Friday, July 2, 2010

रिमिक्स! चा धांगडधिंगा

भोर भये पनघट पे...मोहे नटखट श्याम सताये....हे सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌ या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रीत केलेलं गीत. त्या गाण्यातल्या आवाजातलं, नृत्यातलं आणि नायिकेच्या कुरूपतेतलं सौंदर्यही पहाताना एक वेगळंच सुख मिळत होतं. पण या गीताचं केलेलं रिमिक्स, त्या गाण्यावर नृत्य करणारी इशा कोपीकर आणि एकूणच चित्रीकरण पहाताना या आधुनिकतेला आम्ही स्विकारायचं की नाही? हा प्रश्न मनात निर्माण होतो.

आज रिमिक्सने घातलेला धुमाकूळ श्रवणीयही नाही की पहाण्याजोगाही नाही. अनेक नामवंत गायकांच्या मते रिमिक्स गाणं हे आम्हाला आव्हान असतं. ते आम्हाला स्विकारणं भाग आहे. पण पुढे त्या गाण्यावर होणाऱ्या चित्रीकरणाला आम्ही जबाबदार नसतो. पण तरिही जुन्या गाण्यांच रिमिक्स नेमकं कशासाठी केलं जातय हेच समजत नाही. बदलत्या काळाबरोबर या क्षेत्रातील तंत्र,यंत्र सारं काही बदललं. पण ही अशी गाणी पाहिली की याला आधुनिकता म्हणायचं का? जी कला इतरांसमोर पहाताना मान खाली घालावी लागते. एवढंच काय पण या गाण्यांवर ताल धरून शाळा-महाविद्यालयांमध्ये नाचणारी मुलं-मुली पाहिली की त्यांच अजबच वाटतं. नृत्य ही एक कला आहे. पण याचा बाजार मांडल्यासारखं वाटतं. बुगी-वुगी सारख्या नृत्याच्या कार्यक्रमात अनेक लहान मोठ्या मुला मुलींना सहभागी होता येतं. मात्र या वयाला शोभेल अशा गाण्यांवर नृत्य करणारी मुलं इथे अभावानेच पहायला मिळतात.

अर्थात दिलबर.... दिलबर...हां...दिलबर...दिलबर...होश ना खबर है...कैसा असर है... तुमसे मिलने के बाद दिलबर...या गाण्यावर तर शेफाली मन लावून, पुरेसे लटके झटके देत गाण्यावर नृत्य करत होती. नृत्य कसलं ते शरीराच्या इतरांना आकर्षक करण्याच्या चमत्कारिक हालचाली करत होती. तिला आणि तिच्या वयाला न शोभेल अशाच काहीशा या हालचाली आहेत. शेफालीचं वय होतं नऊ वर्षे आणि तिचं नृत्य होतं पंचवीस वर्षाच्या तरुणीला शोभणारं आणि विशेष म्हणजे तिच्या या नृत्याला तिच्या घरच्यांंनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली. नृत्य ही एक सौंदर्यपूर्ण कला आहे यात शंका नाही पण शेफाली ज्या काही शारीरिक हालचाली, उत्तेजक असे तिच्या वयाला न शोभणारे हावभाव करत होती, ते किती योग्य होतं? आणि तिच्या घरच्यांनी अशा गोष्टींना प्रोत्साहन द्यावं, हे किती योग्य? अर्थात या साऱ्या गोष्टींच भान प्रत्येक मुलांच्या पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. एवढंच काय पण बुगु वुगी मेकर जावेद जाफरी यानेही इथे सहभागी होणाऱ्यांनी आपल्या वयाला शोभेल अशीच गाणी नृत्यासाठी निवडावी. तसेच आपल्या पालकांच्या संमत्तीशिवाय गाणं निवडू नये असेही सुचित केले होते.

आजकाल मोठ्यांच्या नृत्याची नकल करून शाबासकी मिळवायची, विविध स्पर्धात्मक कायर्र्क्रमात भाग घेऊन टॅलेन्ट सिद्ध करायचं फॅड चालवणे शिवाय रिमिक्सच्याा नावाखाली जो काही अश्लील हंगामा चाललाय, त्याची बीजं छोट्यांच्या मनात रुजू घातलीयत आणि आईवडील कौतुकाचं खतपाणी घालून या विषारी वृक्षाला जगवताहेत, असं काहीसं चित्र आज दिसतंय. रिमिक्सच्या नावावरही आज अनेक रिमिक्स गर्ल निर्माण झाल्यात. केवळ प्रसिध्दी आणि पैशाच्या हव्यासापायी पुढे येवून अशा अश्लिल चित्रीकरणास तयार होतात. पण यांच्या मातांनाही यांच्या या कलेचा अभिमानच असतो.

कोणतंही गाजलेलं गाणं घ्यायचं, त्यातल्या मूळ संगीताला हटवून धांगडधिंगा करणाऱ्या संगीताची जोड द्यायची, काहीही करायला तयार असलेल्या दोन-चार नव्या मुली घ्यायच्या आणि छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालायचा हा नवा ट्रेन्ड आहे. रिमिक्सचा हा हंगामा एखाद्या सत्‌प्रवृत्तीच्या माणसाची वृत्तीही चाळवेल आणि चळेल असाच असतो. हा तमाशा आपल्या घरातल्या मुला-मुलींच्या नजरेला पडतोच. त्यांचं वय लहान असल्यानं त्यांच्यावर अश्लील दृश्यापेक्षा ठेका धरायला लावणारं संगीत, त्या मॉडेलची केशभूषा, वेषभूषा हे सगळं ठसतं. अशा नृत्याचा समोरच्यांच्या मनावर काय परिणाम होतो हे कळण्याची समज, भावनिक कुवत त्यांच्यात नसते त्यामुळे तसेच लटके-झटके देऊन नृत्य करण्याचा प्रयत्न केला जातो. खरंतर इथंच सावध राहिलं पाहिजे.

मुला-मुलींना अशा नृत्याचं अनुकरण करण्यापासून रोखणं हे आपलच काम आहे. अशी चॅनल त्यांना बघू न देणं, चुकून पाहिलीच तर त्यांना अनुकरणापासून परावृत्त करायचं सोडून अगदी तीे शेफालीसारखी किंवा इशा कोप्पीकर सारखी नाचते ना! म्हणून कोैतुक करणं, हे हल्लीच्या मातांना अधिक आवडतं. मुलांच्या कलेला प्रोत्साहन द्या, कलेच्या नावाखाली होणाऱ्या अश्लितेला प्रोत्साहन देवू नका..

परवाच एका चॅनलवर दिल्लीच्या एका "बझार'मध्ये छोट्या छोट्या मुलांचा वापर ब्लू फिल्मस्‌च्या विक्रीसाठी केला जात असल्याचं दाखवलं. पेपरविक्रीच्या बहाण्यानं या मुलांना बसवलं जातं. अंगावरच्या कपड्यातून या सीडी लपवलेल्या असतात. माहितगार किंवा शोधक बी. एफ्‌. है क्या, असं विचारल्यावर मुलं या सीडी काढून देतात किंवा बाहेर फिरत असणाऱ्या मुलांकडूनही या सीडी खपवल्या जातात.

किती भयंकर आहे हे सगळं! ज्या वयात गोष्टी ऐकायच्या, खेळ खेळायचे, पुढच्या सगळ्या आयुष्याचा पाया भक्कम करायचा त्याच नकळत्या वयात तरुण वयातल्या भावनांची आवर्तनं उठू लागली आहेत. त्यांना तारुण्यातल्या सगळ्याच गोष्टींची जाणीव करून देणाऱ्या वाटा उपलब्ध करून दिल्या जाताहेत. छोट्यांच्या कोमल भावनांच्या जगातही आता "रिमिक्स' घुसलंय ते असं. भावनांची घातक सरमिसळ होतेय.

आपण कुठे कुठे पुरे पडणार आहोत असा प्रश्न सुजाण पालकांसमोर आ वासून उभा आहे. मला वाटतं, निदान आपल्या घरातल्यापुरती आपण या गुंत्याची उकल करायला लागूया. वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो, असं म्हणतात. मुलांच्या कोमल भावनांच्या जगात तारुण्याचं... वासनेचं "रिमिक्स' आताच घुसू नये म्हणून त्यांच्या मनाची मुळं साफसूफ करायला लागूया. नको ती बांडगुळं वेळीच कापून काढूया. एकदा मनाची योग्य मशागत झाली की, निरोगी बीजं रुजायला वेळ कुठे लागतो?

Friday, June 25, 2010

जाहिरातीच्या युद्धात सर्वसामान्य बेजार!

निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार असो कि एखादी नवीन उत्पादक कंपनी असो, ते स्वत:ची प्रसिद्धी इतकी तिखटमीठ लावून करतात की सर्वसामान्य माणूस नेमके काय करावे या विवंचनेत पडतो. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराची जाहिरातबाजी फळाला येवून तो आमदार वा खासदार बनतो. पेट्या-खोके देऊन मंत्री बनतो. अशा या जाहिरात युगाला आपण काय म्हणावे? प्रसिद्धी दिल्याशिवाय आता कुठलाच उद्योगधंदा तग धरू शकणार नाही असे म्हणायचे का? कोणत्याही शहरात किंवा रस्त्यावरून फेरफटका मारला तरी विविध प्रकारच्या जाहिराती, राजकारण्यांचे मोठ मोठाले बॅनर, विविध कंपन्यांच्या उत्तान व श्रृंगारीक होर्डींग्ज नजरेस पडतात. कितीही नाही म्हटले तरी आपली नजर त्या जाहिरातींवर खिळून राहतेच. उत्पादनाशी काडीचाही संबंध नसलेल्या उत्तान आणि अश्लिल मॉडेल वापरून जाहिरातीचे मोठे होर्डिंग कशासाठी लावतात? मागे काही संस्कृती रक्षकांनी असल्या उत्तान आणि अश्लिल जाहिराती काढून टाका म्हणून मागणी केली होती. परंतु सरकार दरबारी जाहिरात कंपनीवाल्यांचे वजन असल्याने त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकले नाही. आज अशा जाहिराती सर्वत्र दिमाखात दर्शन देत उभ्या आहेत.

आजचे एकविसावे शतक जाहिरातबाजीचे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. जिथे पहावे तिथे उत्पादनांच्या जाहिरातीच दिसतात. मोठ-मोठ्या इमारती कार्यालयांच्या भिंती आणि रस्ते भडक रंगात रंगविलेले दिसतात. दूरचित्रवाहिन्यांवरूनही जाहिरातींचा प्रचंड मारा विविध कंपन्यांकडून सातत्याने सुरू असल्याने ग्राहक राजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. आपल्या मालाला उघड प्रसिध्दी दिल्याने ग्राहक आकर्षित होऊन आपल्या उत्पादनाचा खप वाढेल आणि प्रचंड फायदा होईल असे कंपन्यांचे समीकरण असते. अनेकदा एखाद्या उत्पादनाची किंवा चित्रपटाची अफाट जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांचा मोठा अपेक्षाभंग होतो. एखाद्या पदार्थाची हॉटेलवाले खमंग जाहिरात करतात. प्रत्यक्षात मात्र हॉटेलात जावून ते पदार्थ खाल्याशिवाय कळत नाही. परंतु या हॉटेलात गेल्याने हॉटेलवाल्यांचा मात्र फायदाच होतो. सर्वत्र जाहिरातींचाच जमाना असल्याने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ग्राहकांना लुबाडण्याचे सारे प्रयत्न उत्पादक करीत असतात. जाहिरातीच्या या प्रचंड स्पर्धेमुळे वृत्तवाहिन्यांना त्याचा आयताच लाभ होतो. आज टिव्ही माध्यमाच्या विविध वाहिन्यांवरून निरनिराळ्या उत्पादनाच्या जाहिराती पाहून ग्राहकांनी काय घ्यावे काय नाही असा प्रश्न पडतो. सौंदर्यप्रसाधने, साबण, वॉशिंग पावडर, टुथपेस्ट आणि कफ सिरप सारख्या औषध कंपन्यांनी जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकर्षित केले आहे. बॅंका, सिमेंट कंपन्या, आयुर्विमा आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रांनी आज विविध वाहिन्यांवरून आपल्या खपासाठी, प्रसिध्दीसाठी नुसता धडाका लावला आहे. आताचे जाहिरातीचे युग आहे हे ठिक आहे परंतु या जाहिरातींना सुध्दा काही नियम, कायदेकानुन आहेत की नाहीत? ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी किती खोटे बोलायचे, किती प्रकारची आमिषे त्याला दाखवायची? याचा तरी विचार करायला हवा. याच्यावर कोणीतरी अंकुश ठेवायलाच हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड अशी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. थांबला तो संपला असे म्हणत बाजारपेठेत नव्या फॅशनच्या व नवनविन मॉडेलच्या वस्तू उत्पादने येत आहेत. ज्यांच्या हाती पैसा आणि संपत्ती आहे त्यांना वस्तू खरेदी करणे म्हणजे काहीच वाटत नाही. नव श्रीमंतांची, धनदांडग्यांची ही खरेदी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. बेसुमार वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. कंपन्या जाहिरातीच्या या भडक व रंगीबेरंगी जाहिराती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात आणि हे पैसे ते ग्राहकांकडूनच वसूल करतात. म्हणूनच या कंपन्यांनी जाहिरात करून कितीही आपले उत्पादन चांगले असल्याचा आव आणला तरी सर्वसामान्यांना मात्र आपले मेटाकुटीचे जीवन जगताना नाकिनऊ आले आहे. कारण जाहिरातीचा खर्च भरून काढण्यासाठी उत्पादनाची किंमत वाढविल्याने जाहिरातीच्या युद्धात सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे.

प्रेम भावनांचा खेळ!

प्रेम तसा भावनांचा खेळ! या खेळात प्रत्येकजण सहभागी होतो. आणि खेळ म्हटलं की हार-जीत आलीच. ती स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. प्रेमाच्या या संवेदनशील भूमिकेत तुमचा अभिनय हा वाखणण्याजोगा असावा. प्रेम या शब्दाला लाजवेल अशी भूमिका तुमच्याकडून पार पाडली जावू नये. अर्थात हार पत्करण्याची वेळ आली तरी तुम्ही त्या जिंकणाऱ्याच्या वाट्यात तितकेच सहभागी असता. परंतु अशी हार पत्करण्याची त्यागी भावना प्रत्येकातचं असते असं नाही. मानवी जीवनात जन्मापासून तर अन्तापर्यंत एक निर्भेळ भावना जीवंत असते, ती म्हणजे कुणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं, आपलं दु:ख, यातना, वेदना आपण ज्याच्यासमोर मनमोकळेपणाने सांगू शकू अशी एकतरी व्यकनती आपल्याजवळ असावी. ही आंतरिक भावना प्रत्येकाच्या मनात सदैव असते. आपणही कुणावर तर प्रेम करावं ही भावना सुध्दा त्याचवेळी जन्म घेत असते. मग प्रत्येकाच्या जीवनात ही सुगंधी प्रेमाची दरवळ निर्माण होतेच, असं नसते. परंतु प्रत्येक जीव या आशेसह जीवन जगत असतो. हे मात्र खरे.
अशा असंख्य अशा, आकांक्षांसह चालताना त्या आशेची पूर्तता होईल याचाही भरवशा नसतो. कारण मानवी जीवनात नियतीनं ठरवून दिलेलनया रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला एकदा तरी ठेच लागलेली असतेच. म्हणूनच नियतीचं जे घडवलंय त्याचा स्वीकार करून जीवन जगण्याचंा प्रयत्न करावा.
खरं तर प्रेमाची व्यात्पी ही फक्त प्रियकर व प्रेयसी या दोघांपुरतीच मर्यादीत नसून ती एक वैश्विक संकल्पना आहे. पण आम्ही आई-वडिल, भाऊ, बहिण, या नात्यांपेक्षा या नात्याला अधिक जवळ केलंय. वीस वर्ष आईच्या कुशीत विसावणाऱ्या या पाखराला उडण्याचं सामर्थ्य निर्माण झाल्यावर ते कधी भरकटत ते त्यालाही त्याचं कळत नसावं. ते वयंच तसं नसतं तर मनानं घेतलेली भरारी असते ती. हे नातं खुप सुंदर असतं. पण ते सुंदररितीने जगताही यायला हवं. कारण या वयात भरकटत जाणारी विचलीत मनांची अवस्था जिणं मुश्किल करते. प्रेमात तुम्ही नेहमीच विजयी व्हालच असं नाही. तुम्हाला हारही पत्करावी लागेल. कारण जीवनाच्या या खडतर प्रवासात तुमच अवस्था समुद्रप्रवासात असणाऱ्या दिशाहीन जहाजासारखी असते. हे जहाजाला दीशा देण्याचं महत्वाचं काम तुम्हाला पार पाडायचं असतं. अन्यथा दिशाहीन होण्याची भिती अधिक असेल. प्रेम करणं हे पाप नाही. पण यात जबरदस्ती, आसक्ती असू नये. हे दोन मनाचं मिलन आहे. अशा या प्रेमाची पवित्रता प्रत्येकाने जपावी.नाहीतर जीवन हे जगणं खरच मुश्किल होवून जाईल. आज प्रत्येकाचे जीवन जगण्याचे संदर्भ बदलले असले तरी प्रेमाचं पावित्र्य जिथं जोपासल जातं तिथं जीवन हे सुखानं जगणं अगदी सोपं होवून जातं.

Wednesday, June 23, 2010

ग्लॅमरचं भूत ऊतरणार कसे?

मुलींनी घट्ट व तोकडे कपडे घालू नये, अशी मागणी एकीकडे होत असते तर त्याचवेळी अनेक पालक स्वत:च मुलीला जीन्स, आखूड टॉप वगैरे कपडे पुरवून तिला ‘स्मार्टङ्क लुक देत असतात. एकीकडे मुलींसाठी ड्रेस कोड हवा, अशी मागणी काही संस्था - पक्ष करत असतात आणि दुसरीकडे शाळकरी मुलीही रेकॉर्ड डान्सच्या नावाखाली तंग कपडे घालून अचकट विचकट हावभावाची नृत्ये करतात. एकीकडे तरुणींनी आरोग्य जपायलाच हवे, असा विचार मांडला जात असतो आणि त्याचवेळी नवतरुणी ‘वाईन आणि बीअरङ्क च्या बाटल्या रीचवित असतात, रात्री-अपरात्री फिरत असतात, नको त्या अवस्थेत धिंगाणा घालतात, असा विरोधाभास का? तरुणींनी सर्व नीतिसंकेत उधळून लावले तरी समजू शकते; पण पालकही त्याला मूक संमती का देत आहेत? आजच्या तरुणींची फॅशन ही पुरुषी कामवासना उत्तेजित करण्यासाठी पूरक आहे, हे पालकांनाही समजत असते. तरीही ते स्वत:च्या मुलीकडे कानाडोळा का करतात? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे... आणि ते म्हणजे आजच्या तरुणींप्रमाणेच पालकांनाही ग्लॅमरसचं वेड लागलेलं आहे.

आजच्या तीव्र स्पर्धेच्या जगात आपल्या मुलीने टिकून रहायचे असेल तर ती ग्लॅमरस, मॉड दिसायला हवी असं पालकच म्हणायला लागले आहेत. या पालकांच्या डोळ्यात अजंन घालतील अशा काही घटना घडल्या आहेत. तरीही सर्वजण या मोहजालात फसतात. प्रीती जैन या नवोदित मॉडेलने ग्लॅमरच्या नादात शरीराचा सौदा कसा करावा लागतो हे जाहीर केले. नफिसा जोसेफ या भारतसुंदरी किताब मिळविलेल्या मॉडेलनी ग्लॅमर दुनियेत वैफल्य आल्याने आत्महत्या केलीे. या सगळ्या घटना घडत असताना त्याचवेळीस अमिषा पटेलने वडिलांवर फिर्याद दाखल केली! तरी बरं तिच्या वडिलांनीच पैसे खर्च करुन तिचं करियर घडवलं होतं. त्यानंतरही अनेकदा ग्लॅमरच्या नादापायी अनेक मुलींना फसवण्यात आले. तरीही आमचे डोळे उघडत नाही याला काय म्हणावे? गल्लीबोळात चालणारे सिनेसंगीतांवर आधारलेल्या नाचांचे क्लास काय सांगतात? आपली मुलगी जे करु पाहते ते अनैतिक आहे असं जर वडिलांना वाटत असेल आणि आईला वाटत नसेल व दोन्ही बाजू परस्परांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकत नसतील तर अशा शोकांतिका होत राहतील; पण त्याबद्दल जर समुपदेशकाचा आधार घेतला असता तर मुलींनी त्याचे गांभीर्य कळून तिचे मत बदलले असते, सावधपणे काम करायचं आश्वासन दिले असते. या पलीकडे त्या मुलीने ते करायचं ठरविलं तर जीव घेऊन आणि देऊन काही साध्य करता येईल का?
पालकांची यात कोंडी नक्कीच होते. त्यावर जुने आणि नवे यातील बंधनं असतात. प्रतिष्ठेचा काच असतो. त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. अजून मुलांच्या वागण्याच्या परिणामाचे खापर पालकांच्या माथी मारलेच जाते. मध्यमवर्गीय पालक तसा फारसा खंबीर नसतो. त्याला त्याच समाजात रहायचे असते. एका विशिष्ट स्तरावरचा समाज बदललेला असला तरी कुटुंबीयांचे शेरे, टीका सहन कराव्या लागतील. याची खरी वा काल्पनिक दहशत मनावर असते. एका मॉडेल आणि नवोदित अभिनेत्रीनं आपल्यावर बलात्कार झाला आणि पिळवणूक झाल्याचा आरोप केला. या क्षेत्रात गेलेल्या मुलींना अनेकदा अशा बाबींना तोंड द्यावे लागते. हे इतर ऑफिसेसमध्ये होत असते, असे म्हणून त्याकडे कानाडोळा करण्यागत नसते. इथं मुली असुरक्षित असतात नोकरीप्रमाणे त्यांच्याभोवती संस्थेचे सुरक्षाकवचही नसते, कामाची खात्री नसते. पैसा, प्रसिद्धी इत्यादी सर्वच बाबतीत त्या इतरांवर अवलंबून असतात. हे असंच असते आणि ते मान्य करुन चालावे असे म्हणणारेही आहेत. हे प्रकार होण्याजोगे वातावरण आणि मोकळेपणा तिथे असतो जो इतरत्र असतोच असे नाही. अनेकदा मुलींनाही त्याचा मोह पडतो. पुढे जाण्याचा सोपा मार्ग वाटतो; पण तो तसा असेलच याची हमी नसते. मग प्रेमभंग, वचनभंग असले प्रकार होतात आणि भावनेच्या भरात मुली यातून सुटका म्हणजे मृत्यू जवळ करतात. त्यांचे मानसिक स्वास्थ्य नीट रहावे, यासाठी व्यावसायिक पातळीवर काहीही उपलब्ध नसते. अनेकदा इथे जंगलराज असते. ‘बळी तो कानपिळीङ्क या बाबी भावनेच्या भरात होतात. त्यामुळे त्यांना योग्य क्षणी आधार मिळाला तर ती मंडळी सावरु शकतात असे मानसतज्ज्ञ म्हणतात. ग्लॅमरचं अवास्तव वेड आज सर्वत्र आजाराप्रमाणे पसरत आहे. जगण्याची qझग त्यातूनच मिळेल, या भाबड्या कल्पनेने तरुण त्यांच्याकडे ओढले जातात आणि हळवे जीव अपयशाला घाबरुन, निराश होऊन, अकाली जीवन संपवतात, कुटुंबातील प्रेम आधार हा अटींवर नसेल तर काही जीव सावरतील, तरुणाईचा जोष आणि पालकांची द्विधा मन:स्थितीतील कुतरओढ यातून हे भीषण अपराध होताना दिसताहेत.
अगदी स्पष्ट बोलायचे झाले तर अशा घटनांंसाठी पालक स्वत: पहिले जबाबदार आहेत. विशेषत: मध्यमवर्गीय पालकांची जी सध्याची मानसिक अवस्था आहे. ती सर्व पालकही त्याला पूरक ठरतात. पालकांचे वय, अनुभव, समाज निरीक्षण, क्षमता व भलेबुरे ठरविण्याची दृष्टी या गोष्टी जमेस धरल्या तर त्यांनी ग्लॅमरस रुपाचा विराध करायला हवा; पण हल्ली मध्यमवर्गीय पालकांना उच्च वर्गीय, श्रीमंताचे आकर्षण वाटते. उच्च वर्गीयांप्रमाणेच आपणही युरोपीय संस्कृती स्वीकारावी, असे सुप्त आकर्षण त्यांच्या मनात असते.
गाड्या, मोबाईल, इंटरनेट, परदेश प्रवास, अशा सुखसंपन्नतेने जीवनात qझग चढावी असे वाटत असते. सर्व श्रीमंती तर प्रत्यक्षात उतरविता येत नाही; पण निदान मुलींनी मॉड व्हावं, इग्लिश भाषेसह आधुनिक जीवनशैली स्वीकारावी, याला ते होकार देतात. घरातल्या मुलानं व मुलीनं नेटवर तासंतास चॅqटग केले qकवा मुलीने फिगर मेंटेन केली तर ती स्मार्ट झाली आहे असा ते अर्थ लावतात. हा फार मोठा सामाजिक घात आहे. समाजावर अंकुश ठेवणारा मध्यवर्गीय असा बेताल बनतोय. जोवर मध्यमवर्गीय पालक नवतरुण वर्गावर नियंत्रण ठेवत नाही तोवर प्रीती जैन qकवा नफिसासारखी प्रकरणे पाहात रहावी लागतील. पूर्वी अशी प्रकरणे युरोपादी देशात व्हायची, त्यातून होणाèया हत्याआत्महत्या, त्यातले छुपे संबंध यालाही ग्लॅमर प्राप्त व्हायचे आता तसला प्रकार आपल्या मध्यमवर्गात व्हायला लागला आहे. ग्लॅमरचे भूत आमच्याही मानगुटीवर बसलंय हे ग्लॅमरचं भूत उतरणार कसे?

अपयशातून मिळणारं यश अधिक समाधानकारक

अपयश ही यशाची पहिली पायरी होय. अपयश म्हणजे आपल्यातील उणिवा ओळखण्यासाठी आलेली संधी; त्याचप्रमाणे आपल्या चुका सुधारण्याची संधी असते. परीक्षेत अपयश आल्याने अथवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने अनेक विद्याथ्र्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. काहीवेळा या नैराश्येच्या पोटी विद्यार्थी आत्तहत्याही करतात. आजकाल अशा प्रकारच्या घटना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागची कारणे आणि उपाय या संबंधी विचार होणे आवश्यक आहे.
अपयश आल्यानंतर सारं काही व्यर्थच आहे असा नकारात्मक विचार नैराश्यमागील प्रमुख कारण असलं तरी अशा नकारात्मक विचार वाढीस अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आज आपल्याकडे परीक्षांना अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. यामागे पालकांची मानसिकता महत्वाची असते. कारण यांच्या मत आपल्या मुलाने केवळ परीक्षा निव्वळ पास होणे एवढेच यांच्यासाठी महत्वाचे नसते तर त्याने अधिकाधिक गुण मिळवणं महत्वाचं असतं. त्यांनी ही मानसिकता जपणं गैर नाही. कारण आज उत्तम गुण म्हणजे उत्तम नोकरी, व्यवसाय, मग पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा असे एक समीकरणच तयार झाले आहे. त्यातच पाल्याच्या क्षमतेचा, कुवतीच्या विचार मात्र पालकांकडून केला जात नाही. उलट अनेक खासगी क्लासेस, टेस्ट सिरीज, पुस्तके यांचा भडीमार केला जातो. त्यामुळे त्याची होणारी शारीरिक मानसिक ओढाताण याकडे फारसे लक्ष न देता परीक्षेत उत्तम गुण मिळविणे आवश्यक आहे हेच त्यांच्या मनावर बिंबवले जाते.
पालक नेहमीच आपल्या पाल्याला हे वर्ष तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे कायम मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात पालक आपली समाजात प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सारं करत असले तरी शेवटी पाल्याचं यश हे त्याच्या सुखी आयुष्याची तिजोरी असते. ती भरण्याचाच पालकांकडून प्रयत्न होत असतो. पण ती भरताना आपण कोणता मार्ग अवलंबतोय याचाही विचार करणं गरजेचं आहे. बèयाचवेळा मार्ग चुकतात आणि मग यशाऐवजी अपयश पदरात पडतं. हे अपयश पचवणं पालकांना सहज शक्य नसतं आणि मग मुलांमध्ये नैराश्य येतं. यासाठी सामाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कारण पाल्यास पालकांची, समाजाची भिती असते. ही भिती काढून पालक व पाल्य यांच्यातील संबंध अधिक मोकळे होणे, गरजेचे आहे.
शैक्षणिक यश अपयश आणि जीवनातील यश अपयश यामध्ये फरक आहे. तुमचे अपयशच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवेल. कारण अपयश म्हणजे आपल्यातील कमतरता ओळखण्यासाठी आलेली संधी. अपयशातून मिळालेल्या यशानं ज्यांच्या पायाजवळ लोळण घेतलंय अशा अनेक व्यक्ती आपल्याकडे होवून गेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे एडमंड हिलरी. परंतु या शिखरावर चढताना अनेकवेळा अपयश आलेल्या एडमंड हिलरी यांनी हिमालयाच्या शिखराला उद्देशून म्हटले होते, तू माझा पराभव केलास, मी पुन्हा येईन व तुझ्यावर विजय मिळवेने. आणि अपयशातून मिळालेले हे यश अधिक समाधानकारक होते.

Tuesday, June 22, 2010

आजची आधुनिकता आणि ग्लॅमर

सध्या सगळीकडे आधुनिक बनण्याची लाट आली आहे. उद्योग व्यवसायापासून ते बालवाडीपर्यंत, पाककलेपासून ते वास्तुनिर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता शिरली आह े. आधुनिकता नेहमीच स्वीकारार्ह असते, असायला हवी. पण जुनं सोडून नव्याचा अवलंब करणे योग्य नाही. नव्याचा स्विकार करणे गैर नाही. पण त्याचं अंधानुकर होतंय. त्यामुळे त्याचे परिणामही भोगावे लागत आहेत. कारण आधुनिकतेच्या ध्यासापायी आपण काय करतो आहोत याचं भान या तरूणांना राहिलेलंच नाही. भारतीय परंपरा, संस्कृती विचारमूल्ये यां सगळ्यापासून आजचा समाज दुरावतोय. अर्थात या आधुनिकतेचे आघात आपल्या परंपरेवर, संस्कृतीवर होताना दिसत आहेत.
ही आधुनिकता कितपत योग्य की अयोग्य हे ठरवायचं नाही. आज संपूर्ण जग ग्लमरस स्वीकारतेय. आणि म्हणून आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्यामुलीने टिकून राहायचे असेल तर ती ग्लॅमरस दिसायला हवी असं पालकांचेच एक मत तयार झालंय. पण ग्लॅमरसच्या दुनियेत नुसताच वरवरचा झगमगाट आहे आत सगळाच अंधार. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. प्रीती जैन या मॉडेलनने ग्लॅमरच्या नादात शरीराचा सौदा कसा करावा लागतो हे जाहीर केले. नफिसा जोसेच या भारतसुंदरी किताब मिळविलेल्या मॉडेलनी ग्लॅमर दुनियेत वैफल्य आल्याने आत्महत्या केल्याचेही उघडकीस आले आहे. या उदाहरणांनी तुम्ही आजचं ग्लॅमर कितपत स्वीकारायचं याचा विचार करायला हवा. अर्थात आजकाल लहान मुले-मुलीही ज्या प्रकारच्या गाण्यांवर अचकट विचकट अंगविक्षेप करत नाचत असतात आणि त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या भावनांचा अविष्कार करत असतात. नको त्या भावना दर्शविताना ते सारे विकृत वाटते. बुगी वूगी या कार्यक्रमाचा होस्ट बेहेल याच्याकडूनही अनेकदा लहान मुलांनी वयाला शोभेल असेच नृत्य करावे अशा अनेकदा सुचना दिल्या आहेत. पण तरीही चार वर्षाची मुलगी दिल धक धक करने लगा या गाण्यावरच नृत्य करताना दिसते. अर्थात याचा दोष आजच्या पालकांनाच द्यावा लागेल. अर्थात पालकांच्या उत्तेजनाने ही मुलं वागतात यात वादच नाही. आईवडिलांनी मुलांच्या कलेला जाणायला हवंय. पण ते मर्यादा पाळून. पण बऱ्याचदा आपली मुलगी जे करू पाहते ते अनैतिक आहे असं जर वडिलांना वाटत असेल आणि आईला वाटत नसेल तर , एका विशिष्ट स्तरावरचा समाज बदललेला असला तरी कुटुंबीयांचे शेरे, टीका सहन करावे लागतात.

Saturday, May 22, 2010

गृहिणींमध्ये जागृती घडवायलाच हवी!

"जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उध्दारी' अशी एक फार जुनी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे अशी व्यक्ती म्हणजेच अर्थातच स्त्री या जगाच्या उध्दारास कारणीभूत ठरू शकते.

मुलाच्या जन्मापासून म्हणजेच लहानपणापासून ती त्या मुलावर चांगले संस्कार करीत असते. मुलांना चांगले वळण लागावे म्हणून ती अतिशय झटत असते. पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया अर्थार्जनासाठी क्वचितच घराबाहेर पडत असत, तेव्हा त्यांना आपल्या घराकडे व मुलांकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळत असे. त्या वेळेचा फायदा घेऊन त्या आपल्या जबाबदाऱ्याही अत्यंत उत्तम रीतीने पार पाडत असत. पण काळ बदलला. परिस्थिती बदलली. स्त्री सुध्दा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करू लागली. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनात कमावत्या स्त्रीला आपल्या घराकडे, नवऱ्याकडे, मुलांकडे लक्ष द्यायला फारच कमी वेळ मिळतो. ही वस्तुस्थिती आहे.तसेच बदलत्या काळानुसार स्त्रीची मानसिकताही बरीच बदलली आहे. संसाराच्या या रामरगाड्यात तर काही जणींना आपल्या या मुलभूत जबाबदारीचाच विसर पडल्यासारखे झाले आहे. मग घरावर संस्कार करणाऱ्या स्त्रीचे मनच अशांत व अस्थिर असेल तर त्या घरावर संस्कार तरी कोण करणार आणि त्या घराचा विकास तरी कसा होणार?

Tuesday, March 16, 2010

"गुढीपाडवा' मांगल्याचा, संकल्प करण्याचा!

ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाचा वाढदिवस, नववर्ष हा गुढीपाडव्याला साजरा करण्यात येतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील पहिला सण मानला जातो. हिंदू संस्कृतीत या दिवसाला फार मोठे महत्त्व आहे. इतिहासातील अनेक दाखले यासाठी पुराव्यादाखल देता येतील. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य करून त्यांच्यात जीव भरला आणि शत्रूचा पाडाव केला. म्हणजेच मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, निर्जीव, दुर्बल झालेल्या समाजामध्ये नवचैतन्य, स्वाभिमान, अस्मिता जागृत करून त्यांनी शत्रूला नामोहरण केले. आणखी एका गोष्टीत असे म्हटले आहे की, शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेला मुक्त केले. या विजयाप्रित्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला सुरूवात झाली. ज्यांनी विजय मिळवता. तो "शालिवाहन' आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते "शक' असे दोघांचाही अंतर्भाव यामध्ये करण्यात आला. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या दुष्ट राक्षसांचा पराभव केला. त्या प्रभू रामचंद्रांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला अयोध्येत प्रवेश केला. त्या दिवशी जनतेने प्रभू रामचंद्र आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारोदारी गुढी-तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. ही परंपरा तेव्हापासून सुरू आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावी. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे किंवा भगवे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर तांबे किंवा स्टिलचा तांब्या लटकवून तयार केलेली गुढी दारासमोर उभी करावी. हल्ली शहरांमधील उत्तुंग इमारतीत रहाणाऱ्यांनी घरासमोरील बाल्कनीत सर्वांना दिसेल अशी बांधावी. या पवित्र गुढीची पुजा करावी. नेवैद्य म्हणून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यामध्ये जिरे, मिरी, हिंग, सैधव व ओवा इत्यादी घालून हे मिश्रण चांगले वाटून घरातील आणि शेजाऱ्यांना थोडे-थोडे वाटावे. त्यानंतरच गोड-धोड खावे. त्यानंतर या मुहूर्ताच्या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा. नववर्षाचा हा पहिला दिवस गुढी आकाशात उभारून दिमाखाने साजरा करावा...
प्रथम दिवस हा नववर्षाचा

पावित्र्याचा मंगलतेचा

संकल्पचि करू भावभक्तीने

सत्कर्माचि नित करण्याचा

जे जे वाईट हातून घडले

विसरून जाऊ ते ते सारे

येथून पुढती अखंडतेने

मनी रंगवू उच्च मनोरे

बंधुत्वाचा येथून पुढती

दीप पेटवू आपुलकीने

...गुढीपाडवा या सणाचे महत्व कवी म. पा. भावे यांनी आपल्या कवितेत सुरेखरित्या शब्दबद्ध केले आहे. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृती हा मोठा अमूल्य ठेवा आहे. यामागे फार मोठी प्राचीन परंपरा आहे. ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या या सृष्टीच्या निर्मितीचा दिवस आनंदात साजरा व्हायला हवा. याच सुमारास निसर्गसृष्टीसुद्धा जुन्या, अनावश्यक गोष्टींचा त्याग करून नव्या गोष्टींचे उदार मनाने स्वागत करते. कोवळ्या पालवीचे मनोहर रूप धारण करते. यातूनच आपण बोध घ्यायला हवा.

जुने हेवे-दावे सोडून खुल्या मनाने नव्याचा स्वीकार केल्यास आपल्या आयुष्यातही नव्या आशा, आकांक्षाचे धुमारे फुटतील. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न केल्यास जीवनाला नवी दिशा प्राप्त होईल. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मागील वर्षी जी काही चांगली किंवा वाईट कामे केली त्याचे स्मरण करून वाईट विचार, भावनांचा त्याग करायचा आणि नववर्षाच्या निमित्ताने नवा संकल्प करून नव्याने सुरूवात करायची. अशा या पावित्र्याच्या, मांगल्याच्या आणि सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपणही दिमाखात साजरा करू या! आकाशात विजयपताकांची गुढीची रांगच रांग दिसू द्या! सातासमुद्रापार पोहोचलेल्या आपल्या सर्व हिंदू बांधवांनी मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाच्या आणि शिवरायांच्या भगव्या झेड्यांची ही पवित्र गुढी आकाशात उभारून नववर्षानिमित्त चांगला संकल्प करू या! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, October 1, 2009

लोकप्रतिनिधी आणि आम्ही

तिकीट वाटपात गोंधळ, श्रेष्ठींचे राजकारण, पक्षबदल, घराणेशाही आणि विधानसभा निवडणूका जाहीर होताच सर्वच पक्षांची उमेदवारी घोषित करताना झालेली दमछाक सर्वांनीच पाहिली. उमेदवारी मिळविण्यासाठी आपले नेते किती लाचार होतात हे ही या निमित्ताने दिसून आले. कॉंग्रेसमध्ये नाराजी, राष्ट्रवादीत असंतोष, शिवसेना-मनसेत फाटाफूट, भाजपमधून राजीनामे, तिसऱ्या आघाडीत फूट, कॉंग्रेसला रामराम, संताप, धुसफूस, विश्वासघात, पैसे खाऊन तिकिटांचे वाटप, सभा घ्यायला पैसे नाहीत म्हणून तिकिट नाकारले, पक्षश्रेष्ठांना तिलांजली देऊन अपक्ष म्हणून बंडखोरी- हे सर्व कशासाठी? कोणाचाच कोणावर विश्वास नाही. कोणावरही निष्ठा नाही ना आपल्या पक्षावर, ना आपल्या नेत्यांवर, तिकीट मिळेपर्यंत ज्यांचा आदरणीय म्हणून उल्लेख केला जातो तेच तिकीट दुसऱ्याला मिळाले की आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. दुसऱ्या पक्षात जाण्याच्या घोषणा करतात. तिकडेही काही नवीन नाही परंतु नव्याने येणाऱ्यांना आरतीने ओवळतात. तिकिट देतात. मग पुन्हा तिकडेही काही नवीन नाही परंतु नव्याने येणाऱ्यांना आरतीने ओवाळतात. तिकीट देतात. मग पुन्हा तिकडेही जुने निष्ठावंत बंड करणारच. सगळा प्रकार किळसवाणा.
जनतेची सेवा करण्याचे तोंडाने बोलायचे आणि मनाने सत्तेसाठी, तिकिटासाठी वरिष्ठांचे पाय चेपायचे असले घाणेरडे प्रकार घडत असतानाही आम्ही पांढरपेशे मतदार फक्त तमाशा पहाण्याचेच काम करतो. सालाबादप्रमाणे 40.45 टक्के मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार, बाकीची मंडळी सुट्टी मिळाली म्हणून पिकनिकला जाणार, थोडक्यात, पैसे वाटून मतदार विकत घेऊन पुढारी आमदार होतात. पैशाच्या बळावर सत्तेवर येतात. या सगळ्या प्रकाराला आपणच जबाबदार असतो, हे कटू सत्य आहे. परंतू ते स्विकारण्याचे धाडस मात्र कोणीही करत नाही. नंतर मात्र या नेत्यांच्या नावाने उगाचच फालतू चर्चा करण्यात दिवस घालवतो. आपला लोकप्रतिनिध कसा आहे, तो काय करतो, त्याच्याकडे नवनवीन गाड्या, बंगले कसे येतात हे उघड गुपित असले तरीही आम्ही डोळे झाकून त्यांनाच निवडून देतो.
विकास म्हणजे काय? शहर असो की गाव, सर्व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे काम केले तर 5.10 वर्षात त्या भागाचा कायापालट नक्की होऊ शकतो. परंतु निवडून गेलेला कुठलाही लोकप्रतिनिधी नियोजनपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करीत नाही. स्वतःच्या पोटा-पाण्याची, पेटारे भरण्याची कामे करण्यातच ते मग्न असतात. हे पूर्वापार चालत आले आहे. विकास होण्यासाठी लोकप्रितिनिधी हा अभ्यासू आणि प्रामाणिक असावा लागतो. परंतु सध्याचे चित्र काय सांगते? प्रत्येकजण पैसा कमावण्यातच दंग आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सामिल होतात. त्यांच्याशी संगनमत करून विकासाच्या योजना कागदावरच रंगवून स्वतःचे स्वार्थ पहातात. अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार करतात. ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांना "लुटण्याचे' साधन मानतात, प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी हेच लोकप्रितिनिधी "दलाली' घेतात. संतत्प मतदारही त्यांच्याशी संबंध तोडतात. परंतु पुन्हा नव्याने येणारसुद्धा त्याच जातकुळीतला असतो. त्यामुळे थंड डोक्याच्या आणि निद्रिस्त जनतेचा गैरफायदा उठवत लोकप्रतिनधी मनमानी कारभार करतात. आम्हाला प्यायला पाणी नाही, रस्त्यांची सोय नाही, शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. वीजेची टंचाई भेडसावते आहे. रोजगार नाही, बेकारी वाढते आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे तरीही या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची हिम्मत आम्हाला होत नाही, अशाने आमचा विकास होणार कसा? त्यांना जाब विचारणारा कोणीही नाही म्हणूनच निवडणूकीचा तमाशा सर्वजण पहात आहेत. त्याची हवी ती मनमानी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत रहायला हवे. कोणत्याही आमिषाला, आश्वासनांना बळी न पडता, चांगल्या लोकप्रतिनिधीला मतदान करायला हवे एखाद्या विकासाच्या कामासाठी वारंवार त्या लोकप्रतिनिधींना भेटले पाहिजे. त्यांच्या डोक्यावर बसून प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन दबाव टाकून काम करून घेतले पाहिजे. ऐकत नसतील तर त्यांच्याविरोधात वृत्तपत्रांकडे धाव घेतली पाहिजे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली समस्या आपणच सोडविली पाहिजे. अन्यथा आपण असेच खितपत पडून रहाणार! आपण नक्की काय करायचे हे ठरविण्याची वेळ आता आलेली आहे. निवडणूकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी दारोदार फिरत आहेत.
त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न तरी करा, यश नक्की मिळेल.

डावपेच निवडणुकीचे

"कॉंग्रेस का हाथ, आम आदमी के साथ' अशी जरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा असली तरी गेल्या 10 वर्षांत जो अजेंडा झाला तोच पुढे चालू राहणार आहे, हेच सत्य आहे. या अजेंड्यात फक्त मंत्री-संत्रीच पोट भरताहेत. खाजगीकरण, टोलमार्गे लूट आणि बिल्डरांसाठी पायघड्या घालून जो-तो खोऱ्याने पैसा ओढतो आहे. मुंबईत घुसलेले परप्रांतीय उलट-सुलट पुरावे बनवून फुकटात फ्लॅटधारक बनत आहेत. त्याच मुंबईतील मराठी माणसाला देशोधडीला लावले जात आहे. 35-40 वर्षे उलटल्यानंतरही मराठी माणसाला निवारा शिबिरात वास्तव्य करावे लागत आहे. या मराठी माणसाच्या न्याय-हक्कांसाठी आता मनसेचे राज ठाकरे लढाईसाठी सज्ज झाले आहेत. मुंबईतील महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्या महापालिकेतील जवळजवळ शंभर टक्के कंत्राटदार अमराठी आहेत. असे असताना प्रत्येक राजकारणी स्वत:चे स्वार्थ पहात स्वस्थ बसला आहे. बदमाश व्यापारी, दलाल, सरकारी कर्मचारी आणि सत्तारूढ पक्ष यांच्या साटेलोट्यांमुळे सर्वसामान्य जनता मात्र विविध प्रश्र्नांनी त्रस्त आहे.
मराठी माणूस तत्त्वाला पक्का, त्यामुळे शिवाजी महाराजांचे तोंड कोणत्या दिशेला असावे, पुतळा मराठी माणसाने करावा की मलेशियन; शहराचे नाव औरंगाबाद असावे की संभाजीनगर; पुलाला नाव कोणाचे द्यावे- राजीव गांधींचे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येथपासून "भैय्यांनी पाणीपुरी विकावी की भाऊंनी, आणि शिववडा-पाव असे नाव सेनेच्या मराठी बर्गरला द्यावे की नाही' या व अशा अस्मितेच्या प्रश्नांनी महाराष्ट्राला कायम त्रस्त आणि व्यस्त ठेवलेले असते. त्यातच आता पक्षाने निवडलेला उमेदवार लायक की तिकीट डावललेला यावरून वाद सु रु आहेत. तिकीट डावललेले हे सर्वजण बंडखोर म्हणून आपली अपक्ष उमेदवारी जाहीर करतील. त्यापैकी काहीजण या दोन-चार दिवसांत मांडवली करून, आपल्या ताकदीनुसार पेट्या, खोके घेऊन उमेदवारी मागे घेतील. पण काही बंडखोर रिंगणात राहतीलच. म्हणजे आखाड़यात साधारणपणे पाच ते सहा हजार उमेदवार असतील. त्यामुळे यावेळी निवडणुका होणार नाहीत तर पाडवणुका होतील. काहींना तर आपण निवडून येण्यापेक्षाही कोणाला तरी पाडण्यातच अधिक आनंद असेल. सर्वचजण स्वत: निवडून येण्याऐवजी दुसऱ्याला पाडण्यासाठी उभे असतील तर कोण निवडून येईल, हे सांगणे अतिशय कठीण आहे. काही वेळा तर इतर पक्षांमधले बंडखोरच आपापसात एकजूट करतात आणि मुख्य उमेदवाराला धूळ चारतात. कोणत्याही उमेदवाराचा पराभव हा त्याच्याच पक्षातले तिसऱ्या- चौथ्या- पाचव्या फळीतले कार्यकर्ते करतात. ते वरकरणी काम करतात अधिकृत उमेदवाराचे; किंबहुना अधिकृत उमेदवाराकडूनच ते एअरकंडिशन्ड गाड्या, पेट्रोल, जेवणखाणाचे (पिण्याचे!) पैसे व इतर खर्च घेतात आणि काम बंडखोराचे करतात. कित्येक उमेदवारांना तर कुठून आणि कशासाठी उभे राहिलो असे वाटू लागते. श्रेष्टींची लाचारी करून, त्यांच्या बॅगा उचलून वा पोचवून, तथाकथित कार्यकर्त्यांची सर्व प्रकारची चैन सांभाळून, पत्रकारांपुढे लाळ घोटून, स्वत:चे लक्षावधी (कोट़यवधी!) रुपये या जुगारात लावून, सर्व बंडखोरांना नामोहरम करून, एकदा आमदार म्हणून निवडून आले की लगेच पुढच्या फिल्ंिडगची तयारी सुरू करावी लागते. जर आपल्या आघाडीचे सरकार आले तर मंत्रीपदासाठी क्षेत्ररक्षण करायचे असते. मंत्री होण्याच्या यादीत नाव आलेच तर किफायतशीर खाते मिळविण्यासाठी पुन्हा श्रेष्टींच्यापुढे लाळघोटेपणा करा वगैरे वगैरे. निवडणूक खर्चाची अधिकृत मर्यादा कितीही असो, प्रत्यक्षातला प्रत्येक उमेदवाराचा खर्च हल्ली पाच ते सात कोटी रुपयांच्या आसपास जातो. हा सर्व खर्च प्रथम आमदार आणि नंतर मंत्री झाल्याशिवाय रिकव्हर करता येत नाही. किंबहुना या धंद्यात प्रथम गुंतवणूक आणि नंतर वसुली असल्यामुळे, बहुतेक राजकारणी लोक त्या गुंतवणुकीसाठी ज्याच्या हातात, जी काही सत्तेची सूत्रे असतील, ती वापरून पैशाच्या खाणी खोदायला सुरुवात झालेली असते. भूखंड काबीज करणे, त्या ठिकाणी टॉवर्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स उभे करणे, त्यासाठी डी. सी. रुल्स पाहिजे तसे वाकविणे, विशेष एफएसआय घोषित करणे, टीडीआर देणे, अशा इमारती बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्‌स) मिळविणे, हे करताना आयएएस अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व गोष्ठींना कायदेशीर रुप येईल. हे पाहणे, मंत्रालय, महापालिका इत्यादी कर्मचाऱ्यांच्या संसारिक गरजा भागविणे, मीडियातील प्रतिमा सांभाळणे, बातम्या मॅनेज करणे, प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात बातम्या प्रसृत करणे, सर्व टीव्ही चॅनल्सवरती आपली अनुकूल छबी येईल हे पाहणे हे सर्व अगोदरच सुरू झालेले असते. त्यामुळे निवडणूक पुढील महिन्यात होणार असली तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी आपापली सत्ताकेंद्रे वापरून निवडणूक खर्चाची तयारी तीन-चार वर्षांत पूर्ण केलीच होती. अपक्ष वा बंडखोर, मनसे वा तिसऱ्या आघाडीतील उमेदवारांना वसुलीची संधी तेवढ़या प्रमाणात मिळालेली नसते. म्हणूनच तर अधिकृत उमेदवारांना पाडण्यासाठी या सर्व राखीव फौजेचा उपयोग होतो. साहजिकच या इतर पक्षातल्या उमेदवारांच्या व बंडखोरांच्या निवडणुकीचा खर्च प्रस्थापित पक्ष वा स्वत: उमेदवार करतात. त्यामुळे बंडखोरांचे खिसेही रिकामे नसतातच. शिवाय निवडून आलेल्या बंडखोराची किंमत सरकार बनविताना कितीतरी वाढते.म्हणुनच आता बंडखोरांचे लक्ष विचलीत करुन शहरी मतदारांभोवती फासे कसे टाकायचे, याचे डावपेच धूर्त राजकारणी आखू लागले आहेत. आकाशाला भिडणाऱ्या जमिनीच्या किंमतींमुळे भूखंडांचे श्रीखंड खाण्यापुरतेच शहरांकडे लक्ष देणाऱ्यांना वरकरणी का होईना शहरी जनतेप्रती कळवळा दाखवावा लागणार आहे. याचे कारण शहरी मतदारसंघांची लक्षणीयरीत्या वाढलेली संख्या. राज्यातील नागरीकरणात वाढ झाल्याने साहजिकच नागरी भागांतील मतदारसंघांची संख्या वाढणारच होती. राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी शहरी-अर्धशहरी अशा जागांची संख्या शंभरवरून एकशेतीसपर्यंत वाढली आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेली मुंबानगरी, तिची उपनगरे आणि ठाणे परिसरातील मतदारसंघांची संख्या सत्तेचाळीसवरून साठपर्यंत गेली. पुणे आणि औरंगाबाद जिल्दॄयांतील मतदारसंघांची संख्या प्रत्येकी तीनने वाढून अनुक्रमे एकवीस आणि नऊ झाली आहे. नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर या शहरांतील मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एकची भर पडली. शहरी मतदारसंघांमध्ये वाढ झाल्याने "शहरांचा विकास हाच आमचा ध्यास' यांसारखी घोषवाक्ये राजकीय नेत्यांच्या तोंडी खेळू लागली. राज्यात प्रदीर्घ काळ कॉंग्रेस सत्तेवर आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसजनही पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसजनच असल्याने तेही प्रदीर्घ काळ सत्तेवर आहेत. भाजप-शिवसेना युतीही सुमारे साडेचार वर्षे सत्तेवर होती. त्यामुळे प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांनी सत्ता भोगली आहे. सत्तेवर कोणीही असो, नागरी भागांच्या मूलभूत समस्या सोडविण्याची आच आतापर्यंत कोणत्याही पक्षात दिसलेली नाही. या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केली ती थातूरमातूर आणि कामचलाऊ मलमपट्टी. निवडणुका तोंडावर येताच केवळ झोपडवासीयांना अभय देण्यापुरतीच कार्यक्षमता यांच्यामध्ये दिसली, झोपडपट्ट़यांच्या पुनर्वसनाची-त्या पुढील काळात होऊच नयेत यासाठी दूरगामी योजना आखण्याची आणि पार पाडण्याची कर्तबगारी त्यांनी कधीच दाखविली नाही. केवळ काही मर्यादित भागांतच नागरीकरणाचे केंद्रीकरण झाल्याने तेथे अनेक समस्या उभ्या ठाकल्या. बेरोजगारी, मर्यादित जागांमुळे जमिनींच्या भडकत्या किंमती आणि त्यातून निर्माण होणारे "भाई दादा', असे लॅंडमाफिया, पायाभूत सुविधांवरील वाढता ताण, घरांची चणचण आणि त्यातून वाढत जाणाऱ्या झोपडपट्टया, वाहतुकीची कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा अभाव, ढासळते पर्यावरण. याला जबाबदार राज्यकर्त्यांची नियोजनशून्यता, कळकळीचा अभाव आणि भ्रष्ठ वृत्ती. योग्य नगरनियोजन न झाल्याने शहरे "आडवी-तिडवी' अस्ताव्यस्त पसरली. शहरांचे-जिल्ह्यांचे नियोजन कागदावर तयार आहे, मात्र त्याची अंमलबजावणी कोणी करायची? सतत पैशांची चटक लागलेल्या राज्यकर्त्यांमुळे हे नियोजन केवळ फाईलबंदच राहिले. नियोजनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांचे नेमके काय काम असले पाहिजे, याची माहिती या समितीच्या सदस्यांना सोडाच, पण मंत्रिमंडळातील किती जणांना आहे? मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सारख्या मुख्य शहरांवर येऊन कोसळणारे लोंढे थोपविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणेही आवश्यक आहे. राज्याच्या विविध भागांत जाणीवपूर्वक उघोगधंदे उभारले गेले पाहिजेत, लहान आणि मध्यम शहरांची वाढही होण्यासाठी कृषी आधारित उद्योगांना चालना द्यायला हवी. त्यामुळेच नागरीकरणाचा समतोल विकास होईल. पुण्या-मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी या शहरांच्या आसपासच्या भागांचा नियोजनबद्ध विकास करण्याचीही गरज आहे. पण लक्षात घेतो कोण?