Wednesday, August 17, 2011

अण्णा जिंकलेच पाहिजेत

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अटकेच्या बातमीनंतर देशभरातील आणि विदेशातील लाखो भारतीयांनी फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आदी सोशल नेटवर्किंग वेबसाईट वापरून अण्णांच्या समर्थनासाठी आवाहन केले. अण्णांच्या कार्याची महती गाणारे ई मेल आणि एसएमएसही दिवसभर इनबॉक्‍स मधून फिरत राहिले. अण्णांनी सरकारपासून थेट विरोधकांचीही पुरती भंबेरी आणि झोप उडवली आहे. विरोधकांना अण्णांच्या मागे फरफटत जाण्यावाचून पर्याय उरलेला नाही. शिवसेनेच्या डरकाळ्या फोडणा-या आणि कधीकाळी अण्णांना वाकड्या तोंडाच्या गांधीम्हणून हिणवणा-या या अण्णांना बिनशर्त पाठींबा दिला.राज ठाकरेंनी अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करून पहिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अवाक झालाय.गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्या गांधीने जनसंघर्षाला तोंड फोडून सर्वांना एकत्र केले आहे.स्वातंत्र्यचळवळीनंतर असा एकमुखी पाठींबा जयप्रकाश नारायणांनासुद्धा मिळवता आला नव्हता.हे नेतृत्व अचानक उपटलेले नाही ते पिचलेल्या, नाडलेल्या, गांजलेल्या, उगबलेल्या, त्रासलेल्या जनतेने आपणहून पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सर्व मिडीयानेही त्यांना एकप्रकारचे समर्थन देऊन भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत प्रमुख भुमिका घेतली आहे. मिडीयानेच जनतेला जागे केले. अण्णांचे विचार, त्यांचे निर्णय, पुढचे धोरण जगजाहीर केल्याने जनता जागृत झाली. तरुणवर्ग पेटून ऊठला. 

देशाला विळखा घालून राहिलेल्या राजकीय व शासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर लोकपाल विधेयक आणावे या मागणीसाठी मंगळवारपासून उपोषण पुकारणार्‍या अण्णा हजारेंना त्यासाठी ऐनवेळी परवानगी नाकारून सरकारने भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाप्रती आपली नकारात्मकताच प्रकट केली आहे. अण्णांना सरकार एवढे का घाबरते? उपोषणासारखा अत्यंत शांततामय व संवैधानिक मार्ग अवलंबिणारे अण्णा असोत, अथवा रामदेव बाबा असोत, त्यांचे आंदोलन दडपण्याचे, चिरडण्याचे जे प्रयत्न झाले अथवा होत आहेत, ते निषेधार्ह आहेत. अण्णांच्या उपोषणामुळे सत्ताधीशांची आसने डळमळू लागली आहेत. हे बळ अर्थातच केवळ अण्णांचे नाही. ते नैतिकतेचे बळ आहे. सच्चेपणाची ती ताकद आहे. दुसर्‍या स्वातंत्र्याची ही लढाई आहे आणि ती जिंकल्याशिवाय मागे हटणार नाही, असा वज्रनिर्धार करणार्‍या अण्णांना आज अवघ्या देशाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष साथ आहे. त्यांनी उद्गार दिलेली भावना ही आजच्या घडीस समस्त देशाचीच भावना आहे. भ्रष्टाचाराच्या पाण्यात आपण आकंठ बुडालेलो आहोत आणि देशही बुडण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठी क्रिकेट संघाला जेवढा पाठिंबा मिळाला त्यापेक्षा  जास्त पाठिंबा भ्रष्टाचारविरोधी कठोर कायद्यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना द्यायला हवा, असे आवाहन अभिनेता आमिर खान याने देशवासियांना केले. सर्व स्तरातून अण्णांना पाठींबा मिळाला, मिळत आहे.

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारी तिजोरीला गंडा घालून बुडवले गेलेले एक लाख श्याहात्तर हजार कोटी म्हणजे किती शून्ये रे भाऊ असा प्रश्न पडणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला या अपरिमित लुटीची व्याप्तीच आकळेनाशी झाली आहे एवढा अमर्याद भ्रष्टाचार डोळ्यांदेखत घडत असताना त्यावर अंकुश आणण्याचा विचार कोणी तरी प्रामाणिकपणे बोलून दाखवतो आहे याचे देशाला नक्कीच कौतुक आहे. मात्र, अशा प्रकारच्या आंदोलनाच्या यशस्वीततेसाठी केवळ जनतेचे नैतिक पाठबळ पुरेसे ठरत नसते. आंदोलनाचे स्वरूप काय असेल, ते कुठवर ताणायचे आणि कोणत्या टप्प्यावर मागे घ्यायचे याचे अचूक आडाखे नेत्यांपाशी असावे लागतात. ते नसतील तर बाबा रामदेव यांच्या बाबतीत जे घडले, त्या प्रकारची नामुष्की वाट्याला येते. बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध देशव्यापी वादळ उभे केले. अण्णा हजारेंपेक्षाही अधिक प्रमाणात जनतेचा त्यांना प्रतिसाद लाभला होता. त्यांना बुद्धिवाद्यांची साथ भले नसेल, परंतु देशाच्या सर्व थरांतील नागरिकांपर्यंत ते आपल्या योगप्रसाराद्वारे पोहोचलेले आहेत. त्यामुळे बाबा रामदेव यांनी जेव्हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध लढा पुकारला, तेव्हा देशात एक चेतना जागली होती. दुर्दैवाने त्यांचा भाबडेपणा नडला आणि भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटून उभ्या ठाकलेल्या कार्यकर्त्यांचा अवसानघात झाला. ज्या मग्रुरीने सरकारने ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, ते पाहाता त्याविरुद्ध देशभरात उसळलेल्या असंतोषावर स्वार होत आपल्या आंदोलनाचा वणवा अधिक तीव्र करण्याची रामदेव यांना संधी होती, परंतु सरकारने त्यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावल्यामुळे असेल वा अण्णांच्या समांतर आंदोलनामुळे असेल, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. अण्णांच्या आंदोलनाच्या बाबतीत असे घडू नये अशी जनतेची अपेक्षा आहे. अण्णा हा ग्रामीण आणि धनिक भारताला सांधणारा दुवा ठरला आहे. फक्त आपले आंदोलन ते कशा प्रकारे चालवतात, त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. केवळ भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडा केल्याने प्रश्न सुटत नसतात. लोकपालसाठी एवढा दबाव निर्माण केल्यानंतर सरकार झुकले तरी त्यातून शेवटी काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सरकारने आपल्याला हवा तसा आणि राजकारण्यांना सोयीचा ठरणारा मसुदाच लोकपालच्या रूपाने पुढे आणला आहे. अण्णांच्या उपोषणामुळे सरकार पुन्हा झुकण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु देश जागतो आहे आणि हे जागणे महत्त्वाचे आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध, काळ्या पैशाविरुद्ध जे तीव्र जनमत गावोगावी, खेड्यापाड्यांतून निर्माण होते आहे, त्याकडे सहजासहजी दुर्लक्ष करणे कोणालाही परवडणार नाही. आपल्याविरुद्ध देशात उठलेल्या वणव्यावर जेवढे त्वरेने पाणी फेरता येईल तेवढे राजकारण्यांना हवेच आहे. परंतु अण्णांच्या मागे आज अवघा देश उभा आहे हे मात्र त्यांनी विसरू नये. अण्णांनी जिंकलेच पाहिजे. ते हरले तर त्याचा अर्थ देश हरला असाच होईल. खरेच ही दुसर्‍या स्वातंत्र्याचीच लढाई आहे.

No comments: