हे कधी समजतील तोच खरा सुदिन म्हणायचा!

No comments: