Tuesday, January 20, 2009

बेफिकीर समाजाला जागवणार कोण?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अत्याचार, छळ थांबणार नसेल तर भाजपाशी असलेला युतीचा फेरविचार करावा लागेल असे विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम यांनी ठणकावून सांगितले तर यापूर्वी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून भाजपनेही अशीच युती तोडण्याची भाषा केली होती परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाही कारण सध्या भाजपाचे असले तरी यापूर्वी कर्नाटकात अनेक वर्ष कॉंग्रेसचे सरकार होते. महाराष्ट्रातही आहे आणि केंद्रातही कॉंग्रेसचेच सरकार आहे. परंतु महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कधीही फलद्रूप झाली नाही यालाच कुरघोडीचे राजकारण म्हणतात. असेच राजकारण राज्यातही सुरू आहे.
मुंबईतील मराठी माणसांना म्हाडाची 100 टक्के घरे द्या, कोण म्हणतो 80 टक्के द्या. तर दुसरीकडे मराठी भाषेसाठी कोणी लढा पुकारतो आहे. मराठी भाषिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे म्हणून संघर्ष सुरू आहे तर काहीजण जाती-धर्माचे राजकारण करण्यात दंग आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून राज्यातील मराठ्यांच्या जवळजवळ 10-12 संघटना एकत्र आल्या आहेत. परंतु या आरक्षणाचा नेमका फायदा कोणाला होणार? खरोखरच तळागाळातील, गोरगरिब मराठ्यांची या आरक्षणामुळे उन्नती होईल काय? असे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी घटनेत विशेष सुट दिली होती. मग स्वातंत्र्याला 60 वर्षे उलटल्यानंतरही तळागाळातील या समाजाची उन्नती झाली का? सरकारतर्फे मिळणाऱ्या सोयी-सवलतींचा ज्यांना शक्य होते त्या सर्वांनी पुरेपुर फायदा उचलला. परंतु तळागाळातील, ग्रामीण भागातील गोरगरिब आजही दुर्लक्षित आणि उपेक्षितच आहेत. असाच प्रकार इतरही आरक्षणात होतच आहे. मग आमची प्रगती होणार कशी? निवडणूका तोंडावर आल्यावर मतांच्या गठ्‌ठ्यांसाठी कुरघोडीचे राजकारण केले जाते. नंतर मात्र कोणीही या गंभीर प्रश्नांकडे ढुंकूणही पहात नाही. राजकारण्यांच्या या कुरघोडीने मराठी माणसामध्ये दुहीची फळी, भावना निर्माण झाली आहे. राजकारणातील मराठी नेतेच एकत्र येत नाहीत. तर जनता एकत्र कशी येणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. निवडणूकांचे वारे वाहू लागताच सर्वच स्वार्थी नेत्यांनी मते मिळविण्यासाठी धर्माच्या, स्वाभिमानाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. या धर्माच्या आणि जाती-पातींच्या राजकारणात बळी जात आहे तो मात्र सर्वसामान्य जनतेचा. परंतु याचा गांभीर्याने विचार कोणीही करायला तयार नाही. आजच्या घडीला धर्म आणि जात नावापुरती राहिली आहे. राजकारण्यांनी आपल्या सोयीनुसार या जाती धर्माचा गैरवापर करुन निवडणूका जिंकल्या आणि स्वत:च्या तुंबड्या भरल्या. तुम्हा-आम्हा सर्वसामान्य जनतेला काय फायदा झाला? याचा विचार कोण करणार? आजची भयानक परिस्थिती बघता आचरणात धर्म कुठेच दिसत नाही. मंदिर-मस्जीद-चर्च ही धर्मांची पवित्र स्थळे संस्थेची मिळकतीची, भाविकांना लुटण्याची केंद्रे झाली आहेत. तरीही मंदिरातला देव आपली एखादी तरी इच्छा पूर्ण करील या आशेपोटी लोक मंदिरात तासन्‌तास रांगा लावून दर्शन घेताना दिसतात. या रांगेतून पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते. सर्वच ठिकाणी असे सर्रास प्रकार आढळतात. त्यामुळे धर्मालाच बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिरांमधून चोऱ्या होत आहेत. देवांचे दागिने नव्हे तर प्रत्यक्ष देवही पळविले जात आहेत. याचा दृश्य परिणाम सामाजिक स्वास्थावर पडलेला दिसतो. विविध प्रकारच्या अपराधांची आणि अपराध्यांच्या निर्लज्ज कोडगेपणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे निश्चितच चिंताजनक आहे. पूर्वीच्या काळी मंदिरे आध्यात्मिक साधनेची केंद्रे होती तर आज परिस्थिती इतकी बिघडली आहे की, या मंदिरांचे मंदिरपण गेले आणि देवांमध्येसुद्धा "राम' राहिला नाही. नितिमत्ता सतत ढासळत गेली कारण धर्माचे-जातीचे जे सुष्ट विचारांचे नैतिक दडपण पूर्वी असायचे तेच आता राहिलेले नाही अशा परिस्थितीत धर्माचे किंवा जातीचे अभिमान कसे निर्माण होणार? "सत्यधर्म' सांगणारी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे आता राहिली नाहीत. कुठे असलीच तरी या भौतिक आणि ऐहिक सुखाच्या कोलाहलात त्यांचा आवाजच दडपला गेला आहे ही परिस्थिती बदलायला हवी. मंदिरांचे मंदिरपण जपायला हवे बावनकशी शुद्ध धर्म, जातीचा अभिमान का बाळगावा, यासाठी काही चांगल्या गोष्टी तरुण पिढीसमोर मांडायला हव्यात. परंतु जो-तो उठतो स्वार्थासाठी राजकारण करतो. मग लोकांचे मतपरिवर्तन होणार कसे? मनोविकास योग्य दिशेने होत नसल्याने उच्च, दैवी विचारांना आम्ही पारखे होत आहोत. वैचारिकदृष्ट्या आपण कंगाल झालो आहोत. आणि हाच दुटप्पी भूमिकेचा कंगाल वारसा आमची नेतेमंडळी पुढील पिढ्यांना देत आहे याचा सरळ परिणाम विकासावर झाला आहे. माहितीच्या बळावर युरोपीय राष्ट्रे प्रगत झाली आणि एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेला हा आपला भारत देश आज कंगाल झाला आहे.
आजच्या या जलद युगात विचार करायला कोणाकडेही वेळ नाही प्रत्येकजण आपल्याच तोऱ्यात आहे. प्रत्येकजण आत्मकेंद्री झाला आहे. विचारांचेच नव्हे तर भावविश्वाचे परिघसुद्धा अतिशय संकुचित झाले आहे मी आणि माझा परिवार, कुटुंब या पलिकडे पाहण्यास कोणीही तयार नाही. "हे विश्वची माझे घर' म्हणणारी प्रवृत्ती केव्हाच लोप पावली. आज मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक घरातच विश्व सामावले आहे. अशा पिढीकडून उद्यासाठीची काही अपेक्षा नाही तर पुढच्या पिढीसाठी अपेक्षा कोठून करणार? परंतु हे बदलणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला पुढील पिढ्या कदापिही माफ करणार नाहीत. यासाठी आपली संस्कृती, आपले धर्म, जात आणि त्याचे महत्त्व पटवून देणारे कोणीतरी तयार व्हायला हवेत. आज जी काही मंडळी आहे ती कोणत्या ना कोणत्या स्वार्थासाठीच झगडत आहे. निस्वार्थी सेवा कोणीही करत नाही. काही नेते घसा कोरडा पडेपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडून-ओरडून टाहो फोडत आहेत. परंतु विचारांनी भरकटलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यातही राजकारणाचाच वास येत आहे. राज्यातला सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा मराठा समाज आज 30 ते 35 टक्क्यांवर आला आहे. वरकरणी मोठेपणाचा टेंभा मिरवणाऱ्या या समाजाला प्रचंड आर्थिक, सामाजिक, विषमतेने ग्रासलेले आहे. राज्यातील सत्तेची किल्ली मराठा समाजाच्या हातात असूनही उर्वरित मराठा समाज आपल्या जीवनातही कधीतरी सोनेरी पहाट उगवेल या आशेने आपल्याच नेतेबांधवांकडे आशाळभूतपणे पहात आहे. पण सत्तेची चटक लागलेल्या आणि पैशावर लोळणाऱ्या या नेत्यांना आपल्या समाजाकडे बघायला वेळ कुठे आहे? या कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या स्वार्थी नेत्यांनाच आता धडा शिकविण्याची गरज आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या, कोणतीही फिकीर नसलेल्या समाजाला जागे करणार कोण?

No comments: