Friday, June 25, 2010

प्रेम भावनांचा खेळ!

प्रेम तसा भावनांचा खेळ! या खेळात प्रत्येकजण सहभागी होतो. आणि खेळ म्हटलं की हार-जीत आलीच. ती स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. प्रेमाच्या या संवेदनशील भूमिकेत तुमचा अभिनय हा वाखणण्याजोगा असावा. प्रेम या शब्दाला लाजवेल अशी भूमिका तुमच्याकडून पार पाडली जावू नये. अर्थात हार पत्करण्याची वेळ आली तरी तुम्ही त्या जिंकणाऱ्याच्या वाट्यात तितकेच सहभागी असता. परंतु अशी हार पत्करण्याची त्यागी भावना प्रत्येकातचं असते असं नाही. मानवी जीवनात जन्मापासून तर अन्तापर्यंत एक निर्भेळ भावना जीवंत असते, ती म्हणजे कुणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं, आपलं दु:ख, यातना, वेदना आपण ज्याच्यासमोर मनमोकळेपणाने सांगू शकू अशी एकतरी व्यकनती आपल्याजवळ असावी. ही आंतरिक भावना प्रत्येकाच्या मनात सदैव असते. आपणही कुणावर तर प्रेम करावं ही भावना सुध्दा त्याचवेळी जन्म घेत असते. मग प्रत्येकाच्या जीवनात ही सुगंधी प्रेमाची दरवळ निर्माण होतेच, असं नसते. परंतु प्रत्येक जीव या आशेसह जीवन जगत असतो. हे मात्र खरे.
अशा असंख्य अशा, आकांक्षांसह चालताना त्या आशेची पूर्तता होईल याचाही भरवशा नसतो. कारण मानवी जीवनात नियतीनं ठरवून दिलेलनया रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला एकदा तरी ठेच लागलेली असतेच. म्हणूनच नियतीचं जे घडवलंय त्याचा स्वीकार करून जीवन जगण्याचंा प्रयत्न करावा.
खरं तर प्रेमाची व्यात्पी ही फक्त प्रियकर व प्रेयसी या दोघांपुरतीच मर्यादीत नसून ती एक वैश्विक संकल्पना आहे. पण आम्ही आई-वडिल, भाऊ, बहिण, या नात्यांपेक्षा या नात्याला अधिक जवळ केलंय. वीस वर्ष आईच्या कुशीत विसावणाऱ्या या पाखराला उडण्याचं सामर्थ्य निर्माण झाल्यावर ते कधी भरकटत ते त्यालाही त्याचं कळत नसावं. ते वयंच तसं नसतं तर मनानं घेतलेली भरारी असते ती. हे नातं खुप सुंदर असतं. पण ते सुंदररितीने जगताही यायला हवं. कारण या वयात भरकटत जाणारी विचलीत मनांची अवस्था जिणं मुश्किल करते. प्रेमात तुम्ही नेहमीच विजयी व्हालच असं नाही. तुम्हाला हारही पत्करावी लागेल. कारण जीवनाच्या या खडतर प्रवासात तुमच अवस्था समुद्रप्रवासात असणाऱ्या दिशाहीन जहाजासारखी असते. हे जहाजाला दीशा देण्याचं महत्वाचं काम तुम्हाला पार पाडायचं असतं. अन्यथा दिशाहीन होण्याची भिती अधिक असेल. प्रेम करणं हे पाप नाही. पण यात जबरदस्ती, आसक्ती असू नये. हे दोन मनाचं मिलन आहे. अशा या प्रेमाची पवित्रता प्रत्येकाने जपावी.नाहीतर जीवन हे जगणं खरच मुश्किल होवून जाईल. आज प्रत्येकाचे जीवन जगण्याचे संदर्भ बदलले असले तरी प्रेमाचं पावित्र्य जिथं जोपासल जातं तिथं जीवन हे सुखानं जगणं अगदी सोपं होवून जातं.

Wednesday, June 23, 2010

ग्लॅमरचं भूत ऊतरणार कसे?

मुलींनी घट्ट व तोकडे कपडे घालू नये, अशी मागणी एकीकडे होत असते तर त्याचवेळी अनेक पालक स्वत:च मुलीला जीन्स, आखूड टॉप वगैरे कपडे पुरवून तिला ‘स्मार्टङ्क लुक देत असतात. एकीकडे मुलींसाठी ड्रेस कोड हवा, अशी मागणी काही संस्था - पक्ष करत असतात आणि दुसरीकडे शाळकरी मुलीही रेकॉर्ड डान्सच्या नावाखाली तंग कपडे घालून अचकट विचकट हावभावाची नृत्ये करतात. एकीकडे तरुणींनी आरोग्य जपायलाच हवे, असा विचार मांडला जात असतो आणि त्याचवेळी नवतरुणी ‘वाईन आणि बीअरङ्क च्या बाटल्या रीचवित असतात, रात्री-अपरात्री फिरत असतात, नको त्या अवस्थेत धिंगाणा घालतात, असा विरोधाभास का? तरुणींनी सर्व नीतिसंकेत उधळून लावले तरी समजू शकते; पण पालकही त्याला मूक संमती का देत आहेत? आजच्या तरुणींची फॅशन ही पुरुषी कामवासना उत्तेजित करण्यासाठी पूरक आहे, हे पालकांनाही समजत असते. तरीही ते स्वत:च्या मुलीकडे कानाडोळा का करतात? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे... आणि ते म्हणजे आजच्या तरुणींप्रमाणेच पालकांनाही ग्लॅमरसचं वेड लागलेलं आहे.

आजच्या तीव्र स्पर्धेच्या जगात आपल्या मुलीने टिकून रहायचे असेल तर ती ग्लॅमरस, मॉड दिसायला हवी असं पालकच म्हणायला लागले आहेत. या पालकांच्या डोळ्यात अजंन घालतील अशा काही घटना घडल्या आहेत. तरीही सर्वजण या मोहजालात फसतात. प्रीती जैन या नवोदित मॉडेलने ग्लॅमरच्या नादात शरीराचा सौदा कसा करावा लागतो हे जाहीर केले. नफिसा जोसेफ या भारतसुंदरी किताब मिळविलेल्या मॉडेलनी ग्लॅमर दुनियेत वैफल्य आल्याने आत्महत्या केलीे. या सगळ्या घटना घडत असताना त्याचवेळीस अमिषा पटेलने वडिलांवर फिर्याद दाखल केली! तरी बरं तिच्या वडिलांनीच पैसे खर्च करुन तिचं करियर घडवलं होतं. त्यानंतरही अनेकदा ग्लॅमरच्या नादापायी अनेक मुलींना फसवण्यात आले. तरीही आमचे डोळे उघडत नाही याला काय म्हणावे? गल्लीबोळात चालणारे सिनेसंगीतांवर आधारलेल्या नाचांचे क्लास काय सांगतात? आपली मुलगी जे करु पाहते ते अनैतिक आहे असं जर वडिलांना वाटत असेल आणि आईला वाटत नसेल व दोन्ही बाजू परस्परांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकत नसतील तर अशा शोकांतिका होत राहतील; पण त्याबद्दल जर समुपदेशकाचा आधार घेतला असता तर मुलींनी त्याचे गांभीर्य कळून तिचे मत बदलले असते, सावधपणे काम करायचं आश्वासन दिले असते. या पलीकडे त्या मुलीने ते करायचं ठरविलं तर जीव घेऊन आणि देऊन काही साध्य करता येईल का?
पालकांची यात कोंडी नक्कीच होते. त्यावर जुने आणि नवे यातील बंधनं असतात. प्रतिष्ठेचा काच असतो. त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. अजून मुलांच्या वागण्याच्या परिणामाचे खापर पालकांच्या माथी मारलेच जाते. मध्यमवर्गीय पालक तसा फारसा खंबीर नसतो. त्याला त्याच समाजात रहायचे असते. एका विशिष्ट स्तरावरचा समाज बदललेला असला तरी कुटुंबीयांचे शेरे, टीका सहन कराव्या लागतील. याची खरी वा काल्पनिक दहशत मनावर असते. एका मॉडेल आणि नवोदित अभिनेत्रीनं आपल्यावर बलात्कार झाला आणि पिळवणूक झाल्याचा आरोप केला. या क्षेत्रात गेलेल्या मुलींना अनेकदा अशा बाबींना तोंड द्यावे लागते. हे इतर ऑफिसेसमध्ये होत असते, असे म्हणून त्याकडे कानाडोळा करण्यागत नसते. इथं मुली असुरक्षित असतात नोकरीप्रमाणे त्यांच्याभोवती संस्थेचे सुरक्षाकवचही नसते, कामाची खात्री नसते. पैसा, प्रसिद्धी इत्यादी सर्वच बाबतीत त्या इतरांवर अवलंबून असतात. हे असंच असते आणि ते मान्य करुन चालावे असे म्हणणारेही आहेत. हे प्रकार होण्याजोगे वातावरण आणि मोकळेपणा तिथे असतो जो इतरत्र असतोच असे नाही. अनेकदा मुलींनाही त्याचा मोह पडतो. पुढे जाण्याचा सोपा मार्ग वाटतो; पण तो तसा असेलच याची हमी नसते. मग प्रेमभंग, वचनभंग असले प्रकार होतात आणि भावनेच्या भरात मुली यातून सुटका म्हणजे मृत्यू जवळ करतात. त्यांचे मानसिक स्वास्थ्य नीट रहावे, यासाठी व्यावसायिक पातळीवर काहीही उपलब्ध नसते. अनेकदा इथे जंगलराज असते. ‘बळी तो कानपिळीङ्क या बाबी भावनेच्या भरात होतात. त्यामुळे त्यांना योग्य क्षणी आधार मिळाला तर ती मंडळी सावरु शकतात असे मानसतज्ज्ञ म्हणतात. ग्लॅमरचं अवास्तव वेड आज सर्वत्र आजाराप्रमाणे पसरत आहे. जगण्याची qझग त्यातूनच मिळेल, या भाबड्या कल्पनेने तरुण त्यांच्याकडे ओढले जातात आणि हळवे जीव अपयशाला घाबरुन, निराश होऊन, अकाली जीवन संपवतात, कुटुंबातील प्रेम आधार हा अटींवर नसेल तर काही जीव सावरतील, तरुणाईचा जोष आणि पालकांची द्विधा मन:स्थितीतील कुतरओढ यातून हे भीषण अपराध होताना दिसताहेत.
अगदी स्पष्ट बोलायचे झाले तर अशा घटनांंसाठी पालक स्वत: पहिले जबाबदार आहेत. विशेषत: मध्यमवर्गीय पालकांची जी सध्याची मानसिक अवस्था आहे. ती सर्व पालकही त्याला पूरक ठरतात. पालकांचे वय, अनुभव, समाज निरीक्षण, क्षमता व भलेबुरे ठरविण्याची दृष्टी या गोष्टी जमेस धरल्या तर त्यांनी ग्लॅमरस रुपाचा विराध करायला हवा; पण हल्ली मध्यमवर्गीय पालकांना उच्च वर्गीय, श्रीमंताचे आकर्षण वाटते. उच्च वर्गीयांप्रमाणेच आपणही युरोपीय संस्कृती स्वीकारावी, असे सुप्त आकर्षण त्यांच्या मनात असते.
गाड्या, मोबाईल, इंटरनेट, परदेश प्रवास, अशा सुखसंपन्नतेने जीवनात qझग चढावी असे वाटत असते. सर्व श्रीमंती तर प्रत्यक्षात उतरविता येत नाही; पण निदान मुलींनी मॉड व्हावं, इग्लिश भाषेसह आधुनिक जीवनशैली स्वीकारावी, याला ते होकार देतात. घरातल्या मुलानं व मुलीनं नेटवर तासंतास चॅqटग केले qकवा मुलीने फिगर मेंटेन केली तर ती स्मार्ट झाली आहे असा ते अर्थ लावतात. हा फार मोठा सामाजिक घात आहे. समाजावर अंकुश ठेवणारा मध्यवर्गीय असा बेताल बनतोय. जोवर मध्यमवर्गीय पालक नवतरुण वर्गावर नियंत्रण ठेवत नाही तोवर प्रीती जैन qकवा नफिसासारखी प्रकरणे पाहात रहावी लागतील. पूर्वी अशी प्रकरणे युरोपादी देशात व्हायची, त्यातून होणाèया हत्याआत्महत्या, त्यातले छुपे संबंध यालाही ग्लॅमर प्राप्त व्हायचे आता तसला प्रकार आपल्या मध्यमवर्गात व्हायला लागला आहे. ग्लॅमरचे भूत आमच्याही मानगुटीवर बसलंय हे ग्लॅमरचं भूत उतरणार कसे?

अपयशातून मिळणारं यश अधिक समाधानकारक

अपयश ही यशाची पहिली पायरी होय. अपयश म्हणजे आपल्यातील उणिवा ओळखण्यासाठी आलेली संधी; त्याचप्रमाणे आपल्या चुका सुधारण्याची संधी असते. परीक्षेत अपयश आल्याने अथवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने अनेक विद्याथ्र्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. काहीवेळा या नैराश्येच्या पोटी विद्यार्थी आत्तहत्याही करतात. आजकाल अशा प्रकारच्या घटना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागची कारणे आणि उपाय या संबंधी विचार होणे आवश्यक आहे.
अपयश आल्यानंतर सारं काही व्यर्थच आहे असा नकारात्मक विचार नैराश्यमागील प्रमुख कारण असलं तरी अशा नकारात्मक विचार वाढीस अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आज आपल्याकडे परीक्षांना अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. यामागे पालकांची मानसिकता महत्वाची असते. कारण यांच्या मत आपल्या मुलाने केवळ परीक्षा निव्वळ पास होणे एवढेच यांच्यासाठी महत्वाचे नसते तर त्याने अधिकाधिक गुण मिळवणं महत्वाचं असतं. त्यांनी ही मानसिकता जपणं गैर नाही. कारण आज उत्तम गुण म्हणजे उत्तम नोकरी, व्यवसाय, मग पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा असे एक समीकरणच तयार झाले आहे. त्यातच पाल्याच्या क्षमतेचा, कुवतीच्या विचार मात्र पालकांकडून केला जात नाही. उलट अनेक खासगी क्लासेस, टेस्ट सिरीज, पुस्तके यांचा भडीमार केला जातो. त्यामुळे त्याची होणारी शारीरिक मानसिक ओढाताण याकडे फारसे लक्ष न देता परीक्षेत उत्तम गुण मिळविणे आवश्यक आहे हेच त्यांच्या मनावर बिंबवले जाते.
पालक नेहमीच आपल्या पाल्याला हे वर्ष तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे कायम मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात पालक आपली समाजात प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सारं करत असले तरी शेवटी पाल्याचं यश हे त्याच्या सुखी आयुष्याची तिजोरी असते. ती भरण्याचाच पालकांकडून प्रयत्न होत असतो. पण ती भरताना आपण कोणता मार्ग अवलंबतोय याचाही विचार करणं गरजेचं आहे. बèयाचवेळा मार्ग चुकतात आणि मग यशाऐवजी अपयश पदरात पडतं. हे अपयश पचवणं पालकांना सहज शक्य नसतं आणि मग मुलांमध्ये नैराश्य येतं. यासाठी सामाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कारण पाल्यास पालकांची, समाजाची भिती असते. ही भिती काढून पालक व पाल्य यांच्यातील संबंध अधिक मोकळे होणे, गरजेचे आहे.
शैक्षणिक यश अपयश आणि जीवनातील यश अपयश यामध्ये फरक आहे. तुमचे अपयशच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवेल. कारण अपयश म्हणजे आपल्यातील कमतरता ओळखण्यासाठी आलेली संधी. अपयशातून मिळालेल्या यशानं ज्यांच्या पायाजवळ लोळण घेतलंय अशा अनेक व्यक्ती आपल्याकडे होवून गेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे एडमंड हिलरी. परंतु या शिखरावर चढताना अनेकवेळा अपयश आलेल्या एडमंड हिलरी यांनी हिमालयाच्या शिखराला उद्देशून म्हटले होते, तू माझा पराभव केलास, मी पुन्हा येईन व तुझ्यावर विजय मिळवेने. आणि अपयशातून मिळालेले हे यश अधिक समाधानकारक होते.

Tuesday, June 22, 2010

आजची आधुनिकता आणि ग्लॅमर

सध्या सगळीकडे आधुनिक बनण्याची लाट आली आहे. उद्योग व्यवसायापासून ते बालवाडीपर्यंत, पाककलेपासून ते वास्तुनिर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता शिरली आह े. आधुनिकता नेहमीच स्वीकारार्ह असते, असायला हवी. पण जुनं सोडून नव्याचा अवलंब करणे योग्य नाही. नव्याचा स्विकार करणे गैर नाही. पण त्याचं अंधानुकर होतंय. त्यामुळे त्याचे परिणामही भोगावे लागत आहेत. कारण आधुनिकतेच्या ध्यासापायी आपण काय करतो आहोत याचं भान या तरूणांना राहिलेलंच नाही. भारतीय परंपरा, संस्कृती विचारमूल्ये यां सगळ्यापासून आजचा समाज दुरावतोय. अर्थात या आधुनिकतेचे आघात आपल्या परंपरेवर, संस्कृतीवर होताना दिसत आहेत.
ही आधुनिकता कितपत योग्य की अयोग्य हे ठरवायचं नाही. आज संपूर्ण जग ग्लमरस स्वीकारतेय. आणि म्हणून आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्यामुलीने टिकून राहायचे असेल तर ती ग्लॅमरस दिसायला हवी असं पालकांचेच एक मत तयार झालंय. पण ग्लॅमरसच्या दुनियेत नुसताच वरवरचा झगमगाट आहे आत सगळाच अंधार. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. प्रीती जैन या मॉडेलनने ग्लॅमरच्या नादात शरीराचा सौदा कसा करावा लागतो हे जाहीर केले. नफिसा जोसेच या भारतसुंदरी किताब मिळविलेल्या मॉडेलनी ग्लॅमर दुनियेत वैफल्य आल्याने आत्महत्या केल्याचेही उघडकीस आले आहे. या उदाहरणांनी तुम्ही आजचं ग्लॅमर कितपत स्वीकारायचं याचा विचार करायला हवा. अर्थात आजकाल लहान मुले-मुलीही ज्या प्रकारच्या गाण्यांवर अचकट विचकट अंगविक्षेप करत नाचत असतात आणि त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या भावनांचा अविष्कार करत असतात. नको त्या भावना दर्शविताना ते सारे विकृत वाटते. बुगी वूगी या कार्यक्रमाचा होस्ट बेहेल याच्याकडूनही अनेकदा लहान मुलांनी वयाला शोभेल असेच नृत्य करावे अशा अनेकदा सुचना दिल्या आहेत. पण तरीही चार वर्षाची मुलगी दिल धक धक करने लगा या गाण्यावरच नृत्य करताना दिसते. अर्थात याचा दोष आजच्या पालकांनाच द्यावा लागेल. अर्थात पालकांच्या उत्तेजनाने ही मुलं वागतात यात वादच नाही. आईवडिलांनी मुलांच्या कलेला जाणायला हवंय. पण ते मर्यादा पाळून. पण बऱ्याचदा आपली मुलगी जे करू पाहते ते अनैतिक आहे असं जर वडिलांना वाटत असेल आणि आईला वाटत नसेल तर , एका विशिष्ट स्तरावरचा समाज बदललेला असला तरी कुटुंबीयांचे शेरे, टीका सहन करावे लागतात.

Saturday, May 22, 2010

गृहिणींमध्ये जागृती घडवायलाच हवी!

"जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उध्दारी' अशी एक फार जुनी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे अशी व्यक्ती म्हणजेच अर्थातच स्त्री या जगाच्या उध्दारास कारणीभूत ठरू शकते.

मुलाच्या जन्मापासून म्हणजेच लहानपणापासून ती त्या मुलावर चांगले संस्कार करीत असते. मुलांना चांगले वळण लागावे म्हणून ती अतिशय झटत असते. पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया अर्थार्जनासाठी क्वचितच घराबाहेर पडत असत, तेव्हा त्यांना आपल्या घराकडे व मुलांकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळत असे. त्या वेळेचा फायदा घेऊन त्या आपल्या जबाबदाऱ्याही अत्यंत उत्तम रीतीने पार पाडत असत. पण काळ बदलला. परिस्थिती बदलली. स्त्री सुध्दा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करू लागली. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनात कमावत्या स्त्रीला आपल्या घराकडे, नवऱ्याकडे, मुलांकडे लक्ष द्यायला फारच कमी वेळ मिळतो. ही वस्तुस्थिती आहे.तसेच बदलत्या काळानुसार स्त्रीची मानसिकताही बरीच बदलली आहे. संसाराच्या या रामरगाड्यात तर काही जणींना आपल्या या मुलभूत जबाबदारीचाच विसर पडल्यासारखे झाले आहे. मग घरावर संस्कार करणाऱ्या स्त्रीचे मनच अशांत व अस्थिर असेल तर त्या घरावर संस्कार तरी कोण करणार आणि त्या घराचा विकास तरी कसा होणार?

Tuesday, March 16, 2010

"गुढीपाडवा' मांगल्याचा, संकल्प करण्याचा!

ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाचा वाढदिवस, नववर्ष हा गुढीपाडव्याला साजरा करण्यात येतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील पहिला सण मानला जातो. हिंदू संस्कृतीत या दिवसाला फार मोठे महत्त्व आहे. इतिहासातील अनेक दाखले यासाठी पुराव्यादाखल देता येतील. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य करून त्यांच्यात जीव भरला आणि शत्रूचा पाडाव केला. म्हणजेच मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, निर्जीव, दुर्बल झालेल्या समाजामध्ये नवचैतन्य, स्वाभिमान, अस्मिता जागृत करून त्यांनी शत्रूला नामोहरण केले. आणखी एका गोष्टीत असे म्हटले आहे की, शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेला मुक्त केले. या विजयाप्रित्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला सुरूवात झाली. ज्यांनी विजय मिळवता. तो "शालिवाहन' आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते "शक' असे दोघांचाही अंतर्भाव यामध्ये करण्यात आला. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या दुष्ट राक्षसांचा पराभव केला. त्या प्रभू रामचंद्रांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला अयोध्येत प्रवेश केला. त्या दिवशी जनतेने प्रभू रामचंद्र आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारोदारी गुढी-तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. ही परंपरा तेव्हापासून सुरू आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावी. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे किंवा भगवे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर तांबे किंवा स्टिलचा तांब्या लटकवून तयार केलेली गुढी दारासमोर उभी करावी. हल्ली शहरांमधील उत्तुंग इमारतीत रहाणाऱ्यांनी घरासमोरील बाल्कनीत सर्वांना दिसेल अशी बांधावी. या पवित्र गुढीची पुजा करावी. नेवैद्य म्हणून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यामध्ये जिरे, मिरी, हिंग, सैधव व ओवा इत्यादी घालून हे मिश्रण चांगले वाटून घरातील आणि शेजाऱ्यांना थोडे-थोडे वाटावे. त्यानंतरच गोड-धोड खावे. त्यानंतर या मुहूर्ताच्या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा. नववर्षाचा हा पहिला दिवस गुढी आकाशात उभारून दिमाखाने साजरा करावा...
प्रथम दिवस हा नववर्षाचा

पावित्र्याचा मंगलतेचा

संकल्पचि करू भावभक्तीने

सत्कर्माचि नित करण्याचा

जे जे वाईट हातून घडले

विसरून जाऊ ते ते सारे

येथून पुढती अखंडतेने

मनी रंगवू उच्च मनोरे

बंधुत्वाचा येथून पुढती

दीप पेटवू आपुलकीने

...गुढीपाडवा या सणाचे महत्व कवी म. पा. भावे यांनी आपल्या कवितेत सुरेखरित्या शब्दबद्ध केले आहे. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृती हा मोठा अमूल्य ठेवा आहे. यामागे फार मोठी प्राचीन परंपरा आहे. ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या या सृष्टीच्या निर्मितीचा दिवस आनंदात साजरा व्हायला हवा. याच सुमारास निसर्गसृष्टीसुद्धा जुन्या, अनावश्यक गोष्टींचा त्याग करून नव्या गोष्टींचे उदार मनाने स्वागत करते. कोवळ्या पालवीचे मनोहर रूप धारण करते. यातूनच आपण बोध घ्यायला हवा.

जुने हेवे-दावे सोडून खुल्या मनाने नव्याचा स्वीकार केल्यास आपल्या आयुष्यातही नव्या आशा, आकांक्षाचे धुमारे फुटतील. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न केल्यास जीवनाला नवी दिशा प्राप्त होईल. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मागील वर्षी जी काही चांगली किंवा वाईट कामे केली त्याचे स्मरण करून वाईट विचार, भावनांचा त्याग करायचा आणि नववर्षाच्या निमित्ताने नवा संकल्प करून नव्याने सुरूवात करायची. अशा या पावित्र्याच्या, मांगल्याच्या आणि सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपणही दिमाखात साजरा करू या! आकाशात विजयपताकांची गुढीची रांगच रांग दिसू द्या! सातासमुद्रापार पोहोचलेल्या आपल्या सर्व हिंदू बांधवांनी मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाच्या आणि शिवरायांच्या भगव्या झेड्यांची ही पवित्र गुढी आकाशात उभारून नववर्षानिमित्त चांगला संकल्प करू या! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, October 1, 2009

लोकप्रतिनिधी आणि आम्ही

तिकीट वाटपात गोंधळ, श्रेष्ठींचे राजकारण, पक्षबदल, घराणेशाही आणि विधानसभा निवडणूका जाहीर होताच सर्वच पक्षांची उमेदवारी घोषित करताना झालेली दमछाक सर्वांनीच पाहिली. उमेदवारी मिळविण्यासाठी आपले नेते किती लाचार होतात हे ही या निमित्ताने दिसून आले. कॉंग्रेसमध्ये नाराजी, राष्ट्रवादीत असंतोष, शिवसेना-मनसेत फाटाफूट, भाजपमधून राजीनामे, तिसऱ्या आघाडीत फूट, कॉंग्रेसला रामराम, संताप, धुसफूस, विश्वासघात, पैसे खाऊन तिकिटांचे वाटप, सभा घ्यायला पैसे नाहीत म्हणून तिकिट नाकारले, पक्षश्रेष्ठांना तिलांजली देऊन अपक्ष म्हणून बंडखोरी- हे सर्व कशासाठी? कोणाचाच कोणावर विश्वास नाही. कोणावरही निष्ठा नाही ना आपल्या पक्षावर, ना आपल्या नेत्यांवर, तिकीट मिळेपर्यंत ज्यांचा आदरणीय म्हणून उल्लेख केला जातो तेच तिकीट दुसऱ्याला मिळाले की आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. दुसऱ्या पक्षात जाण्याच्या घोषणा करतात. तिकडेही काही नवीन नाही परंतु नव्याने येणाऱ्यांना आरतीने ओवळतात. तिकिट देतात. मग पुन्हा तिकडेही काही नवीन नाही परंतु नव्याने येणाऱ्यांना आरतीने ओवाळतात. तिकीट देतात. मग पुन्हा तिकडेही जुने निष्ठावंत बंड करणारच. सगळा प्रकार किळसवाणा.
जनतेची सेवा करण्याचे तोंडाने बोलायचे आणि मनाने सत्तेसाठी, तिकिटासाठी वरिष्ठांचे पाय चेपायचे असले घाणेरडे प्रकार घडत असतानाही आम्ही पांढरपेशे मतदार फक्त तमाशा पहाण्याचेच काम करतो. सालाबादप्रमाणे 40.45 टक्के मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार, बाकीची मंडळी सुट्टी मिळाली म्हणून पिकनिकला जाणार, थोडक्यात, पैसे वाटून मतदार विकत घेऊन पुढारी आमदार होतात. पैशाच्या बळावर सत्तेवर येतात. या सगळ्या प्रकाराला आपणच जबाबदार असतो, हे कटू सत्य आहे. परंतू ते स्विकारण्याचे धाडस मात्र कोणीही करत नाही. नंतर मात्र या नेत्यांच्या नावाने उगाचच फालतू चर्चा करण्यात दिवस घालवतो. आपला लोकप्रतिनिध कसा आहे, तो काय करतो, त्याच्याकडे नवनवीन गाड्या, बंगले कसे येतात हे उघड गुपित असले तरीही आम्ही डोळे झाकून त्यांनाच निवडून देतो.
विकास म्हणजे काय? शहर असो की गाव, सर्व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे काम केले तर 5.10 वर्षात त्या भागाचा कायापालट नक्की होऊ शकतो. परंतु निवडून गेलेला कुठलाही लोकप्रतिनिधी नियोजनपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करीत नाही. स्वतःच्या पोटा-पाण्याची, पेटारे भरण्याची कामे करण्यातच ते मग्न असतात. हे पूर्वापार चालत आले आहे. विकास होण्यासाठी लोकप्रितिनिधी हा अभ्यासू आणि प्रामाणिक असावा लागतो. परंतु सध्याचे चित्र काय सांगते? प्रत्येकजण पैसा कमावण्यातच दंग आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सामिल होतात. त्यांच्याशी संगनमत करून विकासाच्या योजना कागदावरच रंगवून स्वतःचे स्वार्थ पहातात. अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार करतात. ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांना "लुटण्याचे' साधन मानतात, प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी हेच लोकप्रितिनिधी "दलाली' घेतात. संतत्प मतदारही त्यांच्याशी संबंध तोडतात. परंतु पुन्हा नव्याने येणारसुद्धा त्याच जातकुळीतला असतो. त्यामुळे थंड डोक्याच्या आणि निद्रिस्त जनतेचा गैरफायदा उठवत लोकप्रतिनधी मनमानी कारभार करतात. आम्हाला प्यायला पाणी नाही, रस्त्यांची सोय नाही, शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. वीजेची टंचाई भेडसावते आहे. रोजगार नाही, बेकारी वाढते आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे तरीही या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची हिम्मत आम्हाला होत नाही, अशाने आमचा विकास होणार कसा? त्यांना जाब विचारणारा कोणीही नाही म्हणूनच निवडणूकीचा तमाशा सर्वजण पहात आहेत. त्याची हवी ती मनमानी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत रहायला हवे. कोणत्याही आमिषाला, आश्वासनांना बळी न पडता, चांगल्या लोकप्रतिनिधीला मतदान करायला हवे एखाद्या विकासाच्या कामासाठी वारंवार त्या लोकप्रतिनिधींना भेटले पाहिजे. त्यांच्या डोक्यावर बसून प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन दबाव टाकून काम करून घेतले पाहिजे. ऐकत नसतील तर त्यांच्याविरोधात वृत्तपत्रांकडे धाव घेतली पाहिजे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली समस्या आपणच सोडविली पाहिजे. अन्यथा आपण असेच खितपत पडून रहाणार! आपण नक्की काय करायचे हे ठरविण्याची वेळ आता आलेली आहे. निवडणूकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी दारोदार फिरत आहेत.
त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न तरी करा, यश नक्की मिळेल.

डावपेच निवडणुकीचे

"कॉंग्रेस का हाथ, आम आदमी के साथ' अशी जरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा असली तरी गेल्या 10 वर्षांत जो अजेंडा झाला तोच पुढे चालू राहणार आहे, हेच सत्य आहे. या अजेंड्यात फक्त मंत्री-संत्रीच पोट भरताहेत. खाजगीकरण, टोलमार्गे लूट आणि बिल्डरांसाठी पायघड्या घालून जो-तो खोऱ्याने पैसा ओढतो आहे. मुंबईत घुसलेले परप्रांतीय उलट-सुलट पुरावे बनवून फुकटात फ्लॅटधारक बनत आहेत. त्याच मुंबईतील मराठी माणसाला देशोधडीला लावले जात आहे. 35-40 वर्षे उलटल्यानंतरही मराठी माणसाला निवारा शिबिरात वास्तव्य करावे लागत आहे. या मराठी माणसाच्या न्याय-हक्कांसाठी आता मनसेचे राज ठाकरे लढाईसाठी सज्ज झाले आहेत. मुंबईतील महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्या महापालिकेतील जवळजवळ शंभर टक्के कंत्राटदार अमराठी आहेत. असे असताना प्रत्येक राजकारणी स्वत:चे स्वार्थ पहात स्वस्थ बसला आहे. बदमाश व्यापारी, दलाल, सरकारी कर्मचारी आणि सत्तारूढ पक्ष यांच्या साटेलोट्यांमुळे सर्वसामान्य जनता मात्र विविध प्रश्र्नांनी त्रस्त आहे.
मराठी माणूस तत्त्वाला पक्का, त्यामुळे शिवाजी महाराजांचे तोंड कोणत्या दिशेला असावे, पुतळा मराठी माणसाने करावा की मलेशियन; शहराचे नाव औरंगाबाद असावे की संभाजीनगर; पुलाला नाव कोणाचे द्यावे- राजीव गांधींचे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येथपासून "भैय्यांनी पाणीपुरी विकावी की भाऊंनी, आणि शिववडा-पाव असे नाव सेनेच्या मराठी बर्गरला द्यावे की नाही' या व अशा अस्मितेच्या प्रश्नांनी महाराष्ट्राला कायम त्रस्त आणि व्यस्त ठेवलेले असते. त्यातच आता पक्षाने निवडलेला उमेदवार लायक की तिकीट डावललेला यावरून वाद सु रु आहेत. तिकीट डावललेले हे सर्वजण बंडखोर म्हणून आपली अपक्ष उमेदवारी जाहीर करतील. त्यापैकी काहीजण या दोन-चार दिवसांत मांडवली करून, आपल्या ताकदीनुसार पेट्या, खोके घेऊन उमेदवारी मागे घेतील. पण काही बंडखोर रिंगणात राहतीलच. म्हणजे आखाड़यात साधारणपणे पाच ते सहा हजार उमेदवार असतील. त्यामुळे यावेळी निवडणुका होणार नाहीत तर पाडवणुका होतील. काहींना तर आपण निवडून येण्यापेक्षाही कोणाला तरी पाडण्यातच अधिक आनंद असेल. सर्वचजण स्वत: निवडून येण्याऐवजी दुसऱ्याला पाडण्यासाठी उभे असतील तर कोण निवडून येईल, हे सांगणे अतिशय कठीण आहे. काही वेळा तर इतर पक्षांमधले बंडखोरच आपापसात एकजूट करतात आणि मुख्य उमेदवाराला धूळ चारतात. कोणत्याही उमेदवाराचा पराभव हा त्याच्याच पक्षातले तिसऱ्या- चौथ्या- पाचव्या फळीतले कार्यकर्ते करतात. ते वरकरणी काम करतात अधिकृत उमेदवाराचे; किंबहुना अधिकृत उमेदवाराकडूनच ते एअरकंडिशन्ड गाड्या, पेट्रोल, जेवणखाणाचे (पिण्याचे!) पैसे व इतर खर्च घेतात आणि काम बंडखोराचे करतात. कित्येक उमेदवारांना तर कुठून आणि कशासाठी उभे राहिलो असे वाटू लागते. श्रेष्टींची लाचारी करून, त्यांच्या बॅगा उचलून वा पोचवून, तथाकथित कार्यकर्त्यांची सर्व प्रकारची चैन सांभाळून, पत्रकारांपुढे लाळ घोटून, स्वत:चे लक्षावधी (कोट़यवधी!) रुपये या जुगारात लावून, सर्व बंडखोरांना नामोहरम करून, एकदा आमदार म्हणून निवडून आले की लगेच पुढच्या फिल्ंिडगची तयारी सुरू करावी लागते. जर आपल्या आघाडीचे सरकार आले तर मंत्रीपदासाठी क्षेत्ररक्षण करायचे असते. मंत्री होण्याच्या यादीत नाव आलेच तर किफायतशीर खाते मिळविण्यासाठी पुन्हा श्रेष्टींच्यापुढे लाळघोटेपणा करा वगैरे वगैरे. निवडणूक खर्चाची अधिकृत मर्यादा कितीही असो, प्रत्यक्षातला प्रत्येक उमेदवाराचा खर्च हल्ली पाच ते सात कोटी रुपयांच्या आसपास जातो. हा सर्व खर्च प्रथम आमदार आणि नंतर मंत्री झाल्याशिवाय रिकव्हर करता येत नाही. किंबहुना या धंद्यात प्रथम गुंतवणूक आणि नंतर वसुली असल्यामुळे, बहुतेक राजकारणी लोक त्या गुंतवणुकीसाठी ज्याच्या हातात, जी काही सत्तेची सूत्रे असतील, ती वापरून पैशाच्या खाणी खोदायला सुरुवात झालेली असते. भूखंड काबीज करणे, त्या ठिकाणी टॉवर्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स उभे करणे, त्यासाठी डी. सी. रुल्स पाहिजे तसे वाकविणे, विशेष एफएसआय घोषित करणे, टीडीआर देणे, अशा इमारती बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्‌स) मिळविणे, हे करताना आयएएस अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व गोष्ठींना कायदेशीर रुप येईल. हे पाहणे, मंत्रालय, महापालिका इत्यादी कर्मचाऱ्यांच्या संसारिक गरजा भागविणे, मीडियातील प्रतिमा सांभाळणे, बातम्या मॅनेज करणे, प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात बातम्या प्रसृत करणे, सर्व टीव्ही चॅनल्सवरती आपली अनुकूल छबी येईल हे पाहणे हे सर्व अगोदरच सुरू झालेले असते. त्यामुळे निवडणूक पुढील महिन्यात होणार असली तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी आपापली सत्ताकेंद्रे वापरून निवडणूक खर्चाची तयारी तीन-चार वर्षांत पूर्ण केलीच होती. अपक्ष वा बंडखोर, मनसे वा तिसऱ्या आघाडीतील उमेदवारांना वसुलीची संधी तेवढ़या प्रमाणात मिळालेली नसते. म्हणूनच तर अधिकृत उमेदवारांना पाडण्यासाठी या सर्व राखीव फौजेचा उपयोग होतो. साहजिकच या इतर पक्षातल्या उमेदवारांच्या व बंडखोरांच्या निवडणुकीचा खर्च प्रस्थापित पक्ष वा स्वत: उमेदवार करतात. त्यामुळे बंडखोरांचे खिसेही रिकामे नसतातच. शिवाय निवडून आलेल्या बंडखोराची किंमत सरकार बनविताना कितीतरी वाढते.म्हणुनच आता बंडखोरांचे लक्ष विचलीत करुन शहरी मतदारांभोवती फासे कसे टाकायचे, याचे डावपेच धूर्त राजकारणी आखू लागले आहेत. आकाशाला भिडणाऱ्या जमिनीच्या किंमतींमुळे भूखंडांचे श्रीखंड खाण्यापुरतेच शहरांकडे लक्ष देणाऱ्यांना वरकरणी का होईना शहरी जनतेप्रती कळवळा दाखवावा लागणार आहे. याचे कारण शहरी मतदारसंघांची लक्षणीयरीत्या वाढलेली संख्या. राज्यातील नागरीकरणात वाढ झाल्याने साहजिकच नागरी भागांतील मतदारसंघांची संख्या वाढणारच होती. राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी शहरी-अर्धशहरी अशा जागांची संख्या शंभरवरून एकशेतीसपर्यंत वाढली आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेली मुंबानगरी, तिची उपनगरे आणि ठाणे परिसरातील मतदारसंघांची संख्या सत्तेचाळीसवरून साठपर्यंत गेली. पुणे आणि औरंगाबाद जिल्दॄयांतील मतदारसंघांची संख्या प्रत्येकी तीनने वाढून अनुक्रमे एकवीस आणि नऊ झाली आहे. नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर या शहरांतील मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एकची भर पडली. शहरी मतदारसंघांमध्ये वाढ झाल्याने "शहरांचा विकास हाच आमचा ध्यास' यांसारखी घोषवाक्ये राजकीय नेत्यांच्या तोंडी खेळू लागली. राज्यात प्रदीर्घ काळ कॉंग्रेस सत्तेवर आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसजनही पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसजनच असल्याने तेही प्रदीर्घ काळ सत्तेवर आहेत. भाजप-शिवसेना युतीही सुमारे साडेचार वर्षे सत्तेवर होती. त्यामुळे प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांनी सत्ता भोगली आहे. सत्तेवर कोणीही असो, नागरी भागांच्या मूलभूत समस्या सोडविण्याची आच आतापर्यंत कोणत्याही पक्षात दिसलेली नाही. या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केली ती थातूरमातूर आणि कामचलाऊ मलमपट्टी. निवडणुका तोंडावर येताच केवळ झोपडवासीयांना अभय देण्यापुरतीच कार्यक्षमता यांच्यामध्ये दिसली, झोपडपट्ट़यांच्या पुनर्वसनाची-त्या पुढील काळात होऊच नयेत यासाठी दूरगामी योजना आखण्याची आणि पार पाडण्याची कर्तबगारी त्यांनी कधीच दाखविली नाही. केवळ काही मर्यादित भागांतच नागरीकरणाचे केंद्रीकरण झाल्याने तेथे अनेक समस्या उभ्या ठाकल्या. बेरोजगारी, मर्यादित जागांमुळे जमिनींच्या भडकत्या किंमती आणि त्यातून निर्माण होणारे "भाई दादा', असे लॅंडमाफिया, पायाभूत सुविधांवरील वाढता ताण, घरांची चणचण आणि त्यातून वाढत जाणाऱ्या झोपडपट्टया, वाहतुकीची कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा अभाव, ढासळते पर्यावरण. याला जबाबदार राज्यकर्त्यांची नियोजनशून्यता, कळकळीचा अभाव आणि भ्रष्ठ वृत्ती. योग्य नगरनियोजन न झाल्याने शहरे "आडवी-तिडवी' अस्ताव्यस्त पसरली. शहरांचे-जिल्ह्यांचे नियोजन कागदावर तयार आहे, मात्र त्याची अंमलबजावणी कोणी करायची? सतत पैशांची चटक लागलेल्या राज्यकर्त्यांमुळे हे नियोजन केवळ फाईलबंदच राहिले. नियोजनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांचे नेमके काय काम असले पाहिजे, याची माहिती या समितीच्या सदस्यांना सोडाच, पण मंत्रिमंडळातील किती जणांना आहे? मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सारख्या मुख्य शहरांवर येऊन कोसळणारे लोंढे थोपविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणेही आवश्यक आहे. राज्याच्या विविध भागांत जाणीवपूर्वक उघोगधंदे उभारले गेले पाहिजेत, लहान आणि मध्यम शहरांची वाढही होण्यासाठी कृषी आधारित उद्योगांना चालना द्यायला हवी. त्यामुळेच नागरीकरणाचा समतोल विकास होईल. पुण्या-मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी या शहरांच्या आसपासच्या भागांचा नियोजनबद्ध विकास करण्याचीही गरज आहे. पण लक्षात घेतो कोण?

Wednesday, September 16, 2009

प्रलंबित खटले आणि मानव अधिकार

भारत स्वतंत्र झाला खरा, परंतु लोकशाहीच्या नावाने राज्य करताना गेल्या 60 वर्षात राजकारण्यांनी या देशाला श्रीमंत करण्याऐवजी अक्षरश: भिकेला लावले आहे. कायद्याचे राज्य म्हणत असताना याच कायद्यांची पायमल्ली राज्यकर्त्यांकडून होत आहे. विधिमंडळात बसून कायदे हवे तसे फिरवून फायदा कसा होईल, हेच पहात असल्याने देशात खरोखरच कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्र्न पडतो. भारतावर हल्ले करणारे अफजल गुरू, अजमल कसाबसारखे पाकिस्तानी अतिरेकी आजही रुबाबात जगताहेत. हजारो कोटी रुपयांचा चाराघोटाळा करणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह अनेक दिग्गज राजकारण्यांची शेकडो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आली. राष्ट्रवादीचे खासदार पद्‌मसिंह पाटलांना खूनप्रकरणी अटकही झाली. सीबीआयने चौकशी करून त्यांच्यावर खटलेही दाखल केले. परंतु कायद्यातील पळवाटा शोधून असल्या भ्रष्टाचारी राजकारण्यांवर खटले दाखल करायला मंजुरी मिळण्यासाठी 6-7 वर्षे लागतात. वर्षानुवर्षे सरकारच्या मंजुरीसाठी अशी प्रकरणे रेंगाळतात आणि पुढे न्यायालयात ती दाखल झाल्यावर, कायदेशीर पळवाटांचा लाभ घेत ही राजकारणी मंडळी वर्षांनुवर्षे ती लांबवतच राहतात. कनिष्ठ न्यायालय, वरिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशा खटल्यांची सुनावणी होऊन प्रत्येक ठिकाणी सुनावणीसाठी कायदेशीर खेळखंडोबा केला जातो. त्यातच न्यायालयांमध्ये न्यायाधिशांची संख्या अपुरी असल्याने देशभरात कोट्यवधी खटले लोंबकळत पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील उच्च न्यायालयांमधून 31 डिसेंबर 2008 पर्यंत 39, 14, 669 खटले प्रलंबित आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात 31 मार्च 2009 पर्यंत 50,163 खटले प्रलंबित होते. देशातील कनिष्ठ न्यायालयांमधून डिसेंबर 2008 पर्यंत प्रलंबित खटल्यांची संख्या 2, 64, 09, 011 इतकी होती. यामध्ये 1, 88, 69, 163 क्रिमिनल आणि 75,39, 845 सिविल खटले प्रलंबित आहेत. देशभरात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली नऊ हजारांच्या वर खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे हे असेच सुरू राहिल्यास 15-20 वर्षांनी संपूर्ण न्यायव्यवस्थाच कोलमडून पडण्याची शक्यता नव्हे धोक्याचा इशारा वारंवार ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी दिलेला आहे. मात्र कोणीही सदर प्रकार गांभीर्याने घेताना दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त संमेलनात पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी कायदे व न्याय मंत्रालयातील सुधारणांसाठी आराखडा तयार केला जात असल्याचे सांगितले. तसेच न्यायालयांमधील जवळजवळ 3000 खाली असलेल्या पदांवर तात्काळ भरती करण्याचेही आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की भारतातील प्रत्येक न्यायालयात 20 ते 25 टक्के न्यायिक पदे आजही खाली पडलेली आहेत. अशी भाषणबाजी पंतप्रधानांपासून ते राज्यातल्या मंत्र्यांपर्यंत सर्वच जण करतात. सर्व लोकप्रतिनिधीही चिंता व्यक्त करतात. पण प्रत्यक्षात कायदे कडक करण्याची कृती मात्र ते कधीही करत नाहीत. नेमक्या याच विसंगतीवर भारताचे मुख्य न्यायाधीश के.जी.बालकृष्णन यांनी बोट ठेवून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर ठपका ठेवला आहे. सत्तेच्या लोभासाठी सर्वच राजकीय पक्षांची सरकारे पैशाने गब्बर असलेल्या आरोपींना पाठीशी घालून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात. लोकहित विरोधी खेळ करतात. हे सर्व थांबायला हवे, अशा सर्वसामान्यांच्या भावनाच बालकृष्णन यांनी व्यक्त केल्या आहेत. तर देशातील न्यायालयांमधून वाढत चाललेल्या प्रलंबित खटल्यांची संख्या पाहून खुद्द भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. 5, 10 किंवा 15 वर्षांपर्यंत खटले चालणे हे नित्याचेच झाले असले, तरी काही प्रकरणांमध्ये मात्र 35 ते 40 वर्षे लागल्याचे निदर्शनास येत असल्याने ही अतिशय गंभीर बाब आहे. भारतातीलच अनेक तुरुंगामधून कैद्यांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. मध्यप्रदेशातील काही तुरुंगामधून कैदी आळीपाळीने झोपतात. म्हणजे एकाच वेळी झोपू शकतील इतकी जागासुद्धा येथे शिल्लक नाही. वर्षानुवर्षे चाललेल्या खटल्यांमधून कधीतरी आपली सुटका होईल, या आशेवर असलेले कैदी सुनावणी होण्यापूर्वीच मृत्यू पावतात. काहींचे मानसिक संतुलन बिघडते. याला जबाबदार कोण? सरकार आणि न्यायपालिका दोन्ही एक-दुसऱ्याकडे बोट दाखवून न्यायाधिशांची संख्या कमी असल्याचा डिंडोरा पिटतात. परंतु या प्रलंबित खटल्यांमुळे खरोखरच अपराधी असलेले बाहेर मोकाट फिरत आहेत. तर बिचारे निर्दोष, परंतु पैसा नसलेले सर्वसामान्य कैदी वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडलेले असतात.
या सर्वांवर एक प्रकारे अन्यायच होत असतो. परंतु कैदी म्हटले की त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. त्यांच्या हिताकडे कोण पाहणार? काहीही असो, प्रलंबित खटल्यांसाठी सरकार जबाबदार असो किंवा न्याय व्यवस्था, परंतु सर्वसामान्यांचा विचार केला तर ही सुद्धा मानव अधिकारांची एक प्रकारे पायमल्लीच केली जात आहे. परंतु विचार करायला वेळ कोणाकडे आहे.

Saturday, September 5, 2009

बाप्पा, तुम्ही एवढे तरी कराच!


नवसाला पावणाऱ्या बाप्पा,
तुम्ही एवढे तरी कराच!
उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतील व स्वातंत्र्य लढ्यासाठी विचार-विनिमय करून योजना अखतील हा हेतू ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. सामाजिक जाणिवेतून सर्वांनी एकत्र येऊन "सार्वजनिकरित्या' हा उत्सव साजरा करावा, जेणेकरून "सामाजिक बांधिलकी' जपली जाईल, हा यामागचा उद्देश होता. परंतु सद्यस्थिती पाहता सामाजिक बांधिलकी पूर्णपणे नष्ट झालेली दिसते आहे. गणेशोत्सव मंडळांमध्ये उंच मुर्त्या, देखावे, दाग-दागिने, रोषणाईवर मोठा खर्च केला जातो. ज्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा उत्सव सुरू केला, त्यांच्याकडून जबरदस्तीने वर्गणी (की खंडणी) वसूल केली जाते. समाजाने एकत्र यावे या मुळ उद्देशालाच हरताळ फासून आज लाखो भक्तगणांना तासन्‌तास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत आहे. त्यातच "नवसाला पावणारा' असा नवीन "ट्रेंड' सर्वत्र गाजतो आहे. "हा नवसाला पावणारा गणपती, तो इच्छापूर्ती गणपती' अशी वर्गवारी करून भक्तांनीच चक्क गणपतीचेच भेद-भेव करून टाकले. गणपती मग तो "लालबाग'चा असो किंवा "गिरगाव'चा तो सर्वत्र एकच आहे. ईश्वर हा एकच आहे, हे सत्य स्वीकारून तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथूनच मनोभावे त्या ईश्वराला म्हणजे गणपतीला साकडे घातलेत तर कुठलाही "नवस' न करता तो "गणपती' सुद्धा तुम्हाला पावतो की नाही बघा! पण याचा सारासार विचार कोणीही करीत नाही. सर्वच भक्त देवाकडे काही ना काही मागायला येतात. या सर्वांनाच जर हा देव पावला असता तर एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता. परंतु तसे होत नाही. लाखो भक्तगण गणपतीला साकडे घालतात. त्यातील हजारो भक्त "नवस' फेडण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे असतात.' त्यांना पाहून इतरांनाही आपण "नवस' करावा अशी इच्छा दाटून येते. त्यातूनच मग ही रांग दिवसेंदिवस वाढत जाते "गणपतीला नवस केला म्हणून मुलगा झाला,' असे सांगतात. पण या विज्ञानयुगातील सुज्ञ माणसाच्या बुद्धीला ही न पटणारी गोष्ट आहे. तरीही या नवसांचे स्तोम दिवसेंदिवस वाढतेच आहे.
प्रत्येकाच्या मनामध्ये "श्रद्धा' असावी, परंतु ती "अंधश्रद्धा' असू नये. या श्रद्धेची प्रदर्शन मांडण्याची व अवडंबर माजविण्याची कोणतीही गरज नाही. करायचीच असेल तर गणरायाची भक्तीभावाने पूजा करा. मनोभावे पूजा करून स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणा. स्वतः सुधारण्याची व दुसऱ्याला सुधरवण्याची शपथ घ्या. परंतु असे होताना कोठेही दिसत नाही. उत्सवांच्या नावाखाली हजारो-लाखो रुपयांच्या वर्गण्या उकळून, मोठाले सण साजरे करून मिरवणुकांमध्ये दारु पिऊन. ओंगाळवाणे नाचने, बिभत्स हावभाव करून गाणी वाजवणे, गणपतीच्या मंडपातच जुगाराचे डाव मांडणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार या गणरायाच्या साक्षीनेच होतात. गणरायाच्या विसर्जनाप्रसंगी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमधून तर चढाओढ सुरू असते. ढोल, बॅन्जो मागे पडले आता डी. जे. च्या कर्णकर्कश आवाजात तर्रर्र झालेली पोरं अक्षरशः धुडगूस घालत असतात. मागच्या वर्षी काही मंडळांनी तर आपल्या पथकाकडे लक्ष वेधण्यासाठी डान्सबारच्या पोरींना नाचवले. अनेक ठिकाणी गर्दीचा आणि अंधाराचा फायदा उचलित काही टपोरी पोरं मुलींचा विनयभंग करतात, नाचता-नाचता चिमटे काढतात. यातूनच एखादी गळाला लागली तर प्रसंगी मिरवणूक सोडून थेट लॉजवर जातात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ते रोखण्याची हिम्मत कोणाकडेच नाही. देवाच्या समक्ष असे गैरप्रकार होऊनही देव त्यांना दंड करू शकत नाही, तर तुम्ही आम्ही काय करणार?
आज राज्याला अनेक महाभयंकर प्रश्न भेडसावत आहेत. परंतु या प्रश्नांसाठी कोणीही कधीही एकत्र येताना दिसत नाही. ओंगळवाण्या प्रकारांसाठीच उत्सव मंडळे दिवस-रात्र राबताहेत. काळो रुपये पाण्यासारखे खर्च करताहेत. परंतु आपल्याच परिसरातील कुठलीही सुधारणा करण्याची सुुुबुद्धी त्यांना गणपती बाप्पा देत नाही. समाजात पापी माणसांची वाढ होत असूनही हीच पापी माणसं आज समाजात उजळ माथ्याने फिरताहेत. त्यांना हा देव बघून कसा घेत नाही? एवढा अन्याय, अत्याचार कसा काय माजला आहे? देव त्यासाठी काहीच करीत नाही. जे भक्तीभावाने, तासन्‌तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात त्या भक्तावरच अन्याय होऊनही हा देव गप्प कसा? असा प्रश्न पडतो. ज्या देवांनी भक्तांचे रक्षण करायचे, त्या देवांनाच कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवावा लागतो. यावरून हेच स्पष्ट होते की जे देव स्वतःचेच संरक्षण करू शकत नाहीत ते इतरांचे संरक्षण कसे करणार?
"देव देवळात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, देव आकाशात नाही तर प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे.' असे सर्वच संतांनी सांगितले आहे. "मानवसेवा हिच ईश्वरसेवा' हे ब्रीद वाक्यही सर्वांना पाठ आहे तरीही आम्ही अंधश्रद्धेच्या पगडीतून बाहेर पडत नाही.
"ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अराजकता माजेल त्या त्या वेळी मी जन्म घेईन' असे म्हणणारा देव अजून कुठल्या अराजकतेची वाट पहात आहे? या देशावर मुस्लिमांनी 800 वर्षे राज्य करून हिंदूंच्या देव-देवतांची विल्हेवाट लावली. उरली-सुरली इभ्रत इंग्रजांनी धुळीस मिळवली तरीही आमचे देव स्वस्थ कसे? कोल्हापूरच्या तुळजाभवानी मातेचा चोरीला गेलेला मुकुट, डहाणूच्या महालक्ष्मी मातेचे पळविलेले डोळे, शिर्डीच्या साईबाब संस्थानातील गाजलेला भ्रष्टाचार, तिरुपतीच्या पुजऱ्यांचा भ्रष्टाचार व अनेक तिर्थक्षेत्रांच्या स्थळी चालणारे अश्लील धंदे कशाचे द्योतक आहेत? सोरटीच्या सोमनाथाचे मंदिर तब्बल 17 वेळा लुटले तरी सोमनाथाने एकदाही प्रतिकार केला नाही . पाकिस्तानातील तर जवळजवळ 300 मंदिराच्या मुताऱ्या झाल्या तरीही आमचा देव मुस्लिमांवर कोपला नाही. भूकंपाच्यावेळी देवच जमिनीत गाडले गेले. त्यामुळे जे स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत ते भक्तांवर आलेल्या संकटाच्यावेळी हे देव काय रक्षण करणार? त्यामुळे देवावरचा विश्वास उडत चालला आहे. त्याचा गैरफायदा बुवा, बापू, साधू, महाराजांनी घेतला आहे. आपण देवाचे अवतार असल्याचे खोटे सांगून जनतेला आपल्या भजनी लावत आहेत. या ढोंगी महात्म्यांनाच आता देश संरक्षणासाठी अतिरेक्यांशी लढायला पाठवायला हवे.
हे सगळे किळसवाणे प्रकार पाहिल्यानंतर असे वाटते की देव आपला चमत्कार का दाखवित नाही? हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांना मंदिरांचे विध्वंस करणाऱ्या मुस्लिमांना देवांच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्या बुवांना आणि देवाच्या शपथा खाणाऱ्या स्वार्थी, ढोंगी नेतेमंडळींना हे देव धडा का शिकवित नाहीत? त्यामुळे नवसाला पावणाऱ्या आणि इच्छापूर्वी गणरायाला हेच साकडे घालावे लागेल की, "हे गणराया, आमच्या देशातील सर्व अतिरेक्यांचा कायमचा बिमोड करून टाक, तुझ्या नावाने राजकारण करणाऱ्या स्वार्थी पुढऱ्यांना कायमचा धडा शिकव, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांच्या मेंदूत काहीतरी प्रकाश पडू दे, सर्वांना समान न्याय मिळू दे, कोणावरही अन्याय होऊ नये, सर्वांना सुख-संपत्ती भरभरून दे आणि हा संपूर्ण देशच पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे "सोन्याचे अंडे देणारा', सुजलाम्‌ सुफलाम्‌ होऊ दे! तुझ्या भक्तीचे खोटे आव आणून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या कार्यकर्त्यांना धडा शिकव. तुझ्या मिरवणुकीत दारु पिऊन नाचणाऱ्यांची दारु सोडव, मंडपात पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांना अद्दल घडव आणि अश्लील, गैरप्रकार करणाऱ्यांचे काय करायचे ते बाप्पा तुम्हीच ठरवा!'